माणूस हा सामाजिक प्राणी आहे यावर विश्वास बसायला मला कितीक वर्षे लागली! मुळातच एकटी रमत होते कि परिस्थितीनुरूप तशी होत गेले कुणास ठाऊक, पण जगाशी जमवून घेण्यास जरा वेळच लागला….
माणसांचे तर्हेतर्हेचे स्वभाव, लकबी, सवयी, संस्कृती, भाषा, आचारविचार, बरोबर चूकच्या विविध कल्पना, सरळपणा, लांड्यालबाड्या हे सगळे समजण्याचे ते वयही नव्हते…. इवल्या मनात किती प्रश्न वादळ होऊन घोंघावत….
खूप लहानपणी कुठल्याशा रागाने पिसे चढलेल्या मला बाबाने शिकवले होते…. “माणूस जगात स्वत:ची किंमत अन जागा केवळ उपयुक्ततेच्या जोरावर मिळवू शकतो. जर तुम्ही इतरांसाठी काही करू शकत असाल तर आणि तरच पैसा, आदर अन मैत्र कमावता येते.”
हा काही क्रूर अमानवी व्यवहार नाही, साधा सोपा निसर्गनियम आहे. जे जे अस्तित्त्वात आहे त्याचा काही उपयोग आहे. अन जेथे उपयुक्ततेचा नाश होतो, तेथे विघटन अन पुनर्वापर सुरू होतो. त्याला काळाची न थांबवता येणारी गती आहे.
रागाचे अन रडण्याचे उमाळे एका क्षणात शांतवले, जेव्हा त्याने मला जगाच्या कुलुपाची साधी सोपी किल्ली सहजच हाती दिली. त्या एका वाक्याचे किती अर्थ, पडताळे शोधण्यात राग अन दु:ख करायचे विसरून गेले मी….
आजही या किल्लीने किती दरवाजे माझ्यासाठी आनंदाने हात पसरताना पाहतेय! विनाकारण दुरावलेले किती डोळे पुन: माझ्यावर हास्याची बरसात करताना पाह्ते आहे. त्यात प्रेम असते, कौतुकमिश्रित अचंबा असतो…..क्वचित आदरही असतो….. माझ्या वरकरणी निरपेक्ष देण्यातला स्वार्थ त्यांना दिसत नाही. केवळ मदतीचे शस्त्र उगारून त्यांना जिंकले गेले आहे हेच समजण्यास वेळ लागत असावा!
विश्वनियम आहे हा, ज्याचा उपयोग त्यास भरभराट….जेथे साठा, साचलेपणा तेचे कुजट वाया जाणे हेच सर्वत्र पहावयास मिळते.
जितके द्यावे तितके अधिक हाती पडत राहते…. जितके साचवावे, तितके नासून जाते…
पाहता पाहता देण्यातला आनंद भिनत जातो…. हसत हसत हजार हातांनी सारे काही या जगावर लुटून मोकळे व्हावे इतका आनंद मनात नाचू लागतो…. या आनंदाची लागण असपासच्यांना नकळत होणारच! त्यांच्या हास्याचे श्रीमंत धनी केवळ तुम्हीच असणार नाही का? कितीही मनांवर राज्य करावे असल्या हसर्या हातांनी….त्यांना कधीच काही कसे कमी पडावे?!
देणार्याचे ते हात जमेल तेव्हा जमेल तसे हावरेपणाने घेत जावे….त्या हातांना लक्ष्मीचे वरदान असते…. त्या हातांना तुटले बंध सांधण्याचे कौशल्य असते….टोचरे दु:ख शांतवण्याचा स्पर्श असतो….निराशेच्या अंधारात सावरणारा आधार असतो…. केवळ मानवी जगातच नव्हे तर चल अचल सृष्टीत मानाने, आनंदाने जगण्याचा अधिकार असतो….