मानसपूजा…

मी हिंदू आहे, याचा मला ना गर्व वाटतो ना कमीपणा. मला नास्तिक असूनही हिंदू म्हणवून घेण्याची पूर्ण मुभा आहे, परंतु विचाराने आणि माझ्या मर्जीने मी आस्तिक आहे.

ग्रामदैवत, कुलदैवत तसेच अन्य घरांतून पुजल्या जाणाऱ्या देवतांविषयी मला कुतुहल वाटते. आणि अद्वैतवादापासून तेहतीस कोटी देवतांपर्यंत सगळ्या धार्मिक मतांचा मला आदर वाटतो.

धर्म, संस्कृती अन परंपरांच्या श्रीमंतीत वावरताना या तिन्हींचे नुसते परस्परसंबंध नव्हे तर अगम्य गुंतागुंत पाहते आहे पण त्याचा मी भाग कदाचित उरले नाही.

ठराविक दिवशी गर्दीतून कुठल्याही देवळात दर्शनासाठी जाणे, कुठल्या आध्यात्मिक अथवा धार्मिक गुरूंचा अनुनय करणे, नित्य अथवा नैमित्तिक पूजा घरात करणे, हिंदू सण, उत्सव साजरे करणे यातून मला माझी आस्था व्यक्त करावी असे आता वाटत नाही.

किंबहुना दर वर्षी पुन्हा पुन्हा तेच सण तशाच प्रकारे साजरे करण्याचा मला कंटाळाच आला आहे. दर वर्षी बाजारातून त्याच त्याच सामग्री चढत्या भावाने विकत घेणे, दुसऱ्या दिवशी त्याचे निर्माल्य सजग नागरिक असल्याच्या तोऱ्यात कंपोस्ट करणे. सजावटीचे सामान, कपडे, इतर अविघटनशील पूजासाहित्य खरेदी करताना सतत पर्याय शोधत डोक्याचा भुसा करून घेणे. बाजारातील पैशांचा उत्सव अन उत्सवाचा बाजार मांडलेला पाहून उगाच विचार करणे… एकुणातच सणाचा आनंद घेण्याचे सोडून त्रास, मनस्ताप अन दमछाक करून घेणे याचा कंटाळा आला. यात कुठेही आत्मिक समाधान काही दिसेना, मात्र भयंकर साचलेपणा वाटू लागला.

शहरात सण साजरे करताना त्या सणांच्या मागची खरी सामजिक वीण, त्याचे कृषिसंस्कृतीशी, पर्यावरणाशी असलेले मार्दवी नाते तर कधीच संपून गेल्याची जाणीव सतत होऊ लागली. सणांचे बाजारू, दिखाऊ रूप जणू माझे व्यक्तिगत शल्य होते. इतर सगळीजण पथकाच्या तालबद्ध आवाजात, लाऊडस्पीकरवर गाजणाऱ्या आरत्यांच्या गजरात सुखी आहेत पण आपलेच मन त्यात रमत नाही ही जाणीव किती अस्वस्थ करते म्हणून सांगू…

मग पुन्हा एकदा पाटी स्वच्छ करून आपल्याला नक्की काय पाहिजे याचा शोध घ्यायला हवा.

इष्टदेवतेशी आपले अत्यंत खासगी अन जिव्हाळ्याचे नाते असावे अन त्या प्रेमातून, सात्विक आनंद मिळावा, चित्त शांत व्हावे एवढीच माणसाची माफक अपेक्षा असते. हा आनंद सामूहिकपणे घेता येतो किंवा एकांतात.

आपण एका अत्यंत उदारमतवादी संस्कृतीचा भाग आहोत, जी आपल्याला आपापल्या जडणघडणीनुसार, स्वभावानुसार यातील निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते; आपल्या निवडीबद्दल कुठलाही रोष बाळगत नाही.

आज मी माझ्या सवडीने, साध्या घरच्या कपड्यात, एकांतात बसून, कुठल्याही मूर्ती अथवा पूजा साहित्याशिवाय, नाच, गाणी, सजावट, गोड पदार्थ, साग्रसंगीत जेवणाच्या बेताशिवाय, समोर केवळ गणेश प्रतिष्ठापनेची पोथी ठेवून गणपतीची मानसपूजा केली…. मनापासून.

त्यातून मला काय मिळालं, काय अनुभव आला हे मी सांगू इच्छित नाही.
इतरांनी सण कसे साजरे करावे, त्यांच्या धार्मिक भावना कशा व्यक्त कराव्या यावर भाष्य करण्यासाठी देखिल मी हे लिहीत नाही. त्यातले सामाजिक, आर्थिक, भावनिक पदर अन त्यांची गुंतागुंत मी समजू शकते.
सणांच्या निमित्ताने जी समोर येते ती आपली महान भारतीय संस्कृती खरंच आहे कि नुसता नट्टापट्टा? हा प्रश्न देखिल मी इतरांना विचारणार नाही. मला तो हक्क मुळीच नाही.
असंच का? तसं का नाही… आमचेच सण दिसतात, ’त्यांना’ जाऊन का सांगत नाही… या असल्या प्रतिक्रियांना काही उलट प्रतिक्रिया देण्याची गरज नाही…
मात्र जर समविचारी असे कोणी असतील तर त्यांना साद देण्यासाठी मी लिहीत आहे…. मानसपूजेला षोडशोपचारी पूजेच्या समान, किंबहुना अधिकच मान देणाऱ्या सहिष्णुतेला सामोरी जाण्यासाठी लिहिते आहे….

तत्त्वांपासून फरकत घेऊन त्यांच्या संदर्भहीन भगव्या प्रतिकांना मिरवण्यापेक्षा आज ’असेलच’ तर मला अधिक गरज विविधतेला कमतरता न मानून उदारतेने सामावून घेणाऱ्या, लवचिक अन विजिगिषु हिंदुत्वाची वाटली, म्हणून लिहिते आहे.

बाकी मोदक तर काय मला कधीही खायला आवडतील!

आपण सूक्ष्मजीवांना का घाबरतो…?

एका वाक्यात सांगायचं तर आपल्याला डेटॉलने घाबरवलं…. बाकी काहीच नाही झालं.

आपल्या भोवतीची हवा, पाणी, आपलं अन्न, इतकंच काय आपले केस, त्वचा, तोंड सगळीकडे सूक्ष्मजीव उदंड नांदत असतात.

सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय दही, चीज, इडली, डोसा, ब्रेड शक्य नाहीत. आपल्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय अन्नपचन शक्य नाही, कुठल्याही जैविक वस्तूचं विघटन शक्य नाही.

या पृथ्वीवर सूक्ष्मजीव आपले निव्वळ शेजारी नाहीत तर सहचर देखिल आहेत. त्यांची संख्या, वैविध्य अन सभोवतालाशी नवनवीन प्रकारे जुळवून घेत टिकून राहण्याची जिगीषा पाहता अनेक अभ्यासक असं मानतात की सूक्ष्मजीवांनी व्यापलेल्या या जगात एक आपली माणूसजमात देखिल राहते!

इतकेच काय तर, माणसाचा इतिहास हा बराचसा जंतूंनी घडवला आहे असे प्रतिपादन काही अभ्यासक करतात! साथीचे रोग अन त्यातून झालेल्या राजकीय उलाढाली पाहता त्यात काहीच चूक नाही. आपण सूक्षजीवांशी पिढ्यानपिढ्यांपासून भांडत आहोत. गेल्या दोन शतकातील वैज्ञानिक प्रगती नंतर आपल्याला सूक्ष्मजीवांचे विश्वव्यापी स्वरूप लक्षात आले पण त्यांच्यावर मात करता आलेली नाही हेच सत्य आहे.

सूक्ष्मजीवांच्या अभ्यासातून व्यक्तिगत स्वच्छतेच्या अनेक नियमांना सबळ पुरावा मिळाला. नियमित आंघोळ, शौचानंतर अथवा जेवण्यापूर्वी हात धुणे, खाण्यापिण्याचे पदार्थ अन पाणी स्वच्छ ठेवणे इतपत ढोबळ पायाभूत स्वच्छतेच्या नियमांचे आरोग्य राखण्याच्या दृष्टीने महत्त्व आपल्याला समजले.

एकीकडे सामाजिक स्वच्छतेचे नियम तर सांगूनही आपल्याला अजून आचरणात आणता येत नाहीत. मात्र दुसरीकडे सूक्ष्मजीवांचा नायनाट करण्याच्या हौसेला मोल उरले नाही. “मॉं माने सिर्फ डेटॉल का धुला” हेच स्वच्छतेचं ब्रीदवाक्य झालं. ते टीव्हीवर सूक्ष्मदर्शकाच्या गोलात एका बाजूला वळवळणारे जंतू अन दुसरीकडे स्व्च्छ पांढरं हे प्रतीकात्म चित्र आपल्याला खरंच वाटू लागलं. संडासात बसून माणसांच्या आरोग्यावर हल्ला करण्याचे बेत आखणारे हिरवे-पिवळे विचित्र जीव पाहता पहता सरसकट सगळेच सूक्ष्मजीव आधुनिक खलनायक झाले. आणि त्यांचा पाडाव करण्यासाठी जहालातील जहाल रसायनांचा वापर अपरिहार्यच झाला.

त्यांचे जग साध्या मानवी डोळ्यांनी दिसत नाही अन सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नायनाट माणसाच्याने शक्यच नाही. खरंतर आपल्या ऍंटीबायोटीक्स, डिस इनफेक्टंट इत्यादींनी सूक्ष्मजीवांना काहीएक फरक पडत नाही हे गेल्या काही दशकात अभ्यासकांच्या लक्षात आले आहे. आपण जर सूक्ष्मजीवांना हरवू शकत नसू तर काय करायचं?! त्यांनाच सोबत घेऊन लढता आलं तर?!

पायाभूत स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे, योग्य आहार अन व्यायामाने शरीराची काळजी घेणे अन आपली प्रतिकार शक्ती उत्तमातल्या उत्तम स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करणे इतकेच खात्रीशीर आपल्या हातात असते. कितीही प्रयत्न केले तरी रोग पसरवणारे सूक्ष्मजीव माझ्या संपर्कातच येऊ नयेत अशी काळजी घेणे निव्वळ अशक्य अन हास्यासपद आहे. मात्र आपल्या शरीरात रोग पसरवणाऱ्या सूक्ष्मजीवांसोबत त्यांना विरोध करणारे जीव देखिल जर असतील तर आपण रोगाला प्रतिकार करू शकू. म्हणजेच आपली खरी सुरक्षितता सूक्ष्मजीवांच्या जैवविविधतेत आहे.

आपल्या शरीरातील “अंगभूत” प्रतिकारशक्ती भलतीच मजेदार गोष्ट आहे. अनेक प्रकारच्या जीवाणू अन विषाणूंना आपल्या पांढऱ्या रक्तपेशी ओळखत असतात. त्यातील बहुतेक जीवांना रोखणारी प्रथिने आपल्याला बनवता येतात. एकदा एका प्रकारच्या प्रथिनाची ओळख पटली कि पुन्हा त्याच infection ला आपण सहजी बळी पडत नाही. आपण आपल्या शरीराला जितक्या अधिकाधिक जैववैविध्याची, पण मर्यादेत ओळख करून देऊ तितकी आपली रोगप्रतिकारक शक्ति अधिकाधिक ’सशक्त’ होते.

याविरुद्ध १००% जीवाणूमुक्त जगण्याचा प्रयत्न कधीच सफल होत नाही. जितकी नवी रसायने वापरावी तितके सूक्ष्मजीव अधिकाधिक धीट होत जातात, मात्र त्या नादात आपली प्रतिकार शक्तीच आपण घालवून बसलेलो असतो.

सूक्ष्मजीवांची भीति बाळगत सतत स्वच्छतेचा अतिरेक करणे हे पुढारलेपणाचे लक्षण नसून नवे वैचारिक अंधत्व आहे. आणि वैचारिक अंधत्वाला विज्ञान कधीच साथ देत नाही.

गेल्या काही वर्षात अनेक लोकांशी बोलून, प्रतिकारशक्ती अन सूक्ष्मजीवांविषयी उपलब्ध असलेली अथांग अन तरीही अपूर्ण माहिती समजून घेऊन, स्वत:च्या जीवनशैलीत हळूहळू बदल करत मी माझे स्वत:चे सूक्ष्मजीव धोरण बनवते आहे. यात अनेकानेक चित्रविचित्र लोकांचे, अभ्यासक-विचारवंतांचे, फ़िरस्त्यांचे मौल्यवान योगदान आहे. मात्र माझ्या वेडेपणाबद्दल भरपूर लोकांना आक्षेप असणार हे गृहित धरून अन्य वेड्यांचा उल्लेख न केलेला बरा….

मात्र हे सूक्ष्मजीव धोरण सांगण्यापूर्वी काही स्पष्टीकरण गरजेचे आहे…

  • या धोरणात स्थल-कालानुसार, परिस्थिती तसेच गोष्टींच्या उपलब्धतेनुसार ’धोरणीपणे’ बदल होतात. हे एक लवचिक धोरण आहे, धर्म नव्हे!
  • मी वैद्यकीय अभ्यासक, डॉक्टर अथवा तज्ञ नाही. मात्र माझ्या आरोग्याचे निर्णय हवे तसे घेण्याचे मूलभूत स्वातंत्र्य मी पुरेपूर वापरते आहे, इतकेच.
  • हे माझे धोरण आहे आणि निव्वळ उदाहरणादाखल घ्यावे. हे जसेच्या तसे दुसऱ्यांना लागू होऊ शकत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपापले धोरण ठरवावे अन पाळावे, मात्र आपल्या धोरणाचा दुसऱ्यांच्या आरोग्याला अथवा धोरणाला त्रास होईल असे काही सहाजिकपणे करू नये!
  • आपल्याला आपले धोरण ठरवायचे नसेल तरीही काहीच प्रश्न नाही. डेटॉल ते काम आपल्या सगळ्यांसाठी करतेच. आपण मुकाट ते सांगतील तसे करावे. बराच मनस्ताप वाचतो!

माझे सूक्ष्मजीव धोरण

तर… मी कामानिमित्त भरपूर फिरते, अन तेही बहुतेक वेळा बऱ्यापैकी दुर्गम भागात, आडगावातून. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आजकाल सगळीकडे विकत मिळतात, पण त्यांचा कचरा मागे सोडत फिरणे अजिबात पटत नाही. मला स्वत:ला सूक्ष्मजीवांपेक्षा अधिक भीति प्लॅस्टीकची वाटते. मी माझी-माझी धातूची पाण्याची बाटली घेऊन फिरते. स्थानिक पाणपोया, चहाच्या टपऱ्या किंवा होटेलं, बस स्थानके अशा सर्वसामान्यपणे अस्वच्छ मानल्या जाणाऱ्या जागी बाटली भरून घेते. घरी देखिल गेली अनेक वर्षे साधं नळाचंच पाणी पिते आहे. कुठलाही फिल्टर नाही, पुण्यात, त्यतल्या त्यात आमच्या भागात तरी बरं पाणी येतं. आपली काहीही तक्रार नाही.

बाहेर खाण्याची वेळ खूपदा येते, तेव्हा स्वच्छतेचा अजिबात विचार करत नाही. मात्र मुक्कामी पोहोचल्यावर स्थानिक, घरचे जे काही पानात वाढले जाईल ते आनंदाने खाते. क्वचित पोटात किरकोळ गुडगुड होण्याव्यतिरिक्त गंभीर काही त्रास आजवर झालेला नाही.

भारतातल्या बहुतेक सर्व गावांमधून आसपासच्या शेतांतून पिकवलेले, घरचे, कधीकधी चुलीवरचे, साधे, शाकाहारी अन स्वच्छ जेवण मिळतेच मिळते. त्यात रासायनिक खता-कीटकनाशकांचा वापर जवळात जवळील शहरापर्यंतच्या अंतराच्या व्यस्त प्रमाणात असतो. जितका भाग दुर्गम तितका रसायनांचा वापर कमी.

मात्र प्लास्टिक सर्व चराचरात भरलेले असल्यामुळे आजकाल गावागावात चूल पेटवण्यासाठी लेय्ज, कुरकुरेची पाकिटं जाळली जातात. त्या तसल्या निखाऱ्यात फुलवलेल्या भाकऱ्यांची मला थोडी भीति वाटते.

पुण्यात रोज सकाळी उठून धुरात अजून धूर सोडत गाडी चालवत, रस्त्यावरच्या मुर्दाड लोकांशी भांडत कामावर जाणे बंद केल्यापासून गाड्यांचा धूर खायला मिळेनासा झालाय. तेव्हापासून सर्दी-पडसं होणं जवळपास बंदच झालं. पूर्वी माझा खोकला महिना महिना ठाण मांडून बसत असे… आजकाल जरा घसा खवखवला तरी आश्चर्य वाटते. पडशाच्या जंतूंना मी आवडेनाशी झाले बहुदा.

त्यातून दोनेक वर्षात एखादं पडसं झालंच तर मी मनाला लावून घेत नाही. उगाच कुठले जंतू आपल्या नाकातोंडात गेले असतील असा विचार करत बसत नाही. चार दिवस मस्त आराम करणे परवडते कारण वर सांगितल्याप्रमाणे रोज गाडी काढून कुठे घडघड करत जायचे नसते.

गावकडची कामं निवांत चालतात… स्वत:च्या आरोग्याशी तडजोड करत खेचावे लागत नाही. पैशांशी तडजोड मात्र करावी लागते थोडी…

स्वत:च्या घरात भांडी-कपड्यासाठी रिठा- लिंबू घालून केलेले व्हिनेगर पुरते. आंघोळीला मसुरीच्या पिठाचे उटणे, साय किंवा स्वयंपाकघरातील बऱ्याच गोष्टी आलटून पालटून चालतात मला! रिठा-लिंबू व्हिनेगर शांपू म्हणून माझ्या केसांना चालते. (सूक्ष्मजीव नसते तर माझे व्हिनिगर कुणी बनवले असते?!)

रिठा-व्हिनिगरचा फेस मस्त होतो आणि सांडपाण्याबरोबर नदीत वहात गेल्याने नदीतील जैववैविध्याला त्याचा काहीही अपाय नाही.

महाराष्ट्र ते दक्षिण भारतात खोबरेल, उत्तरेत, थंडीत सरसोचे तेल केसांना चालते. दही, अंडे असल्या स्वयंपाकघरातील गोष्टी कंडिशनर म्हणून अधून मधून केसांना लावल्या की आपलेच लाड केल्याचे समाधान!

दही, ताक, इडली, डोसे, ब्रेड अन इतर फरमेंट्स आवडीने खाते (आणि पिते). तेवढीच माझ्या पाळीव जैववैविध्यात भर! प्रवासामुळे अधूनमधून अस्वच्छ हाताने रस्त्यावरचे अन्नपदार्थ होतातच….

एरव्हीच्या या असल्या वेडेपणासोबत घरी अथवा मुक्कामाच्या गावी मात्र हात-पाय न चुकता धुते… ज्या गावात पाणी असेल त्या गावात आंघोळ करते, नाहीच मिळाली करायला तर चालवून घेते.

भरपूर ऋतुजन्य, स्थनिक फळं, भाज्या, रानभाज्या मिळतील तशा आवर्जून खाते. रोजरोज गव्हाची साधी पोळी नकोच त्यापेक्षा वेगवेगळ्या धान्यांची विशेषत: नाचणी-तांदळाची भाकरी (स्वत:च्या घरी असेन तर) चालते. तुरीची डाळ गेल्या वर्षी एकदा खाल्ली होती. मसुर डाळ, मूग डाळ किंवा अन्य (कुठल्याही राजकारणात भाव खाऊन न चढणाऱ्या) डाळी खायला लागल्यावर अधिक आवडू लागल्या.

कांदा महाग झाला म्हणजे तो खाण्यासाठीचा योग्य ऋतु नाही असं आपलं मला वाटतं. बरेचदा तेव्हा रानभाज्यांची चंगळ असतेच. काही बिघडत नाही.

स्वयंपाकासाठी रिफाईड तेल नाही. घाण्याचं शक्यतो दरवेळी वेगवेगळं तेल वापरते. एकाच तेलाला काय डोक्यावर घ्यायचं?! मला कुठल्याही तेलाचा वास त्रासदायक होत नाही अन कुठल्याही प्रदेशातील अन्नसंस्कृती अद्याप तरी नावडली नाही.

सगळ्यात ’वैविध्य’ जमलं की कुठलेही एकाच प्रकारचे जंतू पोसले जात नाहीत. त्यांचं वैविध्य जितकं तेवढी आपली तब्येत चांगली रहात असावी असं माझं निरिक्षण आहे.

त्यातून जे मला खात येत नाही ते ते सगळं आमचे कंपोस्टमधले सूक्ष्मजीव खातात… अधूनमधून मिर्च्या, कारली, टोमॅटो उगवलेच तर ते परत मीच खाते!

सूक्ष्मजीवाय नम:!

अर्थात या सगळ्यात मी फारशी आजारी पडत नाही यात माझे काहीच कर्तृत्व नाही, कारण आपली प्रतिकारशक्ती ही अजबच असते, व्यक्तीनुसार बदलते. फारतर माझ्या पूर्वजांच्या जनुकांना अन सूक्ष्मजीवांना धन्यवाद… वयानुसार अन इतर कारणांनी जंतूंमुळे न होणारे आजार होऊच शकतात. मात्र त्यासाठी सूक्ष्मजीवांना बोल लावणार नाही मी!

अजून अनेक गोष्टी अशा अहेत जिथून बाजारू रसायनांना दरवाजा दाखवून सूक्ष्मजीवांना मोकळं सोडायला आवडेल… काम सावकाश चालू आहे. कारण कुठल्याही एकाच धोरणाचा अतिरेक म्हणजे अंधश्रद्धाच पुन्हा…

लेखकराव अन तसलंच काहीबाही….

हे सगळं लिहिण्याचं कारण असं कि, आज खूप दिवसांनी गिरिशरावांना भेटले. ते ज्ञान प्रबोधिनी नावाच्या मोठ्ठ्या संस्थेचे संचालक वगैरे असले तरी भयंकर गोड हसतात अन त्यांची भिती वाटायच्या ऐवजी छानच वाटायला लागतं उगाच. तर, ते म्हणाले कि, “तुझ्याबद्दल बाहेरच्या लोकांकडून बरंच ऐकायला येतं.” वरकरणी मी हसण्यावारी नेलं अन उलट विचारलं कि, “चांगलंच ऐकलंत नं, मग ठीकंय.” पण दोन क्षण माझ्या पोटात वेड्यासारख्या लाटा उसळ्या मारून गेल्या! हे असे काही मोजके लोक असतात, गिरिशराव अन पोंक्षे सरांसारखे ज्यांनी आपल्याला अडनिड्या वयात, मळक्या कपड्यात, चष्मा सावरत, अडखळत बोलताना पाहिलेलं असतं अन त्यांनी जर थोडं जरी कौतुक केलं नं, तरी आपण विरघळून मरून जाऊ की काय असं होतं!!

***

झोकून देऊन काम करताना माणसाला कौतुकाची भूक नसते. कौतुक व्हायला लागल्यावर ती भूक जागी होते. सुरुवातीला छान वाटतं नुसतंच, कामाचा हुरूप वाढतो. आत्मविश्वास वाढतो, कधीकधी नको तेवढा वाढतो.

हे कौतुक भलतंच दुधारी शस्त्र आहे. पाहता पाहता स्वतंत्र बुद्धीला आपलं गुलाम करून टाकणारं मायावी शस्त्र!  गेल्या काही वर्षांत अनेक “तारांकित” लोकांना लक्ष देऊन पाहते आहे. त्यांच्यापासून दुरावलेले खरे हितचिंतक अन  त्या जागी चिकटलेले चमचे हा एक चमत्कारिक प्रकार असतो. मनापासून काम करणाऱ्या, सरळ-साध्या माणसांना प्रसिद्धीलोलूप होताना पाहूनच कौतुकाची भितीच बसत गेली आहे. तोंडावर अपमान करणाऱ्या जुन्या दोस्तांना आजकाल जिवाच्या कराराने धरून ठेवलंय मी.

कौतुक करणारे लोक खरोखरीच मनापासून करत असावेत, असं जरी आपण धरून चाललो तरी, त्यातल्या त्यात आपल्या परोक्ष होणारं कौतुक ठीक. मात्र सार्वजनिक कौतुक सगळ्यात भयंकर. ते कधीच सत्याला धरून रहात नाही. सार्वजनिक कौतुक लहान सहान विपर्यासांनी सुरू होऊन विचारापेक्षा व्यक्तीचं उदात्तीकरण करण्यापर्यंत कधी जाऊन पोहोचतं ते कौतुक सहन करणाऱ्यांच्या लक्षातच येत नाही.

साध्या कार्यरत माणसाचा कार्यकर्ता झाला की सामान्य माणसांना त्याच्यापासून वेगळं राहता येतं… सामान्य राहता येतं. इतरांना मोठेपणाच्या खुर्चीत बसवलं की आपण आपलं विरोधाभासाने भरलेलं आयुष्य जगत टाळ्या वाजवायला मोकळे राहतो हा मोठा चाणाक्ष विचार सो कॉल्ड “सामान्य माणसं” करतात! ते लक्षात येईपर्यंत पुलंच्या भाषेत “लेखकाचा लेखकराव” झालेला असतो.

आपल्या अतिरंजित सार्वजनिक प्रतिमेतून खऱ्या स्वत:ला शोधण्याची धडपड करण्यातच भल्याभल्यांचे हकनाक बळी गेले. याविरुद्ध, प्रसिद्धीपासून दूर राहण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्याचा तुसडेपणाने अपमान करून कित्येक पुणेरी महाभागांनी त्यांच्या चांगल्या कामात विनाकारण अडसर निर्माण केल्याचीही उदाहरणं कमी नाहीत.

पाय जमिनीवर ठेवून कौतुक झेलता येणं, तरीही कौतुकाच्या शब्दांनी मर्यादून न राहणं हे प्रत्यक्ष चांगलं काम करण्यापेक्षाही अवघड आहे. चांगलं काम करू इच्छिणाऱ्या माणसांवर आपल्या कामाव्यतिरिक्त ही दुहेरी जबाबदारी पडते. पण स्वत:ला सामान्यपणाच्या परिभाषेत बांधून ठेवणाऱ्या लोकांना आपण मनापासून काम करणाऱ्यांना नकळत दूर करतो आहोत याची कल्पनाही नसते.

समाजमाध्यमांची पकड जसजशी विस्तृत अन खोल होत जात आहे तसतसं कौतुक फारच स्वस्त होत चाललं आहे. आपल्या जबाबदारीची जाणीव पुरती रुजण्याआधीच आमच्या पिढीचं भलतंच कौतुक झालं अन अनेक आश्वासक तरुण मुलामुलींमधून उद्याचे कणखर नेते, कलाकार, विचारवंत, कार्यकर्ते उभे राहता राहता भलतीकडे वाहून गेले.

आपलं काम अधिकाधिक परिणामकारक होण्यासाठी जर आणि जितक्या प्रसिद्धीची खरोखर गरज आहे तर अन तेवढीच प्रसिद्धी मान्य केली पाहिजे. ती प्रसिद्धी स्वत:च्या प्रतिमा-उन्नतीसाठी नसून आपल्या कामाच्या अन त्यामागच्या विचारसरणीच्या पुरस्कारासाठी आहे याचा कधीही विसर पडता कामा नये. काही प्रकारच्या कामांसाठी खरंतर अज्ञात राहणं अधिक उपयुक्त असतं हे वेळीच ओळखता आलं पाहिजे. अन तरीही जर लोक तुमच्या कामाचं कौतुक करत असतील तर त्याचा आनंद आपल्या गुरुजनांना अन घरच्यांना घेऊ द्यावा. आपल्या कौतुकावर केवळ त्यांचा हक्क असतो.

माझ्यासारख्या कौतुकाशिवायच डोकं हवेत असणाऱ्यांना याची परत परत आठवण करून द्यावी लागते. तेव्हा कान ओढून जमिनीवर उतरवणाऱ्या मित्रांना, गुरूंना अन आप्तांना अजिबात अंतर देऊ नये! त्यांनी कधीकाळी चुकून केलंच तर तेवढं कौतुक मात्र बिनधास्त मनावर घ्यावं अन खूष व्हावं!!

आज्जीच्या मांडीत डोकं घुसळून केस विस्कटून घेण्यात, बाबाच्या हातचा कालवलेला वरणभात खाण्यात, मित्रांबरोबर तिलकला चहा मारत आचरटपणा करण्यात, शाळेतल्या शिक्षकांकडून अजूनही हक्काने पुस्तकं मागून वाचण्यात जे अक्राळविक्राळ सुख आहे नं ते घालवण्याइतकं महत्त्वाचं जगात काहीही नस्तंच मुळी. बस्स, बाकी लहानपण मागे सोडून मोठं झाल्याबद्दल काही तक्रार नाही!

सत्तरी गाठलेले तरुण राष्ट्र…

दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ ऑगस्टला आमच्या शेजाऱ्यांनी अन १५ ऑगस्टला आम्ही मोठ्या थाटामाटात स्वातंत्र्यदिन साजरा केला. शेजाऱ्यांना शुभेच्छा देणाऱ्या देशद्रोह्यांना फेसबुकाच्या भिंतीवर जाहीर (पण प्रतीकात्मक) फाशी देऊन सुरु झालेला हा सोहळा, ध्वजवंदने, भाषणे, संचलने अशा ठरलेल्या मार्गाने शुभ्र वस्त्र मिरवीत, जवळच्या चहा-मिसळ कट्टयांवर जाऊन शांत झाला.

पांढऱ्या कपड्यांतल्या ग्रूप-सेल्फींनी देशद्रोहावरच्या ई-चर्चांना भिंतीवरून खाली ढकलले अन राष्ट्रवाद वगैरे वादांना कोणीच वाचत नसलेल्या वैचारिक वृत्तपत्रांसाठी सोडून देण्यात आले.

विषयांतर: वृत्तपत्रांमधेही “सर्वात लोकप्रिय” अन “बुद्धिवाद्यांचा पेपर” असे दोन प्रकार असतात. लोकप्रिय म्हणजे ज्यात कोथरूडच्या काकवा आपण कामवालीला कशी मदत केली किंवा सुनेशी कसे जुळवून घेतले असल्या जिन्यात गप्पा मारण्याच्या विषयांवर “लेख” लिहितात. उरलेली पाने राजकीय पक्षांच्या, त्यांच्या त्यांच्या शिक्षणसंस्थांच्या जाहिराती, पाककृती, फॅशन, सिनेमा, राशिभविष्य असल्या गोष्टींनी अत्यंत रसिकपणे भरवलेली असतात. बुद्धिवाद्यांचा पेपर मात्र कंटाळावाणा असतो. त्यात संपादकीयच काय ते असतं! अन लेखक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार इत्यादी अनोळखी लोक स्तंभलेखन करतात. असली वृत्तपत्रे फारशी खपत नाहीत. त्यांना भरपूर जाहिराती देखिल मिळतातच असे नाही. विषयांतर समाप्त!

तर. या निमित्ताने एका दुसऱ्या प्रकारच्या, कंटाळावाण्या वृत्तपत्राने देशप्रेमाची प्रचलित व्याख्याच चर्चेला काढली. असल्या संपादकियांमुळेच ते दुसऱ्या प्रकारात मोडतात!

मुळातच, कुठल्याही निष्ठा, अभिमान वगैरे गोष्टी धडधत्या जाज्वल्य ठेवण्यासाठी विचारधारा असावी लागते हा एक बुद्धिवादी गैरसमज! विचारधारा या शब्दातच प्रवाहीपण आहे, स्थैर्य नाही. विचार अन त्यानुसार निष्ठाही काळाशी सुसंगत रहात बदलल्या पाहिजेत, अधिकाधिक प्रगल्भ अन न्याय्य झाल्या पहिजेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील राजनिष्ठा मागे पडून स्वातंत्र्यलढ्याच्या काळात राष्ट्रनिष्ठा पुढे आली. स्थानिक राज्यांशी, राज्यभाषांशी असलेल्या निष्ठा देखिल काळानुसार बदलल्या.

मात्र समाज कधीच आपल्या निष्ठा सहजसहजी पुढे नेत नाही. प्रत्येक विचार सार्वत्रिक झाला, त्याच्याशी लोकांच्या निष्ठा जोडल्या गेल्या कि यथावकाश अश्मीभूत होत जातो. त्याच्याभोवती तयार होणाऱ्या प्रतीकांना लोक उराशी धरून उत्सव साजरे करत राहतात. विचारधारेत होऊ घातलेले नैसर्गिक बदल भितीपोटी अमान्य करून जुन्याच निष्ठांना चिकटून राहण्याचा प्रयत्न नेहमीच होत आला आहे अन त्यामधूनच बंड पुकारत मोठी सत्तांतरे जन्माला आली आहेत.

नव्यानेच पुन्हा पेटू घातलेला जुना राष्ट्रवाद हा डोळस राष्ट्रप्रेमातून जन्माला न येता केवळ प्रतीकांचे पुनरुत्थान तर नव्हे ना, हे तपासून पाहिले पाहिजे.

एकूणातच आपल्या निष्ठा आपण कुठे अन कशा प्रकारे दर्शवतो हेच तपासले पाहिजे. मध्यंतरी चिनी कंदिलांवर बहिष्कार घालण्यासाठी बराच ई-आरडाओरडा झाला. मागाहून चिनी मालाच्या खोलवर पसरलेल्या मुळांची माहिती त्याच मेड इन चायना इलेक्ट्रॉनिक्सने भरलेल्या फोनांवरून इकडेतिकडे पसरली. ज्या क्षणी ही राष्ट्रप्रेमाची धग माझ्याच आधुनिक उपभोगांना लागते त्या क्षणी आम्ही राष्ट्रप्रेमाची प्रतीके सोयिस्करपणे फिरवून घेतो.

आपल्या शेजारी राष्ट्रांशी अन उरलेल्या जगाशी असलेल्या आपल्या राजकीय, व्यापारी अन सामरिक संबंधाची आपल्याला फार तोकडी माहिती असते. आपले राज्यकर्ते, प्रसार माध्यमे, मोठमोठे व्यापारी अन औद्योगिक समूह अन बाजारपेठा ही माहिती आपापल्या स्वर्थानुसार चितारीत असतात.

त्यावर आधारित मते बनवणे अन याचा-त्याचा झेंडा घेऊन ते नाचवतील तसे नाचणे यात कसले आले राष्ट्रप्रेम अन स्वाभिमान?! जोपर्यंत आपण आपल्या वर्तणुकीवर, जीवनशैलीवर कठोर, तर्कनिष्ठ प्रश्न उगारत नाही, जोवर आपण प्रतीकांची शेपूट सोडून डोळे उघडून किमान स्वत:पुरता तरी विचार करत नाही तोवर आपल्या स्वातंत्र्यदिन साजरा करण्याला काहीएक अर्थ नाही.

संस्कृतीने अमेरिकन अन चीनमधे उत्पादित केलेल्या कित्येक वस्तू आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेल्या आहेत. जवळपास प्रत्येक घरातील किमान एक तरुण व्यक्ती शिक्षण अन नोकरीसाठी देशाबाहेर स्थायिक होत आहे. आपापल्या संस्कृतीचे रंग घेऊन तिथल्या स्थानिक संस्कृतीमधे मिसळून जाण्याचे सोडून कित्येक परदेशस्थ भारतीय आपापल्या राज्यांचे, जाती-धर्मांचे कळप बनवून तिथे राहतात. भरतातून आठवणीने साबुदाणे नेऊन उपवास बिपवास करतात. वसुबारसेला गाय शोधत बोचऱ्या थंडीत फिरतात! या गोंधळात पाडणाऱ्या राष्ट्रप्रेमाने धड ना देशी धड न विदेशी अशा सांस्कृतिक कचाट्यात बिचारी सापडतात. भारतातच राहूनही आधुनिक जीवनशैली अन सांस्कृतिक प्रतीकांमधे ओढाताण करून घेणाऱ्या अनेक पतिव्रता ऑफिसला जायच्या आधी घाईघाईने वडाच्या थोटकाला तरतरा फेऱ्या घालीत गुदमरवून टाकतातच म्हणा, तिथे आपल्या सांस्कृतिक प्रतीकांचा खजिनाशोध विदेशात कसा खेळावा?!

आपल्या धार्मिक निष्ठा तपासून पहायला हव्या असे म्हणताच, “हे जाऊन त्या लांड्यांना सांगा” अशी गर्जना ऐकायला मिळते. मग सुरुवात नक्की कोणी करावी विचार करायला?!

धार्मिक निष्ठा कुठल्याही पाळीव अथवा वन्य प्राण्याशी, स्त्रियांच्या गुप्तांगांशी किंवा इतरांच्या सामिष-निरामिष आहाराशी जोडलेल्या असणं खरोखरच धर्मसुसंगत आहे का?! अजून तर्कसुसंगततेपर्यंतचा प्रवास तर बाकीच आहे.

इस्लाम धर्मीयांची मने राखण्यासाठी आपण पोर्क (डुकराचे मांस) कायद्याने निषिद्ध मानत नाही. जैन धर्मीयांचे मन राखण्यासाठी मांस, मासे, अंडी, दूध, दुधाचे पदार्थ, मध व अन्य प्राणिजन्य खाद्य पदार्थ, मेण, चामड्याच्या वस्तू इत्यादी बंद होत नाही. मग दुसऱ्यांनी गोमांस खाल्याने आम्हा हिंदूचे बरे पोट दुखते?! हिंदू बहुसंख्य आहोत म्हणून?!

ज्या हिंदूंना हे गोमातेचे प्रेम अचानक उफाळून आले आहे त्यांनी सावरकर कधी वाचलेच नाहीत. सावरकरांचे आडनाव त्यांना आवडत नसावे! वेद, वेदांत, त्यांवरील इतर भाष्ये, विवेकनंद यांना तर आम्ही विसरलोच कारण आम्हाला शिवाजी महाराजांच्या आधीचा-नंतरचा इतिहास जाणूनच घ्यायचा नाही. मग कुठल्या हिंदुत्वाचे हे रक्षक?! हिंदुत्व म्हणजे केवळ भगवा ध्वज, ढोल पथके, नऊवारी साडी, नथ, मंगळागौर, गाय अन प्रमाणभाषेच्या चिंधड्या उडवीत लिहिलेले भडक ई-मजकूर इतकेच का?!

अफगाणिस्तानापसून ते बालीद्वीपापर्यंत अनेकानेक संस्कृतींमधी विरघळून कित्येक शतके प्रवाही राहिलेले हिंदुत्व इतक्या तोकड्या प्रतीकांनी मर्यादले जात नाही. त्याच्या राखणीसाठी यांच्या दंडुक्यांची अन बेगडाने मढवलेल्या तलवारींची काहीएक गरज नाही.

आणि हो, या सगळ्याचा कुठला पक्ष सत्ताधारी आहे याच्याशी काही संबंध नाही. कारण जे आपण खोल, आत मनात म्हणत असतो पण करायचा धीर होत नाही, तेच आपले सत्ताधारी उघड उघड करत असतात. लोकशाही हा त्या अर्थी भस्मासुराला मिळालेला वर आहे! आता फक्त स्वत:च्या शिरावर हात ठेवण्याचीच खोटी!

मुळात आपणच जर एक नंबरचे स्वार्थी, लाचखोर, कोत्या मनाचे, नियमांतून पळवाटा शोधणारे, न्यायाची अजिबात चाड नसलेले अन वरकरणी संस्कृती, राष्ट्रप्रेमाचा आव आणणारे असू तर आपले शासन चालवणारे तसेच वागणार, आपल्याला चेतवण्यासाठी त्याच जुनाट प्रतीकांचा अजून उदो उदो करणार.

लोकांना झिंगवण्यासाठी सण, उत्सव, देव, देवता, सिनेमा, गाणी, टीव्ही, फेसबुक, मॉल्स, दारू, निवडणुका इत्यादी जामानिमा भरपूर आहे. कोण तो आपल्या फयद्यासाठी यशस्वीपणे वापरतो ते महत्वाचे.

स्वातंत्र्यदिनाची एक राष्ट्रीय सुट्टी असल्या विरोधाभासांनी भरलेल्या, “नाईलाज आहे” या वाक्याने प्रत्येक डोळस प्रश्न मोडीत काढणाऱ्या आपल्या सर्वार्थाने परतंत्र आयुष्याचा विचार करण्यासाठी वापरता येईल तर स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल तरी उचलले असे मला वाटेल.

आजचा दिवस माझ्या सत्तरीतल्या तरूण राष्ट्राला प्रेमादरपूर्वक समर्पित….

चहाटळ…

असं, नक्की कधीपासून ते नाही सांगता येणार पण हे प्रेमात पडायचं वेड लागलंच. सभ्यासभ्यतेच्या चौकटींनी मनाला बांधून घेण्याचा संस्कार झालेला असूनही हे खूळ कुठूनतरी वाट काढत मनात शिरलं. त्या नादाने साऱ्या चौकटी, मान मर्यादा झुगारून देऊन माझं मन ज्याच्या-त्याच्या प्रेमात पडायला लागलं….

भलतंच रंगेल आहे ते, असं माझ्या लक्षात येतंय. मित्र म्हणू नका, मैत्रिणी म्हणू नका… पुस्तकातल्या कथानायकांपासून ते पहाडात भेटलेल्या गवंड्यांपर्यंत कुणाच्याही प्रेमात!

सरळ बाईने सरळ बाईवर प्रेम करणं तसं सोपं, नुसत्या गप्पा छाटाव्या दिवसरात्र… एकमेकींना खायला-प्यायला करून द्यावं अन आपापल्या आवडत्या पुरुषांच्या चहाड्या कराव्या!!

सरळ पुरुषावर प्रेम करणं थोडंसं नाजुकच… इथे आपलं मादी असणं घुटमळत असतं मनात.

एखाद्याचे हात भलतेच सुंदर… राकट पण तरीही रेखीव, तसल्याच हातांत छिन्नी देऊन, कातळातून कोरून काढल्यागत….

कुणाचे डोळे घनगंभीर खोल… त्याने बोलतच रहावं माझ्याकडे पहात अन मी बुडून जावं त्याच्या त्या तसल्या डोळ्यांमधे…नुसतं हं हं म्हणत त्याच्या स्वगताची गाडी मी ढकलत राहते पुढे… आकंठ बुडालेली असतानाही!

कधी नुसत्याच आवाजाच्या प्रेमात… खर्जातला खरखरीत आवाज असतो काहींचा… नुसता दुरून ऐकला नं तरी माझ्या मऊ गालांवर त्याच्या दाढीची खुंट घासली की काय असं वाटावं…. असल्या आवाजाच्या माणासाशी रात्री उशीरा फोनवर बोलावं मुद्दाम… गोड घट्ट शांततेत तो तसला अशरीर आवाज नुसता कानांत ओतून घ्यावा….

अन त्यावरून आठवलं… नेमकं जे नसतं ते हवं वाटतं ते हे असं… बाईच्या जन्माला आलेय तर मला या पुरुषांच्या दाढी-मिशांचं वेड! गुळगुळीत घोटून दाढी केलेले पुरुष चांगले मित्र होऊ शकतात. पण तरीही ते आपले साधे… नॉर्मल लोकच राहतात माझ्या लेखी….

भरदार मिशीवाल्या पुरुषासमोर जे वाटतं ते काही वाटणार नाही त्यांच्याबद्दल, कि बाई याच्या मिशांचा पोत कसा असेल… मऊ की खरखरीत?! अंगावर कुठे, कशा फिरल्या तर नक्की कसं कसं वाटेल आपल्याला…. चेहरा मख्ख ठेवून त्याच्यासमोर रुक्ष पण भयंकर विद्वान काहीतरी बोलताना मनात हे असलं काहीतरी चालू! आतल्या चहाटळपणाला बाहेरून कडेकोट बंदोबस्त!

आता नॉर्मल लोक म्हणतील की, “छ्याह! हे काय प्रेम असतं का?! आजकालच्या पिढीची खुळचट फ्याडं!!” (बाईपणाचा समानार्थी शब्द, “मधेच डायव्हर्शन”: या नॉर्मल लोकांना गौरी देशपांडेंच्या पायाशी घालावं. माझ्या आजीच्या वयाच्या या बाईनी माझं शिस्तबद्ध गर्वहरण केलंय एके काळी! अन आता माझी पिढी ही झालीच की कालची!)

बरं मग ते म्हणतात तसं गंभीर प्रेमही करून पाहिलंय नं! जेव्हा एखाद्या पुरुषालाच माझ्यावर असं पिच्चरमधल्यासारखं प्रेम करावंसं वाटलं तेव्हा तसंही केलं की! अगदी पूर्ण झोकून देऊन! पण ते ही चुकलंच असावं… म्हणजे, रिलेशनशिप वगैरे ठीक आहे…. की बुवा, ही माझी गर्लफ्रेंड हं काय आजपासून! पण तिनं असं प्रेमात बेभान वगैरे काही होऊ नये. नॉर्मलच वागावं हे बरं. आता सिरियसली प्रेमात पडायचं ठरल्यावर मग पुन्हा नॉर्मल कसं वागायचं?!

बरं मी प्रेम करणार म्हणजे त्यापेक्षा सीमेवर जाऊन युद्ध केलेलं बरं. ही बया प्रेमात पडल्यावर जास्तच कशी भांडते?! काही पुरुष कसे रासवटपणे झोंबतात, तशा आम्ही काही बायका रासवटपणे भांडतो…(सन्मानीय अपवादांनी स्वत:ला सभ्यपणे वगळावं!) संस्कृतमधल्या प्रेम या अर्थी वापरलेल्या रागाला मराठीत बहुदा आम्हीच पार उलटलं असावं!

आपल्या आवडत्या पुरुषाशी जीव खाऊन भांडल्यावर त्याचे लाड करण्यात कोण सुख मिळतं ते आम्हालाच ठाऊक! त्या बिचाऱ्या नर प्राण्याच्या डोक्यात मात्र कणभर प्रकाश पडलेला नसतो बरेचदा. क्वचितच एखादा महापुरुष जन्माला येतो ज्याला ही स्त्री नावाची शक्ती नीट हाताळता येते… उद्रेक होऊ न देता तिच्या रासवटपणाला रिचवून घेणारा असा पुरुष खरा! इतरांनी तिच्या राग-अनुरागाचं गणित न मांडता फक्त ठरवावं की हे कोडं तुमच्या नशिबातला भोग की उपभोग.

हे सगळं लिहिताना खरंतर कंटाळाच आला होता… लेबलांचा कंटाळा. एक लेबल असं सोज्वळपणाचं… सभ्य, सात्विक, सोशीक बाई…. दुसरं लेबल असतं गावभवानीचं… चहाटळ, मनस्वी, उथळ, निलाजऱ्या बाईचं.

पहिली बाई बुद्धिवती असते, शब्द जपून वापरते, दुसऱ्यांचा विचार करते, तडजोडी करते….

दुसरी बाई अकलेनं कमीच, बोलायचं ताळतंत्र नसलेली, मन मानेल तसं वागणारी… बाईपणाला काळं!

कायम पहिली बाई असल्याचा दावा करून कंटाळा आला. बरेचदा असतेच की सात्विक अन विचारबिचार करणारी, म्हणून चहाटळ अन मनस्वी नसते असं वाटलं की काय?!

प्रत्येक बाईला ठाऊक असतं की या दोन्ही बायका आहेत तिच्या आत… पण दुसरीला आम्ही येऊच देत नाही नं बाहेर! मग ती चिडते, रडते…. भांडते…. अधिकच अगोचर असेल तर सगळ्यात आधी आपल्या आवडत्या पुरुषाच्या शेपटीलाच आग लावते!

मग जळू देत शेपट्या साऱ्या…. अन सारी अश्मीभूत लेबलं… ही होलिकादेवी ही बाईच नं!

तर…. ती तुमच्या शेपटाला लागलेली आग ही मीच अन तुमच्या जिभेवर विरघळणारी गोडघट्ट मिठाई देखिल मीच… असं आहे बघा!

समुद्रावरचे बंधारे…

अस्तित्वात नसलेल्या प्रिय “तुला”,

माफ कर हं, खूप दिवसांत, नव्हे, खूप वर्षांत मी काही लिहिलं नाही तुझ्यासाठी. तू कोण आहेस, कसा दिसतोस, मी वेड्यासारखं लिहिते ते तू वाचतोस की पान उलटून टाकतोस, हे काहीच माहिती नाही मला. पण जेव्हापासून मी स्वत:ला “मी” म्हणायला शिकले तेव्हापासूनच, तू, “तू” झालास. तेव्हापासून सतत अखंड बोलतेच आहे नं तुझ्याशी. तुला ही असली पत्रं लिहिणं तर माझा एकमेव आवडता चाळा!

तर, रागावू नकोस, मी लेखणी जरा टाकून दिल्याबद्दल…. तुला किस्से सांगण्यासाठीच तर आयुष्याचा विचित्र खेळ डोळे विस्फारून, जटा पिंजारून खेळते आहे नं!

लिहित नव्हते ती काही लिहिण्यासारखं काही नव्हतं म्हणून नव्हे. उलट या गेल्या काही वर्षांतच खरं आयुष्य जगायला शिकलेय…. शिकतेय. हे शिक्षण इतक्यात पुरं होईल अशी काही सुतराम शक्यता नाही. इथे मृत्यू हाच माझा पदवीग्रहण समारंभ! तेव्हा भेटूच कदाचित!

तर, लिहित नव्हते कारण, असं उगाच वाटत होतं की, माझे अजब अनुभव, त्यातून उचंबळून इतस्तत: विखुरणाऱ्या माझ्या भावना हे सगळं माझं गुप्त, व्यक्तिगत आयुष्य आहे. तुला अन पर्यायाने सगळ्या जगाला उघड्या करून दाखवाव्या अशा काही या गोष्टी नव्हेत.

प्रवाहाविरुद्ध वगैरे असली कितीही लेबलं लावली लोकांनी तरी तशी जनाची लाज बाळगूनच होते आजवर. माझे नियम, माझी मूल्यं…. लहानपणीपासून आजूबाजूच्या लोकांना पाहून बनवलेली, तरीही माझी स्वत:ची म्हणून ठामपणे धरून ठेवलेली मतं…. मतं कसली, माझे हट्टच! तर या सगळ्यांना अधुनमधून सुरुंग लागलाच पाहिजे. व्यस्त होते, ती या विस्फोटक कामांमधे…. तरीही तुझ्याशी संवाद सुटला नाही. थोडीशी लाज वाटत होती, म्हणून फक्त मनातच बोलत होते…. बौद्धिक चर्चा हिरिरीने करणारी वावदूक मी, भावनांच्या, माणसांच्या विश्वात मात्र पुरती भांबावून गेले रे…. शब्दच फुटत नव्हते इतके दिवस! कधीमधी खूपच उधाण आलं मनाला तर रडायचे, भांडायचे तुझ्याशी… तू उत्तर नाहीच द्यायचास, मग इतरांशी ही भांडायचे. मग फक्त मनातलं वादळ डोळ्यात आणून पहायचे तुझ्याकडे, मुक्यानेच. तुला काय कपाळ कळत असणार तूच जाणे! कधीकधी तुझ्या नजरेत धीर असायचा, मला तात्पुरता, उसना देण्यासाठी…. कधी तसंच अफाट प्रेम, मी तुझ्यावर करते तसलं….. कधी हसायचास माझ्या रडवेल्या तोंडाकडे पाहून…. मग अजूनच चिडायचे नं मी!

आता कदाचित माझ्याच भरती-ओहोटीला कमी घाबरायला शिकते आहे, म्हणून शब्द गवसताहेत. असे खवळलेले किनारे सगळ्यांच्याच मनाला असतात का हे नाही माहिती मला. पण, त्यात लज्जास्पद, गुप्त ठेवण्यासारखं काही असलंच पाहिजे का?! व्यक्तिगत गोष्टी, आपल्या भल्या-बुऱ्या भावना या लपवूनच का ठेवायच्या?

“राग, दु:ख, असूया, चीड यांची अभिव्यक्ती संयत, समाजमान्य शब्दातच करावी. प्रेम, आकर्षण, वेड, भक्ती यांना तर व्यक्त करूच नये.”

बुद्धीला आकळणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत सर्वमान्य गृहितकांना धुडकावून लावणारी मी, मनाला वाटणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत बावळटपणे लोकांच्या मताने का बरं वागले आजवर? मनाला बांध घालून त्याचं प्रवाही अस्तित्वच सपवून टाकलं असतं “त्यांच्या”सारखी वागत राहिले असते तर…. पण जसं माझ्या बुद्धीला पटेल तेच केल्याशिवाय मला राहवतच नाही, मग भले ते समाजमान्य असो वा नसो, तसंच मनाच्या बाबतीतही होतंय. ते तर माझ्या बुद्धीपेक्षाही अनावर रासवट ताकदीने फुरफुरणारं आहे! इतक्या सगळ्या बंधाऱ्यांना धडका देत, उसळ्या खात विध्वंस करत आहे…..

सगळे म्हणतात की बांध गरजेचे असतात, विध्वंस टाळण्यासाठी. मीही घालून घेतले शहाण्यासारखे. मात्र एखाद्याचं मन नसतंच नं झुळझुळणाऱ्या ओढ्यागत निमूट. काहीकाही मनं अशी असतात खवळलेल्या समुद्रासारखी कुठल्याच धरणांनी न धरली जाणारी…. बांधायला गेलं नं त्यांना तर अधिकच विध्वंस करणारी ही जंगली मनं फारच भयंकर.

त्या धरणातल्या भगदाडांनी झोप उडवली आहे माझी. अन तरीही भरतीच्या लाटा धडका मारतच आहेत… असा न तसा विध्वंस तर होणारच आहे हे दिसतंय की स्पष्टच! तर आता हळूहळू तुझं ऐकणार आहे मी अन हे सगळे बांध अन धरणं हळूहळू उतरवणार आहे. सोपं नाही ते काम कळतंय मला. पण आजवर धाडस कमी पडलं म्हणून माघार घेऊन कधी घरी येऊ दिलं नाही माझ्या जिवलगांनी…. तुझी नजर टाळून घाबरटपणा करत लपून बसले, तर मरेपर्यंत पुन्हा डोळे वर करून तुझ्याकडे पाहता येणार नाही. अन असली भयंकर शिक्षा मी काही मला देऊ शकत नाही.

प्रयत्न करेन…. धाडस करेन लिहायचं…. तू उत्तर द्यावंस अशी मुळीच अपेक्षा नाही, कधीच नव्हती. माझ्या विचित्र शब्दांनी, माझ्या उद्रेकांनी कधी तू दुखावून घेऊ नकोस स्वत:ला प्लीज. तेवढं एकच वचन दे मला. माझ्या विध्वंसक कल्लोळाच्या मध्यात तू असाच अविचल, अभंग रहा. पहात रहा असाच माझ्याकडे तुझ्या मऊशार डोळ्यांनी….

हजार भानगडी करूनही सदैव तुझीच,

मी.

पर्यावरण रक्षणासाठी नव्हे तर मानवी अस्तित्वासाठी…

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपणाच्या आकडेवाऱ्या आता सालाबादाप्रमाणे चर्चेला येतील. जागतिक परिषदांमधील चर्चेचे रकाने, पर्यावरण तज्ञांचे ईशारे प्रसिद्ध होतील. नेहमी प्रमाणे बहुतेक प्रश्नाचे खापर शासकीय अनास्था व उदासीनतेवर फोडले जाईल. पण त्यासोबत दिवसेंदिवस वरकरणी तरी वाढत चाललेल्या जागरूकतेतून आपल्या विचारसरणीत, पर्यावरण विषयक दृष्टिकोनात काय बदल होत आहेत याचाही वेध घेणे गरजेचे आहे. चर्चांपलीकडे आचरणात येणारे बदल, म्हणजेच जीवशैलीतील बदल हे आतून होणाऱ्या बदलांचे खरे निदर्शक असतात.

सध्याची  पिढी अधिकाधिक व्यवहारी होत जात असल्याची टीका अधूनमधून होत असते. अर्थात, आक्षेप व्यवहारीपणा वाढण्यापेक्षा संवेदनशीलता बोथट होत जाण्यावर अधिक असतो. मात्र याच व्यवहारी पिढीचा एक लहानसा पण संवेदनशील हिस्सा पर्यावरणाशी जवळीक साधण्यासाठी वेगळ्याच वाटा नक्कीच धुंडाळत आहे. यात उत्फूर्तताही आहे आणि सहजताही आहे.

जीवनशैली बदलाची सुरुवात

निसर्गस्नेही जीवनशैली ही अतिआदर्शवादी, अव्यवहारी लोकांचा चमत्कारिकपणा नसून एक सशक्त जीवन पर्याय म्हणून आत्मसात केली जाऊ शकते हे हळूहळू लक्षात येत जाते. मुळातच जीवशैली न बदलता निसर्गाच्या जवळ जाणे, त्याच्याशी “स्नेह” करणे शक्य नाही. निसर्गस्नेही जीवनशैली ही बदलांची शृंखला असते. सगळ्याच नैसर्गिक बदलांप्रमाणे हे बदल देखिल जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करणारे असतात. एकाच सरळ रेषेतले (लिनीयर) बदल नसून एकच चक्रीय (सायक्लिक) बदल असतो.

कचऱ्याचे व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, मृदा संवर्धन, निसर्गस्नेही अन्न उत्पादन, निसर्गस्नेही इमारत बांधणी हे सगळे अन असेच अनेक पैलू याला आहेत. यातील कुठल्याही एक पैलूने सुरुवात करता येते. परंतु जीवनशैलीतील असा बदल केवळ एकाच विषयापुरता मर्यादित ठेवता येत नाही. एकतर तो बदल स्थायी (सस्टेनेबल) रहात नाही, कालांतराने मागे पडतो. किंवा तो जीवनातील इतर पैलू बदलण्यास आपल्याला हळूहळू भाग पाडतो. प्रत्येक पुढच्या बदलाच्या उंबरठयावरच त्याचे अनेक पर्याय उभे राहतात. जीवनशैलीतील असे बदल हे सावकाशच झाले पाहिजेत. त्यांच्याशी जुळवून घेण्यास, मनापासून समजून बदल अंगिकारण्यास जो वेळ लागतो तो वेळ देखिल नैसर्गिक प्रक्रियेचाच भाग असतो. अनेक लोक उतावळेपणाने जीवनशैली बदलू पाहतात अन दोन-चार दिवसात मूळपदावर येतात, कारण निसर्गाच्या जवळ जाणारे बदल हे निसर्गाच्या नियमांशी फटकून होऊच शकत नाहीत !

शास्त्रीय माहिती न घेता, पर्यावरणाच्या ढोबळ, वरवरच्या कल्पना मोठ्या प्रमाणावर राबवत सुटल्यानेही निसर्गाशी स्नेह होत नाही. उलट त्यामुळे नुकसानच अधिक होते हे अभ्यासकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. जीवनशैलीतील आपल्याला अपेक्षित निसर्गस्नेही बदल हे अभ्यासपूर्वकच केले पाहिजेत. जनजागृती, पर्यावरण शिक्षण, जंगलांची पर्यायाने प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांची निगा, स्थानिक-पारंपारिक ज्ञानाचे जतन हे सगळे बदलांचे पैलू तिथून फार पुढे असले तरी ओघानेच येतात.

बदलाची गरज निसर्गाला नव्हे आपल्याला

मोजकेच का होईना परंतु आतापर्यंत सुखवस्तु पार्श्वभूमी असलेले साधेसुधे लोक या बदलांची सुरुवात स्वत:पासून करत आहेत. आपल्या तांत्रिक, व्यावसायिक कौशल्यांचा कल्पकतेने वापर करून स्वत:पुरती “कस्ट्ममेड” जीवनशैली निर्माण करत आहेत. निसर्गाच्या प्रेमाला व्यावहारिकतेची जोड देऊन चाकोरीबाहेर, मुक्त, आनंदात जगत आहेत! फारसा गाजावाजा न करता, जगाच्या लोंढ्याच्या न दिसणाऱ्या कडेकडेने हे लोक बदल घडवत असतात. दिलीप कुलकर्णींपाठोपाठ अदिती-अपूर्वा संचेती सारख्या नव्या पिढीतल्या अनेक लोकांनी आपली जीवनशैली बदलून नवा पायंडा पाडला आहे.

परंतु जीवनशैली बदलण्याच्या आपल्या हेतूकडे देखिल बारकाईने पाहिले पाहिजे. जगाला दाखवून देण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी वगैरे केलेले बदल टिकाऊ नसतात. मुळातच पर्यावरण वाचवणे हा एक वादाचा मुद्दा आहे. निसर्गाला आपल्या मदतीची गरज किती आहे यापेक्षा मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निसर्गाशी जरा जुळवून घेण्याची आपल्यालाच गरज किती आहे हा निसर्ग-अभ्यासकांचा खरा प्रश्न आहे! माळीण गावाची दुर्घटना असो किंवा केदारनाथची. तेथील लोक नैसर्गिक आपदेचे नव्हे तर मानवी हव्यासाचे बळी आहेत.

स्वत:च्या जगण्याचा दर्जा अधिक चांगला चांगला व्हावा, आपल्या विचार अन आचारात सुसूत्रता आल्याने जे स्थैर्य अन समाधान मिळते त्यासाठी आपण बदलत असू तर ते बदल सहज होत जातात. जगाच्या उलट दिशेला वाहणाऱ्या रेट्याचा फार त्रास होत नाही.

पर्यावरणस्नेही जीवनशैलीचे परिणाम

हळूहळू त्या बदलांचे कधीच लक्षात न आलेले चांगले परिणाम दिसून येतात. जीवनशैलीचा अमानवी वेग थोडा कमी होतो. त्यातून येणारा हताशपणा, निराशावाद कमी होतो. विचारांना, कल्पनाशक्तीला चालना मिळतच जाते. कंटाळा येणं, टीव्ही-फोन शिवाय अस्वस्थ होणं असले मानसिक आजार होत नाहीत! आपण जगाकडेच नव्हे तर स्वत:कडे देखिल संवेदनशीलतेने पहायला शिकतो. आपली राहणी आजच्या आज, आत्ताच्या आत्ता शंभर टक्के निसर्गस्नेही झालीच पाहिजे नाहीतर काहीच बदल करण्यात अर्थ नाही असला हेकेखोरपणा केला जात नाही! “एवढं असेल तर जंगलातच जाऊन का रहात नाहीस?!” असा फुकट सल्ला स्वतः ए.सी. मधे बसून देणाऱ्या लोकांकडे स्मितपूर्वक दुर्लक्ष करण्याची सिद्धी लवकरच प्राप्त होते.

आजूबाजूला असे बदल करण्यासाठी प्रयत्न करणारे अनेक लोक दिसत जातात. त्यांच्याकडे पाहून फक्त जीवनशैली बदलांचे वेगवेगळे पर्यायच मिळत नाहीत तर एक उभारी देखिल मिळते. अशा मैत्रांचे दिसून न येणारे परंतु घट्ट जाळेच विणले जात आहे…. या जाळ्यात एकमेकांच्या गरजेच्या, मात्र जगाच्या मुख्य प्रवाहात सहजी न मिळणाऱ्या सेवा-सुविधा उभ्या राहतात. बी-बियाणी, अवजारे अन पाककृतींपासून निसर्गस्नेही बांधकामापर्यंत अनेक प्रकारची माहिती, पर्यावरणाशी सुसंगत तांत्रिक मदत दिली-घेतली जाते. आपल्या आवडीच्या कौशल्यांचा निसर्गाशी संवेदनशील राहून प्रत्यक्षात उपयोग होऊ लागतो.

अतिरेकी हव्यासामुळे तंत्रज्ञान बदनाम

तंत्रज्ञान अन निसर्ग हे परस्पर विरोधी असल्याची ओरडदेखिल मुळातच खोटी आहे. मात्र जेव्हा तंत्रज्ञान विकसित करण्याचा हेतू जेव्हा अतिरिक्त फायदा मिळवण्याचा असतो तेव्हा तंत्रज्ञान निसर्गनियमाच्या विरुद्ध विकसित होऊ लागते. केवळ माणसाचा असा हावरटपणा अनैसर्गिक अन विरोधाभासी आहे. निसर्गाशी मैत्री केलेला माणूस तंत्रज्ञानाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. त्याचा विकास अन वापर केवळ गरजेपुरता अन स्वत:च्या तात्कालिक फायद्यापलीकडे सगळ्यांच्या दीर्घकालीन भल्याकरता करतो.

यात अव्यवहार्य, काल्पनिक अथवा अतिआदर्शवादी काहीच नाही कारण असे जीवन जगणारे लोक आपल्याच आजूबाजूला आहेत. ते असामान्य नाहीत, अतिश्रीमंत किंवा अचाट बुद्धिमान देखिल नाहीत. मात्र आपणच डोळे उघडून पाहण्याची, उठून आपल्या जीवनशैलीत स्वतःहून बदल करण्याची गरज आहे. अन्यथा निसर्ग तो बदल करण्याची सूत्रे हाती घेईल आणि माणसाला ते बदल अगतिकपणे स्वीकारावे लागतील !

“मन्दाकिनी की आवाज” बांधताना….

पुरानी दिल्ली स्टेशन, कमसम येथून नमस्कार!

आज इंटरनेट उपलब्ध आहे, स्थानबद्ध वेळ आहे अन दुसरं काही व्यवधान नसल्याने शहाण्यासारखी ब्लॉग लिहितेय! जरा जगाशी जोडल्यागत वाटतंय….

***

तर निघताना मी विचारलं, “मला जमेल का? काही चुकलं, गडबड झाली तर?!”

त्या म्हणाल्या, “तू काम कर फक्त. अनुभव महत्त्वाचा, त्यातून शिकत रहा, सगळं ठीक होईल”

हा अशीर्वाद अन चार कागदांवर रेखाटलेली स्केचेस एवढाच आधार घेऊन निघाले….

कारण यावेळी डीडीच्या हिमाचलमधून माझी उचलबांगडी झाली होती थेट उत्तराखंड राज्यात गुप्तकाशीजवळच्या गावात. “सेना गडसरी” गावाचं नाव खालच्या फाट्यावरच्या बाजारात देखिल कोणाला ठाऊक नाही, नकाशावर शोधायच्या फंदातच पडू नका!

या गावामधे गेलं वर्षंभर बेंगलोरच्या “पीपल्स पॉवर क्लेक्टिव्ह” या संस्थेचं त्रिकूट जाऊन राहिलंय. लंडनमधे बीबीसीसाठी दीर्घ काळ काम करून परतलेली रेडियो पत्रकार अन संस्थेची सह-संस्थापक, सरिता, वयाने सगळ्यात छोटी पण अतिविलक्षण श्वेता अन अबोल, शिस्तशीर तरी सौम्य स्वभावाचा त्यांचा इंजिनियर, विन्सेंट यांनी मिळून गावातल्या स्थानिक गढवाली लोकांना सोबत घेऊन एक सामुदायिक रेडियो केंद्र सुरू केलं.

सगळ्या सांस्कृतिक, भाषिक अन वैयक्तिक विसंवादातून संवादाचं एक माध्यम उभं राहिलं…..

रेडियो केंद्राचे सगळे कार्यक्रम हिंदी-गढवाली भाषेत, गावागावांत फिरून ध्वनिमुद्रित केले जातात. गाणी, कविता, नाटुकली अन विनोद यांचा देशी खजिना जमवला जातो अन रोज ठराविक वेळी “मंदाकिनी की आवाज”चे एकाहून एक वरचढ रेडियो निवेदक त्याचं प्रसारण करतात.

छोट्या गावात राहून एक स्वप्न पाहणाऱ्या मानविंदर नेगींसाठी त्या स्वप्नापासून प्रत्यक्षात रोज बोलणाऱ्या रेडियो केंद्रापर्यंत घेऊन येणारा प्रवास खूप अवघड होता. मानविंदरजी अन त्यांच्या पत्नी, उमादीदी यांचं व्यक्तिमत्त्वच रेडियोने पालटून टाकलंय!

वीज गेलेली असताना, मिणमिणत्या उजेडात चुलीतली लाकडं सरसावून रात्री आम्हाला “आलू के पराठे” रांधून घालणाऱ्या उमादीदीकडे पहात मी त्यांचं दिवसाचं रूप आठवायचे…

हातात लॅपटॉप घेऊन प्लेलिस्ट बनवणाऱ्या अन मधेच कोणी त्यांच्याशी बोलयला गेलं तर वर न पाहताच हाताने थांबवणाऱ्या व्यग्र उमादीदी….

असंख्य बटनांनी ग्रासलेल्या स्टुडियोत भारतीय बैठकीवर ताठ बसलेल्या, आत्मविश्वासाने निवेदन करणाऱ्या शांत उमादीदी!

कालपर्यंत स्वयंपाकघराबाहेर न ऐकला जाणारा त्यांचा आवाज मंदाकिनीच्या खोऱ्यात, घराघरांत जात असणार…

एका रेडियोने हे सगळं घडवलं!

पण या रेडियो केंद्राला इमारतीच्या रूपात घडवणं इतकं सोपं नाही, हे देखिल मला लवकरच समजलं! जन्माने मुलगी असणं अन वयाने फार प्रौढ नसणं हे एका आर्किटेक्टच्या कामातले सगळ्यात मोठे अडथळे असतात.

मुळातच आपल्याकडची कार्यसंस्कृती खूप किडवून ठेवली आहे आपण. आता तर ब्रिटिशांना दोष देण्याचीही पळवाट उरली नाही! श्रमाला कवडीची किंमत नाही अन दिल्या शब्दाला देखिल. काम करणाऱ्यांना अन काम करवून घेणाऱ्यांना देखिल कामाविषयी आस्था नसण्याचाच प्रघात आहे. तो मोडायचा म्हणजे, त्यापेक्षा हिमालय सर केलेला सोपा!

पण चांगल्या माणसांचं एक अदृष्य जाळं असतं, ते सगळ्यातून सांभाळून घेऊन जातं, जिथे जाईन तिथे! रेडियो स्टेशनच्या बांधकामावर नियमितपणे येणारे दोन सहायक (उद्धट मराठीत त्यांना मजूर म्हणतात) महावीरजी- प्रमोदजी इथे मदतीला आले. त्यांच्या भावकीतले जीतपालजी अतिशय सरळ, मेहनती अन सौम्य स्वभावाचे मिस्त्री आहेत. मला पाहताच बिडी विझवून लपवतात अन मला “जी सर” म्हणतात! माझ्या मुलगी असण्याबद्दल त्यांना काही आक्षेप नसणं हा देखिल एकत्र काम करण्याच्या दृष्टीने मोठाच घटक होता!

नकाशा समजावून सांगताना ते अतिशय शांतपणे लक्षपूर्वक ऐकतात. त्यांचे प्रश्न इतके वास्तववादी अन थेट असतात कि खूप विचारपूर्वक उत्तर द्यावं लागतं अन एका चांगल्या प्रश्नाचं उत्तर देता आल्याचा सुप्त आनंद होतो!

या काम करण्यातूनच खूप धीर आला मलाही. एकटीच बाजारात जाऊन, बांधकाम साहित्य विकत घेऊन, ट्रक भरून साईटवर आणत असे.

माझ्या बांधकामाच्या टीमसोबत खडी फोडली, वाळूचा ट्रक उतरवला, कॉक्रीट केलं, घमेली वाहून नेण्याच्या साखळीत काम केलं, दगडांचं बांधकाम, ज्याला “चिनाई” म्हणतात ते केलं…. गजांची जाळी बनवून जोत्याचा बीम भरला.

रोज आमच्या माणसांच्या आधी मी अन आमचा इंजिनियर, विन्सेंट साईटवर हजर रहात होतो. अन सारे घरी परतल्यावर, सगळी अवजारं जागच्याजागी गेल्याची खात्री करूनच आम्ही परत जात होतो. सारे चहा एकत्र पीत बसायचो, कामही एकत्र करायचो. एका पोळीवर मध्यात भाजी वाढून घेऊन उभ्यानेच खाऊन अख्खा दिवस काम चालायचं, पण कधीच कुणी तक्रार करत नसे.

याशिवाय सरिताने आधीच कल्पना दिल्याप्रमाणे, इतरही अव्हानं होती. रेडियो स्टेशनच्या स्थानिक भागीदार संस्थेचे लोक मातीच्या बांधकामाबद्दल खूप साशंक आहेत. अनेक पिढ्या दगड-मातीच्या घरांत राहिलेल्या गढवाली लोकांना आता शहरातल्यासारखी “पक्की” सिमेंटची इमारत हवी आहे. त्यांना शाब्दिक वाद घालून हे कसं समजावणार कि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेलं दगड-मातीचं बांधकाम अधिक चांगलं आहे?!

सुरुवातीला त्यांच्या विरोधाची तीक्ष्ण धार सहन करून उभं रहायचं होतं.

डिझाईनवर चर्चा करण्यासाठी बैठक ठरवली तर ते कधीच भाग घेत नसत, मात्र स्वयंपाकघरात, रात्रीच्या जेवणवेळेला वाद होत. आवाज चढत जात. माघार न घेता पण कोणावरही कुरघोडी न करता उत्तर देत राहणं अवघड होतं. कोण चूक, कोण बरोबर हे फाट्यावर मारून, आपण सगळ्यांनी मिळून, न भांडता “मन्दाकिनी की आवाज” बुलंद करायचा आहे, यावर अधिक जोर देत होते.

त्यांनी कितीही बोचरे प्रश्न उगारले तरी चिडता येत नाही त्यांच्यावर, कारण मुळात हे सतत बोचत असतं कि त्यांच्या चांगल्या इमारतीच्या कल्पना आमच्या शहरी लोकांनी बिघडवल्या….. चूक त्यांची नाही आहे.

मात्र बांधकामाच्या साईटवर मी स्वयंपाकघरातलं मवाळ रूप घरी विसरून पाऊल ठेवायचे. इथे चर्चांना, लोकांना समजावण्याला अजिबात जागा न देता, दिलेल्या सूचना अचूक पाळल्या जाणं महत्त्वाचं आहे. माझ्या बांधकामाच्या टीमसमोर मी स्थानिक लोकांच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देत नसे, कुठल्याही प्रकारची अरेरावी, उर्मटपणा खपवून घेत नसे.

हळूहळू ही सगळी शिस्त त्यांच्या पचनी पडत गेली. मला हाताने बांधकामावर काम करताना रोज रोज पाहून देखिल त्यांचा विरोध सौम्य होत गेला. हळूहळू त्यांच्याही नकळत गरजेच्या वेळी त्यांचे हात माझ्या मदतीला येऊ लागले…. स्वयंपाकघरात वादांची जागा चर्चा अन गप्पा घेऊ लागल्या! एका दिवशी, बांबूची झुलती बेटं फार सुंदर दिसतात यावर आमचं एकमत झालं अन चुलीवर एकदा केलेला फोडणीची पोळी नावाचा अजब पदार्थ, दुसऱ्या दिवशी परत करण्याची फर्माइश झाली!

एकीकडे या भेटीत ठरवलेलं काम पुरं होत होतं. डीडीच्या मनात जन्माला आलेली रेडियो स्टेशनची इमारत आता जमिनीवर डोकं काढतेय. पायाच्या खोदकामात निघालेले दगड, आसपास मिळणाऱ्या मातीच्या, न भाजता, उन्हात सुकवलेल्या विटा वापरून भिंती उभ्या राहतील. अन गावाबाहेर डोंगरात मिळणारा स्लेट दगड वापरून केलेलं छत डिसेंबर २०१४ पर्यंत होईल.

पाया अन जोत्याचं काम संपवून पी. पी. सी. च्या त्रिकूटाबरोबर उंडारायला बाहेर पडले. देहरादूनमधे दिवसाउजेडी दिव्यांच्या झगझगीत प्रकाशात उजळवलेल्या मॉल्स पाहून गुदमरत होते…. मात्र खूप दिवसांनी ताटाकडे लक्ष देऊन, पोटभर खातपीत होते!

दोन दिवस माझ्यासोबत ऋषिकेशला राहून बाकीचे आपापल्या कामाला निघून गेले, अन त्यानंतर मी खरी सैलावले! निवांत गाव पहात फ़िरले…. घाटावर गंगास्नान केलं, संध्याकाळी गंगामाईची आरती अन पात्रात झरत जाणारे द्रोणातले दिवे पहात बसले… रात्री कॅफे निर्वाणात इझरायली वादकांची उडती थिरकती मैफल जमत असे… हे खास ऋषिकेशमधलं सांस्कृतिक वैविध्य! असतीलही वाईट माणसं, पण मला मात्र सगळी चांगलीच भेटली. अपरात्री चांदण्यातून लक्ष्मण झूल्यावरून एकटीच चालत हॉटेलवर परत जायचे तेव्हा माझा एकांत छेदून कोणीसुद्धा वळून पहात नसे. मग पुन्हा हॉटेलच्या गच्चीवर रात्र पहात उभी रहायचे…. मागे हिमालय प्रचंड उभाआडवा पसरलेला अन पुढ्यात गंगामाई चांदणं लेऊन संथसंथ मऊ वहात असलेली…

काहीतरी आहे त्या पहाडात अन नदीत…. सरळसाधे डोंगर-नदी नाहीच येत त्यांना राहता! काहीतरी गारूड करून टाकतात माणसाच्या अस्तित्त्वावर… मग आपणही सरळसाधे माणूस रहात नाही….

जर खूप खूप पूर्वी, ते आतून थरथरून उठणं, नदी होऊन वाहणं, पहाड होऊन गगनाला भिडणं माणसाने गंगाकिनारी अनुभवलं असेल, अन त्याला हिंदू असणं म्हणलं असेल, तर ते त्या रात्रीगत तलम निळंहिरवं देखिल आहे…. पहाटेच्या रक्तिम भगव्याइतकंच!

आता ऋषिकेशहून घरी परतण्यासाठी दिल्ली गाठली आहे, गजबजलेली, येताजाता वरून खाली बेशरमपणे पाहणारी दिल्ली.

पुरानी दिल्ली स्टेशन, कमसम येथून आता निरोप घेते… पुन्हा पुढच्या प्रवासासाठी!

अम्मा अन्नपूर्णा

हे एक भाषांतर फार दिवसांपासून अधांतरी होते. पूर्ण करून ब्लॉगावर टाकेपर्यंत पुढच्या दक्षिणयात्रेची वेळ झाली आहे!! तरीही……
***

ते बाकी काही असो, आयुष्य ही एक खाद्ययात्राच असते! एका जेवणाकडून दुसऱ्या जेवणापर्यंत माणसाचा प्रवास निव्वळ पुढच्या मेजवानीच्या आशेवर होत असतो! तसं पाहिलं तर एकाच प्रवासाचं अनेक प्रकारे वर्णन करता येतं, पण या प्रवासाची गोष्ट मात्र चवीपरीने चाखता येईल अशी आहे!

असं म्हणतात कि साक्षात आदिशक्तीच माणसाच्या भौतिक गरजा जसे की भूक, भागवण्याचं काम करत असते. या समजामागे हेतू असा कि माणसाने आयुष्यात छोट्यामोठ्या गरजांपाठी धावत राहू नये. त्याच्या जगण्यामागे काही मोठा हेतू असावा. मनुष्य जर विश्वाच्या पसाऱ्यात काही कळीची भूमिका पार पाडत असेल तर विश्वच त्याचे क्षेम वहात असते. यात अंधविश्वासापेक्षाही साधा उपयुक्ततेचा विश्वनियम आहे. याला तुम्ही वैश्विक शक्ति म्हणा, मदर मेरी म्हणा, आदिशक्ति, अंबाबाई, ग्वादलूपे किंवा आई, आज्जी, काकी, मामी म्हणा! नाटकातले नट बदलत राहतात मात्र भूमिका तीच असते. कुणीही रांधले तरी शेवटी काय?! आपले पोट रोज भरले जाते.

तर ते दोन आठवडे माझेही पोटपाणी आदिशक्तीच्या कुठल्या ना कुठल्या रूपाने सांभाळलेच! ही एक मजेदार गोष्ट आहे जी पोटाला आत्म्याशी सांधून घालते!

पहिला एक आठवडा मी ऑरोविलमधे मातीचे बांधकाम शिकण्यात घालवला. माझा दिवस लेक्चर्स, केसस्टडी, डिझाइन स्टुडिओ अन भाराभार पुस्तके खाण्यात जात असे. असल्या बौद्धिक कसरतींशिवाय पहिले दोन दिवस ऑरोविलचा नकाशा मनात पक्का करणे, एका हातात टॉर्च धरून सायकल चालवणे इत्यादी कौशल्य शिकण्यात गेले. इथे एकापेक्षा एक वरचढ खायच्या जागा असल्या तरी मला झाडीतून निवांत सायकलवर फिरत त्या शोधण्याचा वेळ अजिबात नव्हता.

दगडी ब्रेडवर बटर अन जाम थापटून खाणे हा माझ्या रात्रीच्या जेवणाचा ठरलेला बेत होता. माझ्या खोलीच्या मध्यात फ़रशीवर, पुस्तकांच्या गराद्यात बसून मी रोज नित्यनियमाने ब्रेड बटर “जेवत” होते. बंद न करण्यासाठी बनवलेल्या खिडक्यांमधून डासांसोबत देशोदेशीचं संगीत खोलीत शिरत असे. फ्रेंच, इटालियन, ग्रीक किंवा मध्यपूर्वेतील लोकसंगीत हा माझ्या जेवणातला एकमेव नवा पदार्थ असे!

पण त्या एका आठवड्याची आठवण येतात मनामधे एकच चित्र उभे राहतं, अर्थ इन्स्टिट्यूटचं उजळ ग्रंथालय, तिथली नीरव शांतता भंग करण्याचे अधिकार फक्त चिरचिरत झाडांवर फिरणाऱ्या खारींना अन मोरांच्या केकांना आहेत. जेव्हा भोवतीच्या डहाळ्यांतून वाऱ्याची झुळुक फिरायची, तेव्हा पानातून गाळून खाली उतरणाऱ्या उन्हाचा सोनहिरवा नाच सुरू व्हायचा…

मातीच्या बांधकामावरच्या जगातल्या उत्तमोत्तम पुस्तकांच्या रांगांचा वास! या वासाला दिवसातून दोनदा खंड पडायचा, गरमागरम तामिळ कॉफीच्या सुगंधाने! इन्स्टिट्यूट्मधील दुपारचे जेवण हा एक साग्रसंगीत कार्यक्रम असतो. बांधकाम, पर्यावरण, देशोदेशीच्या कार्यसंस्कृतीचे अनुभव हे सारे  तिथला जागतिक विद्यार्थी समुदाय एका तितक्याच जागतिक खाद्यानुभवासाठी एकत्र जमतो! नारळाच्या दुधातले डोसे, “चपाथी”चे तामिळ रूप, भात अन सांबाराचे अनेक प्रकार! मात्र एका दिवशी पास्ता अन सांबार एकाच ताटात वाढून मिळाले तेव्हा मात्र मी हातच जोडले!

दुपारचे जेवण हेच एक खरे जेवण मिळणार असल्याने इन्स्टिट्यूटमधल्या अंजनी अम्माला मनोमन धन्यवाद दिले. जे काही रांधले असेल ते अम्मा एकदम हसऱ्या चेहऱ्याने वाढत असे! मी चुकून लायब्ररीतच खूप वेळ घालवला तर माझ्यासाठी राखून ठेवत असे…

तर अशा प्रकारे एक अभ्यासू अन भुकेला आठवडा संपत आला अन मी पॉंडिचेरीला जाऊन मनसोक्त खऊन घेण्याची संधी साधली! एका मस्त कोवळ्या सकाळी पॉंडिचेरीत पोहोचताच मी सरळ तामिळ रेस्टॉरंट गाठले. इडली वडा सांबरम अन गरम कॉफीच्या कपात मला, देवाशपथ, स्वर्गप्राप्तीच झाली. खरं सांगते, सांबाराच्या वाटीत कढिपत्त्याची फोडणी दिसली कि माणसाचा जगण्याचा दृष्टिकोनच सुधारतो!

गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या अबोल खाद्यप्रेमीचा एव्हाना ड्रायवरला अंदाज आला होता! त्याने दुपारच्या जेवणाला एका खास जागी गाडी थांबवली. हे एका फ्रेंच आर्किटेक्टने चालवलेले रेस्टॉरंट होते. अर्थात हे सांगण्याची गरज नाही कि हा गोरा देखिल ऑरोविलचाच आहे! फ्रेंचांची हलकाफुलकी पण रुचिपूर्ण सौंदर्यदृष्टी इथे पुरेपूर उतरली होती…त्यात तामिळ किनारपट्टीच्या बांधकाम कौशल्याची भर!

मी एका कोपऱ्यातल्या वेताच्या टेबलाशी जाऊन टेकले. अन मग बेसिल सॉसमधला मासा, उकडलेले बटाटे, फ्रेंच ब्रेड अन माणकं वितळवल्यागत हलणारी फ़्रेंच वाईन… तो तामिळ सर्व्हर मेन्यूवरील खास पदार्थ उत्साहाने सुचवत होता. हसऱ्या चेहऱ्याने खाऊ घालणाऱ्या आदिमातेच्या या रूपाला देखिल माझी काही म्हणता काहीसुद्धा हरकत नव्हती!

ऑरोविलमधून आपला गाशा गुंडाळण्यापूर्वी मी पूर्ण वसाहतीमधून एक फेरफ़टका मारला, ऑरोविलच्या सदस्य किंवा पाहुण्यांसाठी राखीव असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर भटकून आले. इथली शेवटची संध्याकाळ विझिटर सेंटरच्या मोकळ्या ढाकळ्या रेस्टॉरंटमधे घालवावी हे तर विचार न करताच मनाशी ठरून गेले होते. लाल मातीच्या ब्लॉक्स वापरून बांधलेल्या कमानी अन पुस्तकांच्या दुकानांनी वेढलेला लहानसा चौक म्हणजे हे रेस्टॉरंट. माडांच्या उंच खांबांमागे सूर्य मावळत होता. माझ्याभोवती रेस्टॉरंटची गजबज होती. टेबलावर एका कागदी कंदिलात दिव्याची ज्योत फुरफुरत होती. योगी अरविंदांच्या शिक्षणदृष्टीवर आधारित पुस्तकाला सोबत म्हणून डाळिंबाच्या रसाचा पेला अन केकचा तुकडा देखिल होते!

गेल्या काही दिवसात या आदिमायेने फक्त माझ्या पोटालाच नाही तर आत्म्याला देखिल खाऊ घातले होते. ती संध्याकाळ मी मनाशी जपून ठेवली आहे, आईच्या मऊ स्पर्शासारखी, शाळेत पोंक्षेसरांच्या घनदाट दाढीत हसणाऱ्या शाब्बासकीसारखी अन भविष्याच्या आश्वासक अभिवादनासारखी…

मी ऑरोविल सोडले तरी तिची हळुवार काळजी मला सोडत नव्हती. विमानवाल्या गारढोण सॅंडविचवर दिवस ढकलून मी त्रिवेंद्रममधल्या हॉटेलात सामान टाकलं अन सरळ जवळच्या खानावळीचा रस्ता धरला. खानावळीची मालकीण एक गोड मल्याळी बाई होती. तिच्या गजऱ्यातल्या जाईच्या सुवासाने मला खरोखर केरळात आणून ठेवले!

आपले मोठाले डोळे रोखून मालकीणबाईंनी माझी पूसतास केली. कित्येक तास आवरून धरलेली भूक मला नीटशी लपवता येत नाही बहुदा! तिने लगोलग माझ्या पनात भाताचा शीग लावला. दोन चार प्रकारची सांबारं अन केरळी चटण्या वाढल्या. मग गोड हसून तळलेल्या माशाचे दोन तुकडे देखिल वाढले, मी न मागता!! माझा अर्धा रडवेला अन अर्धा हसरा चेहरा काय ते सांगून गेला असावा कारण अम्हा दोघीत शब्दांची कुठलीच भाषा शक्य नव्हती!

त्रिवेंद्रमचे रिक्षावाले मात्र इतके हळुवार अजिबात नाहीत! अगदी पिसाळलेल्या वळूसारखे गाडी चालवतात! विचित्र पत्ते शोधून काढण्याच्या त्यांच्या हातखंडा कौशल्याशिवाय माझी लॉरी बेकर तीर्थयात्रा सफळ संपूर्ण झाली नसती हे मात्र इथे मान्य केले पाहिजे. चांगली टीप हवी असेल तर मला त्यातल्यात्यात अस्सल जागी खायला उतरवायचे हे त्या चलाख रिक्षावाल्याला अंतर्ज्ञानानेच कळले!

जेऊनखाऊन मी जेव्हा कन्याकुमारीला जाण्यासाठी गाडीत बसले तेव्हा मात्र झोप अगदी डोळ्यावर आली. कोवलमच्या समुद्रकिनाऱ्याचा खारा वारा अमली पदार्थागत काम करत होता. मधूनच जाग आली तर एक हिरव्या रंगाची सलग भिंत मागे धावत असावी तशा नारळीच्या बागा खिडकीतून दिसत होत्या. इतका हिरवा रंग पहात झोपलं तर स्वप्नसुद्धा हिरवी पडतात, मी खात्रीशीर सांगू शकते!

विवेकानंद केंद्राच्या शांत आवारात उतरले ती एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात अल्लद उतरावं तसंच काहीतरी. एका दीर्घ मुलाखतीनंतर ज्यात माझ्या भेटीच्या उद्देशापासून ते पूर्वजांपर्यंत सगळे सखोल चौकशी झाली, मला केंद्राच्या अतिथिगृहात रहायची परवानगी मिळाली. विवेकानंद केंद्राचं हे आवार म्हणजे एक छोटं शहरच आहे. कार्यकर्ते, सदस्य अन कर्मचारी यांशिवाय पाच हजार केवळ अतिथी एकाच वेळी इथे राहू शकतील! स्वच्छ नेटक्या खोल्या अन सुरेख खारा वारा, बस्स मी तर खूष होते.

सुरवातीची कडक चौकशी वगळता, एकदा आत घेतल्यावर मात्र केंद्राच्या लोकांनी भरभरून कोडकौतुक पुरवलं! सख्ख्या घरच्यागत खाऊपिऊ घातलं! विवेकानंद केंद्राचं कॅंटीन, “गौरीशंकर” ही एक अजब जागा आहे जिथे केंद्राचे कार्यकर्ते, पाहुणे, माझ्यासारखे विनाकारण अभ्यासू असले सगळे नमुने एकगठ्ठा सापडतात. गौरीशंकराचे लुंगीबद्ध म्यानेजर साहेब हसून मला टेबलापाशी बसवून गेले अन मला अचानकच मोकळं वाटू लागलं…..परकेपणा विसरूनच गेले मी! तिथला “लिमिटेड रैस मीळ” माझ्या पोटाच्या लिमिटच्या पलीकडेच होता. पण मी ताट कसंबसं रिकामं करतेय तोवरच वाढपी दादा आपल्या शुभ्र दंतपंक्ती दाखवीत भात वाढायला सरसावले. त्यांची “लिमिटेड” ची संकल्पना नक्की काय होती? माझ्यात ठासून भात भरून पाठवणे?! तोवर म्यानेजर साहेब माझ्यासाठी केळं घेऊन आले, “गुड फार डायजेशण्ण!” स्वत: एका केळ्याचा समाचार घेत म्हणाले!

मला एकटीला जेवायला आवडतं, कारण मग वाचता वाचता जेवता येतं. मात्र गौरीशंकरातल्या सगळ्यांना माझी ही खोड विचित्र वाटत असे. माझे “व्हायब्रेशन” म्हणे फार चांगले होते, असा अभिप्राय एका जेव्याने दिला तेव्हा मी सपाटच! आपल्याला बुवा लोकांची “व्हायब्रेशन” नुसार वर्गवारी करता येत नाही!

तिथे एक मलेशियन बाई येत असत. आपली चिनी नववर्षाची सुट्टी त्या केंद्रात योग व अन्य काहीबाही शिकण्यात घालवत होत्या. एक अत्तिशय चिवित्र कार्यकर्ता देखिल येत असे. तो अध्यात्म-भुकेल्यांची एक फेसबुक जत्रा चलवत असे. त्याने मलाही जत्रेत सामील करून घेण्याचा बराच यत्न चालवला. माझ्या “व्हायब्रेशन”चा परिणाम कि काय कोण जाणे! शेवटी हात जोडून स्पष्टच नाही म्हणल्याशिवाय काही लष्टकं सुटत नाहीत हेच खरं.

केंद्रात विवेकानंदांवर एक अतिशय सुरेख चित्रप्रदर्शन आहे. तिथल्या तिकीटमास्तरांनी मला “टॉप आर्किटेक्ट” होण्याचा आशीर्वाद दिला आहे! आहेम! मी त्यांना “असं टॉप नावाचं काही नसतं हो” असं समजावायचा वायफळ प्रयत्न केला…. पण जाऊदेत.

खूपदा जेव्हा तुम्ही सपक, साधं, अनग्लॅमरस खरं बोलता तेव्हा लोकांना तो तुमचा मानभावीपणा वाटतो अन अधिकच पंचाईत होते! मग ती मोठेपणाची अवजड टोपी घालून घेण्यावाचून पर्यायच नाही उरत. त्यात काही गौरवाची भावना होत नाही, तर अतीगोड औषध प्याल्याची भावना होते….. नंतर जिभेवर कडवटपणा रेंगाळवणारं मिट्ट गोड औषध…..

त्यांची निरागस सद्भावना माझ्या फटकळपणाने का दुखवा असा विचार करून मी माझा जुनाच निरागस बहिरेपणाचा आव आणून प्रश्न निकालात काढला. हे सगळेच लोक मला गोड हसून सामोरे आले, माझ्याशी फार प्रेमाने वागले. त्यात त्यांचा काहीही हेतू नव्हता, माझ्याकडून मिळण्यासारखं काहीएक नव्हतं. मी केवळ एक पाहुणी होते, दोन चार दिवसात कायमची निघून जाणारी…. तरीही त्यांच्यासाठी मी परकी नव्हते…..पुन्हा “व्हायब्रेशन”चा परिणाम बहुदा!!!

केंद्राला भेट देण्याचा माझा मुख्य हेतू होत वासुदेवजींची भेट घेणे. विवेकानंद केंद्राच्या natural resource development प्रकल्पाचे प्रमुख अन अनेक भाषा ज्ञात असलेला हा एक सुरेख माणूस जो organic architecture बद्दल एक आनंददायी जीवनानुभव असल्यागत बोलतो!

त्यांच्याच हाताखाली बांधला गेलेला “technology research center” चा परिसर हे पर्यावरणपूरक वास्तुरचनेचं एक सरळसोट उदाहरण आहे! सिस्टर सरस्वथी तिथल्या व्यवस्थापनाची जबाबदारी पाहतात. मी त्यांना प्रथम भेटले तेव्हा ही चिटुकली बाई स्वयंपाकघरामागे “हरिभजनम” गुणगुणत “पाप्पडम” तळत बसली होती. सरस्वथीअक्कानी मला “सगळा परिसर पाहून जेवायला इथे ये” अशी आज्ञा केली. मी बारीक आवाजात “कँटीनमधे जाईन मी” असं पुटपुटले मात्र अन ती आदिमाया आपले काजळ रेखलेले डोळे माझ्यावर वटारून म्हणाली, “अम्मा जेव्हा आमच्या सोबत जेवायची आज्ञा करते तेव्हा नाही म्हणायचं नसतं”. मी बिचारी काय बोलणार! त्या अम्माने पुन्हा डोळे वटारू नयेत अशी प्रर्थना करून स्वयंपाक घरात मदतीला सरसावले.

एकदा मी जेवणाला थांबायचे कबूल केल्यावर मात्र सरस्वथीअक्का एकदम खुषीत आल्या अन म्हणाल्या कि तुमचं पुणं फारच बाई बकवास शहर आहे. मी लगोलग मनापासून हो म्हणून टाकलं!! मग त्या म्हणाल्या कि आर्किटेक्ट लोक फारच उपद्रवी जमात असते. मी त्यालाही मान डोलावली! अन अशा प्रकारे आमच्यात एकमत झाल्याने सुसंवाद प्रस्थापित झाला! अक्कांच्या ताबेदारीत मी “कुंजुम” तामिळ देखिल शिकून घेतलं. “मोदुम” म्हणजे ताक अन “पोडुम” म्हणजे पुरे झालं. माझं तामिळचं अज्ञानप्रदर्शन देखिल इथेच पोडुम झालं.

हळूहळू अक्कांचं सगळं जग माझ्यापुढे उलगडू लागलं. त्यांची झाडं, त्यांचे लोक, त्यांचे विद्यार्थी, त्यांचं स्वयंपाकघर, पाळलेली मांजरं, पक्षी…. अन मी देखिल…. सरस्वतीअक्कांनी त्यांच्या नकळतच मला माझ्या सगळ्या प्रवासांचं सार काढण्यापर्यंत आणलं…. इतके दिवस मला का अन कोण जेऊ घालत होते याचा आश्चर्यकारक उलगडा त्यांच्या रागे भरण्यातून होऊ लागला आहे. जेवणाची किंमत हजार रुपये, चाळीस रुपये किंवा नुसताच एक रागीट कटाक्ष असो, मात्र या दक्षिणयात्रेत मला दररोज जेऊ घातले गेले. काहीतरी कारण नक्कीच असणार…..

शेजार….

माणसांच्या आयुष्याचे…. त्यांच्या बरोबर-चूकचे संदर्भ असतात वेगवेगळे. सरळ आयुष्याला कौतुकमिश्रित तिरस्कार वाटतो आडनिड्या वाटेने भटकणाऱ्या स्वच्छंदी आयुष्याचा…. अन मुक्तपणे विहरत उलघडत जाणाऱ्या आयुष्याला त्याच सरळ आयुष्याच्या स्थिरतेचे….. विश्वासाचे असाध्य अप्रूप असते….

माझ्या शेजारणीला षोक आहे स्वच्छतेचा….. माझ्याहूनही जास्त! तिच्या दाराखिडक्यांनाच काय सभोतीच्या भिंतीना देखिल तिच्या भुश्शकन पाणी ओतणाऱ्या बादलीची सवय! बरं पुन्हा तिच्या स्वच्छतेचे शिंतोडे माझ्या घरात उडले तर काय फरक पडणार असा?!

असंही माझ्या घराला स्वच्छतेच्या शिस्तीपेक्षा लहरी नादिष्टपणाचेच अधिक डोहाळे….. मग तिच्या घरातून अलगद वाऱ्यावर स्वार होत आलेल्या कचऱ्याचा अनमान कसा करावा, तोही निमूट माझ्या केराच्या टोपलीत जाऊन बसतो….. शेवटी आम्हा दोघींची घरे स्वच्छ झालीच ना!

माझ्या बागेतल्या कचऱ्याच्या वाफ्याशी मात्र सखी शेजारणीचे कट्टर वैर आहे…. जिथे मला ओल्या कचऱ्यापासून पाहता पाहता उमलणारी मोगऱ्याची फुलं दिसतात तिथे तिला कांद्याची साले, मटाराची टरफले अन असलंच काहीबाही दिसतं…..

चौदा वर्षात हळूहळू कंपोस्टच्या वासावर माझे प्रेम जडले आहे! इतका मऊसूत, जमिनीशी बांधलेला, मार्दवी वास लोकांना दुर्गंध कसा वाटू शकतो असा कैक वेळा विचार करून पाहिला…. पण तरीही पुन्हा मातीत हात घालताना सुखाची शिरशिरी आल्याखेरीज रहात नाही! शेजारीण मात्र पहात असते तिला शिसारी आल्यागत!!

कदाचित माझ्या हसण्याची बाधा तिला होऊ नये म्हणून आठ्यांचे संरक्षण घेत असावी!

मला मात्र कचऱ्यावर पोसलेल्या अळूचे, दोडक्या-कारल्यांच्या वेलींनी घातलेल्या वळ्से-वेलांटयांचेच कौतुक….. कचऱ्यातच पडलेल्या मिरच्यांच्या बिया रुजून जेव्हा चांदणीदार फुलोरे वाऱ्यावर डोलले तेव्हा तर आमच्या घरात नव्या बाळजन्मागत आनंद झाला साऱ्यांना….. त्या झुडपातल्या मिरच्या शोधून तोडून स्वयंपाकघरात नेल्या जात तेव्हा उगाच स्वयंपाक अधिक चांगला झाल्यागत वाटत असे….

या बागेत मी हौसेनी लावलेल्या रोपा-झाडांपेक्षा स्वत:च्या मर्जीने मूळ धरणाऱ्या उत्साही झाडांचेच राज्य अधिक चालते! त्याभोवतीच्या पसाऱ्यात आमच्या घरातल्या इतर छंदांचे अवशेष सापडतात ते वेगळेच! गेल्या चैत्रातल्या मातीकामाचे वेडाचे भेगाळलेले नमुने, पुनरुज्जीवनाची वाट पहात बसलेल्या फुटक्या कुंड्या, गेरूची सुकली ढेकळं अन मातीच्या गिलाव्याची नवी पद्धत आजमावून पाहताना भिंतीवर केलेले नमुन्याचे सारवण!

तिथंच मांडी ठोकून चहा घेत, आपल्याच पसाऱ्याचे कौतुक करत, येत्या रविवाराला आवराआवरीचे खोटेच वचन देत मी रोजची सकाळ घालवते! टागोरांच्या पोरवयापासून ते रविवार लोकसत्तेच्या पुरवण्यांपर्यंत साऱ्या “साहित्यावर” माझ्या बागेच्या मातीचे शिक्कामोर्तब कधीनाकधी होतेच! आमच्या घरातून नव्या जुन्या गाण्यांच्या लकेरी आकंठ येत राहतात जाग असेपर्यंत सारा वेळ….. अन असल्या पावसाळी हवेत इथे उंच डोंगरातून जेव्हा वारा घुमतो तेव्हा दुपारच्या नीरव शांततेलाही कसलीशी राकट, आदिम नैसर्गिक ओढ लावून जातो…. झुळकेवरला श्रावणगंध हुंगून मन भरत नाही….

सारे आकाश ढगाळ ढगाळ…. अन बाहेरच्या कदंबावर फुलोऱ्यांचे चेंडू लटकत असतात वाऱ्यावर झोके खात! सकाळी थोडे जरी ऊन आले तर त्यांवर झुंबड उडते पक्षी, फुलपाखरं अन मधमाश्यांची! खिडकीत अडकावलेल्या खोक्याच्या घरट्यातून चिमणा-चिमणीची पोक्त लगबग चालूच असते….. खाली दरीत माझं लाडकं पुणं उन्हाची वाट पहात सुस्तावलेलं…… कट्ट्यावर आमचा शुभ्र पांढरा बोका देखिल तसाच पहुडलेला, उन्हाची तिरीप आलीच एखादी तर पाठीवर लोळून सूर्यस्नान घेणारा!

मग मीही नि:श्वास सोडत वेताच्या झुल्यात अंग सोडून देते….पुढच्या रविवारच्या सफाईचे नियोजन करत करत डोळा बरा लागतो! जाग येते तेव्हा मी कौतुकाने पहाते तिच्याकडे, शेजीबाई मात्र घसघसून खिडक्या पुन्हा धूत असते आठ्या घालून!