शेजार….

माणसांच्या आयुष्याचे…. त्यांच्या बरोबर-चूकचे संदर्भ असतात वेगवेगळे. सरळ आयुष्याला कौतुकमिश्रित तिरस्कार वाटतो आडनिड्या वाटेने भटकणाऱ्या स्वच्छंदी आयुष्याचा…. अन मुक्तपणे विहरत उलघडत जाणाऱ्या आयुष्याला त्याच सरळ आयुष्याच्या स्थिरतेचे….. विश्वासाचे असाध्य अप्रूप असते….

माझ्या शेजारणीला षोक आहे स्वच्छतेचा….. माझ्याहूनही जास्त! तिच्या दाराखिडक्यांनाच काय सभोतीच्या भिंतीना देखिल तिच्या भुश्शकन पाणी ओतणाऱ्या बादलीची सवय! बरं पुन्हा तिच्या स्वच्छतेचे शिंतोडे माझ्या घरात उडले तर काय फरक पडणार असा?!

असंही माझ्या घराला स्वच्छतेच्या शिस्तीपेक्षा लहरी नादिष्टपणाचेच अधिक डोहाळे….. मग तिच्या घरातून अलगद वाऱ्यावर स्वार होत आलेल्या कचऱ्याचा अनमान कसा करावा, तोही निमूट माझ्या केराच्या टोपलीत जाऊन बसतो….. शेवटी आम्हा दोघींची घरे स्वच्छ झालीच ना!

माझ्या बागेतल्या कचऱ्याच्या वाफ्याशी मात्र सखी शेजारणीचे कट्टर वैर आहे…. जिथे मला ओल्या कचऱ्यापासून पाहता पाहता उमलणारी मोगऱ्याची फुलं दिसतात तिथे तिला कांद्याची साले, मटाराची टरफले अन असलंच काहीबाही दिसतं…..

चौदा वर्षात हळूहळू कंपोस्टच्या वासावर माझे प्रेम जडले आहे! इतका मऊसूत, जमिनीशी बांधलेला, मार्दवी वास लोकांना दुर्गंध कसा वाटू शकतो असा कैक वेळा विचार करून पाहिला…. पण तरीही पुन्हा मातीत हात घालताना सुखाची शिरशिरी आल्याखेरीज रहात नाही! शेजारीण मात्र पहात असते तिला शिसारी आल्यागत!!

कदाचित माझ्या हसण्याची बाधा तिला होऊ नये म्हणून आठ्यांचे संरक्षण घेत असावी!

मला मात्र कचऱ्यावर पोसलेल्या अळूचे, दोडक्या-कारल्यांच्या वेलींनी घातलेल्या वळ्से-वेलांटयांचेच कौतुक….. कचऱ्यातच पडलेल्या मिरच्यांच्या बिया रुजून जेव्हा चांदणीदार फुलोरे वाऱ्यावर डोलले तेव्हा तर आमच्या घरात नव्या बाळजन्मागत आनंद झाला साऱ्यांना….. त्या झुडपातल्या मिरच्या शोधून तोडून स्वयंपाकघरात नेल्या जात तेव्हा उगाच स्वयंपाक अधिक चांगला झाल्यागत वाटत असे….

या बागेत मी हौसेनी लावलेल्या रोपा-झाडांपेक्षा स्वत:च्या मर्जीने मूळ धरणाऱ्या उत्साही झाडांचेच राज्य अधिक चालते! त्याभोवतीच्या पसाऱ्यात आमच्या घरातल्या इतर छंदांचे अवशेष सापडतात ते वेगळेच! गेल्या चैत्रातल्या मातीकामाचे वेडाचे भेगाळलेले नमुने, पुनरुज्जीवनाची वाट पहात बसलेल्या फुटक्या कुंड्या, गेरूची सुकली ढेकळं अन मातीच्या गिलाव्याची नवी पद्धत आजमावून पाहताना भिंतीवर केलेले नमुन्याचे सारवण!

तिथंच मांडी ठोकून चहा घेत, आपल्याच पसाऱ्याचे कौतुक करत, येत्या रविवाराला आवराआवरीचे खोटेच वचन देत मी रोजची सकाळ घालवते! टागोरांच्या पोरवयापासून ते रविवार लोकसत्तेच्या पुरवण्यांपर्यंत साऱ्या “साहित्यावर” माझ्या बागेच्या मातीचे शिक्कामोर्तब कधीनाकधी होतेच! आमच्या घरातून नव्या जुन्या गाण्यांच्या लकेरी आकंठ येत राहतात जाग असेपर्यंत सारा वेळ….. अन असल्या पावसाळी हवेत इथे उंच डोंगरातून जेव्हा वारा घुमतो तेव्हा दुपारच्या नीरव शांततेलाही कसलीशी राकट, आदिम नैसर्गिक ओढ लावून जातो…. झुळकेवरला श्रावणगंध हुंगून मन भरत नाही….

सारे आकाश ढगाळ ढगाळ…. अन बाहेरच्या कदंबावर फुलोऱ्यांचे चेंडू लटकत असतात वाऱ्यावर झोके खात! सकाळी थोडे जरी ऊन आले तर त्यांवर झुंबड उडते पक्षी, फुलपाखरं अन मधमाश्यांची! खिडकीत अडकावलेल्या खोक्याच्या घरट्यातून चिमणा-चिमणीची पोक्त लगबग चालूच असते….. खाली दरीत माझं लाडकं पुणं उन्हाची वाट पहात सुस्तावलेलं…… कट्ट्यावर आमचा शुभ्र पांढरा बोका देखिल तसाच पहुडलेला, उन्हाची तिरीप आलीच एखादी तर पाठीवर लोळून सूर्यस्नान घेणारा!

मग मीही नि:श्वास सोडत वेताच्या झुल्यात अंग सोडून देते….पुढच्या रविवारच्या सफाईचे नियोजन करत करत डोळा बरा लागतो! जाग येते तेव्हा मी कौतुकाने पहाते तिच्याकडे, शेजीबाई मात्र घसघसून खिडक्या पुन्हा धूत असते आठ्या घालून!

ग्रामपरीच्या प्रकरणात अधिक खोलवर….

भाग १: ग्रामपरीच्या प्रकरणात…

एमआरएचं आवार गेल्या चाळीस वर्षात राखलेल्या झाडांची फुला, पक्ष्यांनिशी नांदती राई आहे. इथे सकाळी, संध्याकाळी, रात्रीच्या शांततेत….कधीही एकांत धावून येतो, जिवलग मित्रागत! मला तर या एकांतात इथल्या पायवाटांनी भिरीभिरी फिरतच रहावंसं वाटतं!

एखाद्या पायवाटेवर मधेच अचानक गुलमोहराचा भडक लालबुंद तुरा उगवलेला असतो…. तर वळणापलीकडे जॅकरांडाने निळ्या जांभळ्या मखमलीच्या पायघड्या घातलेल्या असतात…मधेच जणू आहेत ते रंग कमीच पडले असावेत असा बहाव्याचा सोनपिवळा संभार उसळून येतो! माझ्या कमळांच्या तळ्याभोवतीची झाडी पाण्यावर ओठंगलेली असते…. त्यात धिटाईने नाचणारे दयाळ अन बुलबुल माझ्याकडे तुच्छ दुर्लक्ष करतात! त्याच झाडांत राहणारा एमआरएचा निवासी पॅराडाइझ फ्लायकॅचर एखाद्या सेलिब्रिटीसारखा क्वचित दर्शन देतो! कुण्या रसिकाने त्याचं नाव स्वर्गीय नर्तक ठेवलंय कोण जाणे….पण त्याचे कमनीय विभ्रम मी फक्त मुक्याने पाहून घेतले आहेत. सौंदर्याच्या पुराव्यासाठी फोटो काढत बसण्याइतकी जागरूक पर्यावरणप्रेमी नाहीच बहुदा मी!

संध्याकाळी एखाद्या पायवाटेनं जरा लांबवर गेले तर रानमोगऱ्याने सगळा सुवासिक दंगा घातलेला असतो! करवंदी अन जांभळांचे घोस पाहून आताशा हरखून जाणं बंद केलंय मी…. त्या झाडांवर माझ्यापेक्षा अधिक अवलंबून असलेले पक्षी, किडे अन छोटी पोरं जास्त महत्त्वाची आहेत!

अर्थात निसर्गवर्णनात मला आग्या माश्यांचा उल्लेख मोठ्या आदराने केला पाहिजे. या वात्रट माश्यांनी माझ्या सकाळच्या “वॉक”चा “जॉग” केला होता! त्यांची घोंघों माझी पाठ सोडत नव्हती अन मग धूम पळत खोलीत जावं लागलं होतं!!

माझी रहायची व्यवस्था “व्हॅली व्ह्यू” नावाच्या इमारतीत आहे. इथून पाचगणीची हिरवीगार दरी दिसते हे पुन्हा सांगायला नकोच. वळवाचा पाऊस अन गारा या दरीतून उसळी खात अंगावर धावून येतात तेव्हा मात्र “रौद्र” या शब्दाचा अर्थ नीट कळतो!

अजून देखिल खूप आवडीच्या जागा आहेत माझ्या या आवारात विखुरलेल्या…. सोनचाफ्याच्या झाडाखाली गोलाकार लावलेले बाक, बॉटलब्रशच्या झिपऱ्या झाडाखाली गप्पांच्या आमंत्रणासारख्या रेंगाळलेल्या खुर्च्या…

अन ग्रामपरीच्या शेतांभोवती अती सलगीने वावरणारे मोर! आवारातच उंडारणारे दोन चार भटके कुत्रे कंटाळा घालवायला या मोरांच्या मागे लागतात. पण हे अगोचर पक्षी आपला अवजड संभार घेऊन मोठ्या चपळाईने उंच कुंपणावर जाऊन बसतात….. तेही मोठ्या तोऱ्यात! यातल्या एका बेट्याने ग्रामपरीत काम करणाऱ्या मावशींच्या मागे मागे फ़िरून त्यांना चोची मारून अगदी वैताग आणला होता म्हणे!

क्वचित कधीतरी त्यांच्या आर्त केका साऱ्या दरीत घुमून येतात…. एखाद्या ढगाळ संध्याकाळी तो आवाज मन ढवळून काढतो…. काहीतरी सलणारं, एरव्ही मनाच्या कोपऱ्यात अडगळ म्हणून सारलेलं वर येऊ पाहतं…. मात्र असल्या सुंदर जागी दुखऱ्या आठवणी देखिल नकोश्या होत नाहीत…. बरंवाईट सगळंच आपलंसं होऊन जातं….माझ्या अस्तित्वासाठी पूरक होऊन जातं….

***

ग्रामपरीच्या सेंद्रीय शेतात काम करणाऱ्या  सुनीताताईंच्या (नाव वेगळं आहे) घराची दुरुस्ती चालू आहे. त्यात मदत करायला सौम्या (ग्रामपरीच्या “वॉश” प्रकल्पाची प्रमुख), मला घेऊन गेली होती. सुनीता ताई अन त्यांच्या नवऱ्याची मिळून मासिक कमाई दहा हजार पण नाही. घरात स्वत:ची अन नात्यातली मिळून पाच लहान मुलं आहेत. वाटणीत मिळालेला घराचा पडका भाग दुरुस्त करण्यासाठी अन नवीन शौचालय बांधण्यासाठी त्यांना ग्रामपरीतले सगळे मदत करत आहेत. सौम्या अन मी सुनीता ताईंच्या घरी गेलो तेव्हा जोरदार पाहुणचार झाला…. आमच्यासाठी ते माझाच्या जातीतलं मॅंगो ड्रिंक आणण्यात आलं…. त्या पडक्या घरात माझाची बाटली चकाकत होती… मात्र अजिबात शोभत नव्हती….उगाच मला टोचत होती! सौम्याने मला डोळ्यानेच दटावले. पाहुणचार नाकारून त्यांचा अपमान करणे अधिक वाईट आहे. पण आम्हा दोघींनाच ते सरबत अजिबात गिळवेना. मग सुनीता ताईना मी अजून थोडे कप आणायला सांगितले. सौम्याने सगळ्यांसाठी थोडं थोडं ओतलं. तिच्या सहजतेनं, मोकळ्या आपुलकीनं सगळे आपपर भाव पुसून टाकले! माझाच्या पार्टीवर पोरं जाम खूष होती! त्यांचं शुभ्र हसू पाहून माझा कडवटपणा कमी न होता तर काय!

आज पुण्यात कतरीना कैफचं माझाच्या जाहिरातीचं मोठ्ठं होर्डिंग अन त्याच्या भोवतीचा झगझगीत उजेड पाहिला कि….त्या घराच्या पडक्या भिंती आठवतात….

मोठ्ठा प्रश्न उगारावासा वाटतो विकासाच्या, सुखाच्या उपऱ्या कल्पनेवर!

हे ग्रामपरी प्रकरण फार जड जाणार आहे मला….
***
पाचगणीत महागडं ग्रिल्ड सॅंडविच, स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाणे, अवाच्या सवा किमती लावलेल्या अनावश्यक वस्तू खरेदी करणे हे सगळं पूर्वी केलंय मीही. पण माझ्या भोवतीच्या आवाराने आता मला इतकं घट्ट गुंतवून ठेवलंय कि गेल्या दोन महिन्यात मी एकदाही बाजारात गेले नाहीये. अद्याप काहीही खरेदी केलं नाहीये…. अन तेव्हापेक्षा मळक्या कपड्यात, चिखला मातीत, साध्या चपला घालून मी अधिक आनंदात आहे…. हे कसं काय?!
आता पाचगणीच्या बाजारात आनंद विकत घेता येणार नाही का मला?! पाचगणीतल्या महागड्या हॉटेलांना विकण्यासाठी आसपासच्या गावातून पाणी उपसून आणणारे टॅंकर, त्या गावातला वर्गसंघर्ष, राजकारण, पाण्याचं विकृत असमान वाटप…. दरवर्षी आटत चाललेल्या, पाण्याच्या हावेपोटी अधिक खोल अधिक रुंद होत असलेल्या विहिरी विसरताच येणार नाहीत?!

पाचगणीतल्या हिरव्या जंगलावर कडी करून उगवणारे अत्याधुनिक गृहप्रकल्प…. त्यांच्या सिमेंटने माखलेल्या उजाड जमिनी…. जांभ्या दगडाच्या हावेपोटी कुरतडून खाल्लेले सह्याद्रीचे लचके….

डोळ्यासमोर वणव्यात भस्मसात झालेली साडेतीनशे देशी झाडांची रोपं…. स्ट्रॉबेरीच्या अतिरिक्त लागवडीने गिळून टाकलेले डोंगरउतार…. उजाड झालेली टेबल लॅंड, हरवलेली जंगलं…. कायमचे उडून गेलेले पक्षी…. यांचा सगळ्याचा हिशेब पाचगणीच्या बाजारात मिळेल का मला?!

अस्वस्थ करून सोडणाऱ्या खूप गोष्टी आहेत इथल्या साजऱ्या पर्यटनाच्या चेहऱ्यामागे….. त्यांचे सगळे वाभाडे इथे काढणं कदाचित योग्य नाही…. माझ्या लोकांना त्याचा त्रास होता कामा नये.

मात्र या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आक्रमक न होता देण्याची हिंमत अन चिकाटी आहे आमच्या ग्रामपरीकडे…. विकासासाठी आपल्यापेक्षा दुर्बळाचा बळी द्यावा नाही लागत…. निसर्ग अन माणूस, श्रीमंत अन गरीब माणूस, लहान अन मोठा माणूस हे सगळे एकत्र सुखाने वाटचाल करू शकतात हा विश्वास आहे….

शाश्वत बदलाची सुरुवात स्वत:च्या अंतर्मनातच करावी लागते. एकदा तिथे परिवर्तन सुरू झालं कि त्याचे पडसाद बाहेरच्या जगात पडू लागतात. चांगल्या बदलांची शृंखलाच सुरू होते. एमआरएच्या व्यापक पसाऱ्याचा गाभा इतक्या साध्या विचारसरणीत आहे!

सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी आदर्शवादी बकवास खरंच प्रत्यक्षात आणू शकणारे लोक आहेत! साध्या वेषात, हसऱ्या चेहऱ्याने, सहजतेने बोलणारे…. माझ्यातल्या वेडेपणाला अधिकाधिक अभिव्यक्त करू देणारे…. आयुष्याची फार मोठी रहस्य जेवणाच्या टेबलावर गप्पा मारत वाटून घेणारे… आहेत अजून जगात!

या संस्थेची मी देत असलेली माहिती कदाचित अपुरी आहे. अधिक सविस्तर माहिती संकेतस्थळांवर पाहता येईल

http://www.iofc.org/panchgani तसेच www.grampari.org

ग्रामपरीच्या प्रकरणात…..

या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला खरंतर….

अगदी नक्की ठरवलं होतं मी कि आता उडाणटप्पूपणा बास करायचा अन शहाण्यासारखं एखाद्या आर्किटेक्टकडे काम करायचं नाकासमोर दररोज दहा ते सहा!

***

इकॉलोजिकल सोसायटीच्या वर्गातला माझा मित्र, रेनी, पाचगणीत काहीतरी काम करायचा म्हणे. ऑयकॉसमधल्या पर्यावरण सर्व्हेसाठी या भूगोलशास्त्रज्ञ मित्राला सोबत घेऊन भरपूर भटकायला मिळालं. तेव्हा मी त्याच्या मूळ कामाबद्दल चौकश्या सुरू केल्या.

तो एम आर ए च्या ग्रामीण पर्यावरण केंद्रात (ग्रामपरी) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचं काम करत होता. आता यातून मला सुद्धा काडीचा अर्थबोध झाला नाही. प्रत्यक्ष जाऊन काय काम आहे ते पाहिल्याशिवाय जिवाला स्वस्थता लाभलीच नसती, म्हणून मी ऑयकॉसचा निरोप घेतल्यावर एका दिवशी तडक उठून पाचगणीला गेले.

सहजच गेले…. या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला खरंतर….

तो जागतिक स्त्री दिन होता. ग्रामपरीच्या आवारात बरीच लगबग चालू होती. आसपासच्या गावातल्या महिला सरपंच अन त्यांचे पुरुष उपसरपंच (आहे किनी मज्जा!) जमले होते. ग्रामपंचायतीच्या कामकाजातला महिलांचा सहभाग निव्वळ प्रतिनिधित्व मिळून सुधारलेला नाही. मात्र ग्रामपरीमधे थोडं प्रशिक्षण घेऊन, कायदेतज्ञांशी, अनुभवी कार्यकर्त्यांशी चर्चा करून या महिला लोकप्रतिनिधींचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसला मला….

रेनीच्या मदतीने ग्रामपरीतल्या सगळ्यांशी ओळखी झाल्या. हसऱ्या जयश्री आंटी, रेनीचे बॉस, डॉ. जॅरेड अन सौम्यावर तर मी बेहद्द खूष होते! हे लोक ग्रामपरीचे डायरेक्टर वगैरे असतात याची फार गंभीर कल्पना नव्हती मला!

कोण कुठल्या देशातून उठून इथे पाचगणीत राहून माझ्या लोकांना पाण्याचं व्यवस्थापन, स्थानिक पर्यावरण, स्वच्छता, योग्य शौचालय बांधणी वगैरेबद्दल विचार अन काम करायला उद्युक्त करणारे हे कोण चमत्कारिक लोक आहेत?!

माझ्या नेहमीच्या अबोलपणावर कडी करून माझे सगळे विचित्र प्रश्न बाहेर उड्या मारत होते. अन तात्पर्य असं की रोजच्यासारख्या त्या साध्या दिवसाच्या शेवटी जॅरेडने मला ग्रामपरीत काम करायचं आवतन दिलं!

मी खूप घाईघाईने होकारार्थी मान डोलावून, तोंडाने नाही म्हणत होते….

पुढच्या आठवडयात जॅरेडसोबत गोडवली गावात चालू असलेलं झऱ्यांच्या व्यवस्थापनाचं काम बघायला गेले. (त्यावर एक अजून पोस्ट लिहू आपण) पण नुसतं बघायला माझं काय जात होतं…..

असंही या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला….

त्याच दिवशी माझ्या कामाचं स्वरूप, कामाचे तास, दिवस अन इतर तपशील ठरत गेले. पुढच्या आठवड्यात मी ग्रामपरीसोबत काम करण्याचा करार केला! हा दोन महिन्यांचा करार अतिशय हुशारीने आखलेला असून त्याच्या कालावधीत भविष्यात वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे! मी मात्र नाही म्हणणार आहे….

अजूनही या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचं नाहीये मला….

मग जमेल तेव्हा घरून काम करणं सुरू झालं. झरे पुनरुज्जीवन प्रकल्पाचं संपूर्ण दस्तावेज दोन भाषांत तयार करणे हे मुख्य काम. भरपूर रेखांकने, नकाशे अन चित्रं वापरून पश्चिम घाटात अथवा तत्सम प्रदेशात वापरता येईल असं भूजल व्यवस्थापन हस्तपुस्तक तयार होत आहे.

मात्र त्यासाठी मलाच आधी भूजलसाक्षर होणं भाग होतं. त्याशिवाय कसली रेखाचित्रं काढणार होते?!

मग माझ्या पुणे पाचगणी फेऱ्या सुरू झाल्या. आता एसटी महामंडळ माझं दुसरं घरच झालंय. पुणे महाबळेश्वर निमआरामच्या सगळ्या कंडक्टरांना मी ओळखते आताशा! त्याशिवाय माझ्या नमुनेदार सहप्रवाशांवर एक सविस्तर पोस्ट लिहेन कधीतरी!

पाचगणीत दरवेळी बसमधून उतरले की एक खोल श्वास घेते मी….. सगळा सह्याद्री…. सगळं जंगल… सगळे झरे, दरीवर घिरट्या घालणारे गरूड, पायरीदार भातखाचरं अन भन्नाट गार वारा…. हे सगळं सगळं एका श्वासात भरून घेते!

आता इथून पुढे या सगळ्या प्रकरणात न पडणं शक्यच नाही हे लक्षात येतं माझ्या…..

एम आर ए च्या आवारात शिरतानाच मी दात काढत हसायला लागलेली असते…. जणूकाही संचार होतो माझ्यात कुठल्यातरी उत्साही चिवचिवत्या पक्ष्याचा! चालत जाते कि उडत जाते तेही लक्षात येत नाही!

मग भरपूर चर्चा, झालेल्या कामाचा मागोवा, पुढे काय काय रेखांकने करायची याचा विचार…. कधीकधी सकाळ ते संध्याकाळ गावात चालू असलेल्या कामाची पहाणी. अर्थात त्याला पहाणी म्हणणं हास्यास्पद आहे. जॅरेड अन त्याचे सहायक अशोकभाऊ यांच्यासोबत मी देखिल पोती उचल, सिमेंट कालव असले उद्योग करते. जुने दगडी हौद खराट्याने साफ करण्यापासून सिमेंटची घमेली वाहून नेण्यापर्यंत अन जॅरेडसाठी दिवसभर धावते भाषांतर करण्यापासून ते एमआरएच्या आवारात, कमळाच्या तळ्याकाठी बसून रेखांकने करण्यापर्यंत सगळेकाही माझे काम आहे!

एका दिवशी सकाळपासून भाषांतरे करून मी इतकी बावचळले होते की गोडवलीच्या मीटींगमधे मी गावकऱ्यांशी इंग्रजी अन जॅरेडशी मराठी बोलायला सुरुवात केली. अख्खं गाव हसत होतं मला! मग एका तुकाराम आबांनी आवाज टाकला, “ताईंसाटी च्या सांगा रे!”

***

एम आर ए मधे रहाण्याजेवण्याची सोय फारच उत्तम आहे. मला विचाराल तर माझ्या जरूरीपेक्षा खूपच लाड होत आहेत! शिवाय मला स्वयंपाक करावा लागत नाही हा बोनस!

इथली जेवणवेळ हा एक विशेष कार्यक्रम असतो. सुरुवातीला इतक्या साऱ्या अनोळखी लोकांसोबत जेवायला मी फार घाबरत असे. कुठे बसू? कुणाशी बोलू? अन काय बोलू?!

मुळातच ही संस्था समजून घेणं अन एका पोस्टमधे समजावून सांगणं अशक्य आहे माझ्यासाठी…

मात्र बघता बघता या जेवणवेळा माझ्या सगळ्यात मोठ्या शैक्षणिक संधी झाल्या. अनोळखी लोक हा शिकण्याचा केवढा मोठ्ठा खजिना असतो! रोज मी नवीन टेबलाशी बसते. कधी माझ्या शेजारी एम आर ए मधे काम करायला आलेले इंटर्न्स असतात, कधी माझे बॉस लोक असतात, त्यांचेही वरिष्ठ पदाधिकारी, एम आर ए चे जुने सहकारी, निवासी कर्मचारी, स्वयंसेवक…. वेगवेगळ्या देशातून आलेले विविधरंगी लोक! त्यातल्या प्रत्येकाचं काम, पूर्वेतिहास, त्यांच्या प्रेरणा… सगळं किती वेगळं!

मी मात्र जे सापडेल त्याला प्रश्न विचारून सोडते! एकदा एम आर ए च्या सेक्रेटरी काकांचं ताट माझ्या प्रश्नांची उत्तरं देतदेता सुकून गेलं आहे! (नंतर बहुदा त्यांनी माझं टेबल टाळलं असावं!)

रोज किमान शंभर दिडशे लोक जेवणार म्हणजे घासण्यात भांडी किती पडत असतील! इथे रोज एका विभागातले लोक ताटं वाट्या विसण्याचं काम करतात. गाणी म्हणत, चेष्टा मस्करी करत भांडी घासायला मीही जाऊ लागले. तसंही मला लहानपणी भांडी घासण्याचा खूप षोक होता…

मोठं झाल्यावर (म्हणजे ओट्यावर हात पुरण्याइतकं मोठं!) भांडी घासण्याचं स्वप्न असं पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं!

एका विशेष गर्दीच्या दिवशी भांडी घासायला मदत केल्याबद्दल आमच्या आफ्रिकन इंटर्न “योना”ने चक्क मला मिठी मारली! मीही बावचळल्यागत हसून साबणाच्या फ़ेसात घातलेले हात तिच्या गळ्यात टाकून मोकळी झाले!

याच मुलीने एका संध्याकाळी प्रार्थनागृहात तिच्या मधाळ आवाजात कुठलीतरी आर्त देवकवनं गायली होती….. तो स्वच्छ घंटेसारखा नाद देवाच्या कानावर न पडणं अशक्य आहे!

***

उरलेल्या गोष्टी वेळ काढून लिहीत आहेच…. आणिक फोटो सुद्धा टाकेन पु्ढच्या पोस्टमधे!

भाग २: ग्रामपरीच्या प्रकरणात अधिक खोलवर