भेट

वाहिलेल्या फुलांच्या ढिगाऱ्याखाली गुदमरत

तुला पाहण्यापेक्षा मी तुझे दर्शन घेतलेच नाही…

तुझी कर्णकर्कश मिरवणूक बाहेर गाजत असताना..

माझे दरवाजे मात्र घट्ट मिटून घेतले होते …

मला दूषणे दिली गेली त्याच चढ्या आवाजात…

ज्या आवाजात तुझी जयगीते गायली जात होती…

तुझी प्रार्थना करणे सोडून दिले आता..

कारण मागायचे असे काहीच नाही ना!

अन आताशा कुठलेच गीत नाही मी गात…

तुला मौनच उमगते अधिक नेमकेपणाने!

मात्र कधीतरी मोकळ्या माळावर जाते निघून…

तिथे भेटतोस तुझ्या हसऱ्या घननीळ अस्तित्त्वामधून!

असंबद्ध खजिना…

वाऱ्यावर उडणारी धूळ अन डोक्यावर कडाडते ऊन, पायाला चटका देणारे कातळ अन गारेगार नितळ ओढे… गच्च वेलींनी जमिनीला बांधून घातलेली अन तरीही आकाशाला जाऊन भिडलेली जंगले… जंगलवाटेवरचे पानातून गाळून उतरलेले कवडसे….

“मोठ्या जनावराची” नुसती पावलट पाहून उडणारी घाबरगुंडी!

संध्याकाळी सुकल्या फाट्याची मोळी डोक्यावर घेऊन गुरे हाकीत घरी निघालेली एखादी सुरकुतली म्हातारी…. विहिरीवरच्या गुपित-गप्पा, सुना-मुलींच्या वेण्याफण्या, भडक्क फेटे मिरवीत पारावर टेकलेले, पांढरीच मिशी पुन्हा पुन्हा पिळणारे सुरकुतलेले म्हातारे…. टायरमागे काठ्या घेऊन पळणारी शेंबडी पोरे!

चुलीवरच्या तव्यातून निखाऱ्यावर भाकरी पडताच सुटणारा खरपूस भुकेचा वास!

मिरचीची फोडणी, खोबऱ्याचे वाटण…. हिरवट ओले मऊशार सारवण….

मुलायम काळ्या मातीत पाट सोडताना घमघमणारा मृद्गंध…. अन त्या पाण्याच्या जोरावर स्वार होऊन डोलणारी पोपटी हिरवी शेतं…

ज्वार-बाजरीचे ढीग… अन भातखाचरातली गाणी….

बांधावरच्या सर्पदेवाला कोंबड्याचा निवद! सक-सकाळी दरीत घुमणारी मोरांची केक!

दुपारभर वळचणीला चिमण्यांची घाई… चिखलामधून टोच्या मारीत कोंबडीची पिलावळ…

दूर आकाशात गिरक्या घेत पिलांपाशी लक्ष ठेवणारी घार…

जत्रेमधल्या रंगीत बांगड्या…. आकाशपाळण्याची सफर!

रात्रीच्या थंडीत टोचऱ्या घोंगड्याची ऊब! शेकोटीभवती थरथरत ऐकलेल्या भुताच्या गोष्टी… सावलीमधून लवलवणारा पिंपळावरचा मुंजा!

देवघरात निरांजन, अंगणात रांगोळी…. दारावर लावलेली आंब्याची डहाळी…

सूर सनईचे मुलायम, ताशाचे कडक! कुस्तीचे….अन तमाशाचे फड…

देवळात घंटा…. आरतीला बेताल टाळ्या!

सूक्त, स्तोत्र, मनाचे श्लोक….

अंधारे नागमोडी जिने अन त्यांच्यावरल्या गुप्त प्रेमकथा!

 

या साऱ्यांचा काही काही संबंध नाही… पण तरीही हे सारे मी उगाच कवटाळून बसले आहे… एका लालबुंद संध्याकाळी.

रस्त्याकडेची संस्कृती…..

रोज घरी जाताना मी रस्त्याकडेला थांबून भाजी घेते. मीच काय आपल्या घरातलं कुणी ना कुणी हे काम करतंच की! काल मात्र रस्त्याची कड स्वच्छ अन सुनीसुनी होती. एका टोकाला महापालिकेचा ट्रक उभा होता…. अन त्यात कोवळ्या कोवळ्या मेथी, कोथिंबीरीच्या जुड्या भरलेली पोती कोंबली होती. भाजीवाले अन पालिकेचे लोक एका घोळक्यात घासाघीस करीत उभे होते…..

हा काही आजचा प्रसंग नाही… अधूनमधून रोजचाच प्रसंग आहे. वृत्तपत्रात यावर किती वर्ष किती लिहिलं गेलं आहे…. “अनधिकृत” फेरीवाले पथारीवाले, त्यांचे प्रश्न, त्याची उत्तरं, त्यावर चर्चा….अजूनही चालू आहे.

अगदी वाहतुकीच्या आड येईतो हा बाजार वाढत जातो. गाड्या अडतात… वाहतुकीची कोंडी अन भांडणे….. मग लेखी तक्रारी…. मग कुणीतरी उपाय काढला कि शहराच्या प्रत्येक भागात एक छोटी मंडई बांधावी, तिथले गाळे भाजी विक्रेत्यांना वाटून द्यावे. मग या छोट्या बाजारातले गाळे भरपूर ओळखीपाळखी असलेल्या दलालांना मिळाले. भाजीबाजार मात्र रस्त्याकडेने चालूच राहिला. भाजी घेणाऱ्याना घरी जाताजाता भाजी मिळतेय अन हातोहात विक्री होतेय… छोटे भाजीविक्रेते रस्त्याचा काठ काही सोडत नाहीत.

चूक त्यांची नाही… भाजी घेणाऱ्या लोकांचीही नाही…. रस्त्याला अडथळा नको म्हणून अनधिकृत हातगाड्या उचलणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याची चूक असेल का…. तो रस्त्यापर्यंत फर्निचर मांडून बसलेल्या दुकानवाल्या मारवाड्याला ठणकावू शकत नाही पण हातावर पोट असलेल्या भाजीवाल्याची हातगाडी खसकन ओढून ट्रकमध्ये टाकू शकतो…. हे कसे?

चूक आपल्या व्यवस्थेची आहे… आपण वागतो पौर्वात्य मनाने…. अन व्यवस्था मात्र पाश्चिमात्य उचलतो. त्यातून होणारे गोंधळ निस्तरताना अजून खोल पाय अडकतो आपला….

“तिकडे अमेरिकेत नाय हा असले घाण रस्ते”, या देशी-अमेरिकनांच्या वाक्याचीच आताशा चीड येऊ लागली आहे. मनात येतं, “हे माझे रस्ते आहेत. नाही तुम्हाला पटत तर जावा तुमच्या अमेरिकेतच! इकडे जसं अळूचं फद्फदं मिळतं तसं अमेरिकेत नाही की मिळत! म्हणून आम्ही म्हणतो का कि अमेरिका चांगली नाही?!” इकडे मात्र अमेरिकन मोजमाप कशासाठी?

एका ठरलेल्या ठिकाणी, “मॉलमध्ये” प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला बाजार भरवण्याची पद्धत पाश्चिमात्यांची आहे. आपली बहुसंख्य जनता कामावरून घरी येता जाता “ताजी” भाजी घेऊन जाते. मग आपला बाजार रस्त्याच्या कडेनेच चालणार. पुण्यात आल्याच की टोलेजंग मॉल, पण रस्त्यावरचा भाजीबाजार इंचाने तरी मागे हटला का?!

भाजीवाले… त्यांचे वरच्या पट्टीत हेल काढून ओरडणे…. घासाघीस अन बाचाबाची… वैयक्तिक ओळखी अन त्यातून मिळणारे बिनहिशेबी डिस्काउंट!! “ताई तुमच्यासाठी कोथिंबीर सात रुपये लावली, बाहेर नऊ रुपयाच्या खाली नाही भेटणार!” काकूंच्या पिशवीआडून तोंड घालत कोबीचा गड्डा फस्त करणारी भटकी गाय… धंद्याच्या टायमाला तिला हकालाणारा पण रात्री गर्दी सरली कि उरलेल्या भाजीतली कोमेजल्या पाल्याची जुडी स्वत:च्या हाताने त्या गायीला घालणारा भाजीवाला….

हे सगळं अनधिकृत कसं असू शकेल?

या सगळ्या गोंधळाची… कोलाहलातच स्फुरणाऱ्या जीवनाची सांस्कृतिक किंमत शून्य कशी असेल?

नाहीत आमचे एकूणएक रस्ते स्वच्छ….नाहीत सगळे रस्ते गुळगुळीत आठपदरी अतिवेगवान द्रुतमार्ग….

पण या रस्त्यांना एक संस्कृती आहे, एकेक भिन्न व्यक्तिमत्त्व आहे…

सिंहगड रस्ता मला एखाद्या घरगुती बाईसारखा वाटतो, गृहोपयोगी वस्तूंनी गजबजलेला…. सध्या घरच्या सुगरणीसारखा!

लक्ष्मी रस्ता मात्र नावाप्रमाणे, ठेवणीतली नऊवार नेसून, पेटीतले दागिनेबिगीने लेऊन आलेल्या घरंदाज बाईसारखा…

फर्ग्युसन रस्ता फटाकड्या कॉलेजकन्येसारखा इवल्या कपड्यात ठुमकत पाणीपुरीपासून महागड्या कॉफीपर्यंत सारे खात खिदळत मिरवणारा!

रस्त्याकडेलाच तर समाजाचे व्यक्तिमत्त्व जन्माला येते…वाढते…. अन त्याचीच संस्कृती तयार होते…. त्यावर अधिकृततेची मोहर लावा न लावा काय फरक पडतो?!

या विविधरंगी संस्कृतीला पुसून टाकूनच शिस्त अन स्वच्छता आणावी लागेल का? तशी बाहेरून ती आमच्यात रुजेल का?

कि छोट्या मनातून रुजवून फुललेल्या एका रंगीत, जिवंत, सुसंस्कृत अन स्वच्छ रस्त्याचे अन पर्यायाने देशाचे स्वप्न आम्ही पाहू शकू?

कमला सारंग….

गाण्यासारखा हेल काढीत घोळवलेल्या इंग्रजीत प्रत्येक मल्याळी माणसाने मला बजावले होते कि जर तू लगून पहिले नाहीत तर तू केरळ पुरता पहिलाच नाहीस! मी देखील हसून मान डोलावली होती. आमच्या गाईडसाहेबांच्या नियोजनात लगून होते कि नाही समजणे अवघडच होते!

पण “त्याने” त्याच्या या देवभूमीत माझ्यासाठी काही खास योजले होते!

परतीची रेलवे तिकिटं शेवटच्या दिवसापर्यंत पक्की झालीच नाहीत. पुण्यात येण्यासाठी पुढची सोय होईतो मला कुमारक्कमच्या वेम्बनाद लगूनमधल्या हाउसबोटवर एक रात्र काढण्यावाचून पर्यायच उरला नाही!!

परतीच्या सोयीची चिंता वाऱ्यावर अन गाईडवर सोडून मी दात काढत हाउसबोटीकडे मोर्चा वळवला. नारळाच्या झावळ्यांनी विणलेली हाऊसबोट मंद लाटांवर डोलत होती. तिच्या अणीवर चकचकीत पितळी पाटीवर तिचे नाव कोरले होते, “वॉटरलिली” मनात तिचे मराठी बारसे करूनच टाकले….कोय-कमला!

या कमलेचे मालक, थॉमस अब्राहम आपले सुदन्त हास्य करीत स्वागताला आले. त्यांचे टोपण नाव “अनियन कुंजू” (म्हणजे छोटा भाऊ) त्यांच्या मूळ नावापेक्षा मोठे नाही का हा प्रश्न मी गिळला. साधे मुंडू नेसलेला हा मल्याळी छोटा भाऊ हाउसबोटीसोबत लगूनमधल्या काही भात खाचरांचा देखिल मालक होता!

आम्ही बोटीवर (शक्य तितके) स्थिरस्थावर होताच दोन आडदांड दिसणाऱ्या अबोल मल्याळी माणासांनी बोटीचा सुकाणू हातात घेतला. काठाने हळूवार मागे सरत जाणाऱ्या नारळाच्या बागा अन त्यात लपलेली मंगळूरी कौलाची घरं पाहण्यात मी हरखून गेले असताना आमची बोट बंदर सोडून लगूनच्या जादुई विश्वात शिरत होती….

वरच्या डेकवर, मुख्य डेक सारखा गलबलाट अन गोंगाट नव्हता….तिथल्या शांत एकांतात, गार वारा अन सोनेरी निवते ऊन मान उंचावून चेहऱ्यावर घेत कुणालाही जॅक डॉवसनसारखे वाटेल! विश्वाचे सम्राट असल्यागत!

या हाउसबोटीवर तथाकथित ऐष-आरामाच्या सर्व सुविधा असतात… वातानुकूलित खोल्या, अत्याधुनिक स्नानगृह, जेवणाचा डेक अन सर्व तऱ्हेची मदिरा! इथले जेवण म्हणजे एक साग्रसंगीत कार्यक्रमच असतो. चमचमीत मासे अन जोडीला वाईनचे ग्लास टेबलावर येत होते…त्यासोबत गप्पांना ऊत आला होता… सरतेशेवटी सगळ्यांचा हसून निरोप घेतला…

आता वरचा डेक पूर्ण शांत, निर्मनुष्य होता… चांदण्यात न्हायलेल्या तिथल्या लाकडी फ़रशीवर चालताना कसे आबदार वाटत होते…. डेकच्या दुसऱ्या टोकाला टेबलावर वाईनचे ग्लास मंद चमकत हेलकावत होते…. केरळी लघुकथांचं माझं पुस्तक हलक्या वाऱ्यावर पान फलकावत राहिलं होतं….

खालच्या तळ्यात चंदेरी लाटांच्या रेषा उमटत होत्या….जणू वितळलेल्या चांदण्यातच माझी बोट हेलकावत उभी असावी. दूर क्षितिजाजवळ माडांच्या काळयासावळया आकृती धुक्याने झिरझिरीत झाल्या होत्या…. सगळ्या आसमंतात “त्याचे” मिष्किल मंद स्मित भरून राहिले होते… मग मीही उत्तरादाखल हसले किंचित, माझ्या तिथे असण्याला…. अन असूनही हरवण्याला….

मला समजले होते कि त्या रात्रीचे सौंदर्य अन अविस्मरणीय जादू ही काही त्या तलावतून, चांदण्यातून किंवा बोटीतून जन्माला येत नाही…. तर ते आपल्यातल्याच अंत:स्थ सुंदरतेचं प्रतिबिंब असतं.

सगळी रात्र मी जागी होते की स्वप्नात कोण जाणे… पण पूर्वेला पहाटेची गुलाबी छटा येताना मी मनात एक अविस्मरणीय रात्र साठवून घेतली होती. सकाळ उत्साही अन जिवंत झाली तीच बोटीभोवती पक्ष्यांच्या हालचालीने…. बदकं, बगळे अन किती तऱ्हेचे पाणपक्षी आपापल्या पोटापण्याच्या कामाला लागले होते. जवळच्या एका तारेवर वेडा राघू मोठ्या गंभीर आविर्भावात बसला होता. मधेच एखादी अनपेक्षित झेप घेऊन तो पुन्हा त्याच्या जाअगेवर बसे तेव्हा चोचीत एखादा गलेलठ्ठ चतुर पकडलेला असे!

आमचे कॉफीचे कप रिते होईतो ऊन चढू लागलं होतं. घरी परतण्याची तयारी करताना, हे घर नसल्याची उदास जाणीव टोचू लागली! मुख्य डेकवर आमच्या बोटीचे “खलाशी” सज्जीवन-अन्टोनी निघायची तयारी करीत होते. मी सज्जीवनला विचारले, “मल्याळम मधे बोट चालवणाऱ्याला काय म्हणतात?” हा काय प्रश्न झाला?! अशा थाटात त्याने सहज उत्तर दिले, “सारंग!”

कोकणापासून कितीक किलोमीटर दक्षिणेला मला माझ्याच मायबोलीतला शब्द पुन्हा भेटला… कोकणातला एखादा सख्खा नातलग भेटावा तस्साच!

सज्जीवनने सुकाणू माझ्या हाती दिला अन बोटीचे पंखे उजवी-डावीकडे कसे फ़िरवायचे याचे शिक्षण दिले…. पाणवनस्पतींच्या बेटाबेटांतून वाट काढत आम्ही पाण्यावरच्या अन काठावरच्या आयुष्यावर गप्पा मारत निघालो. सज्जीवनला त्याचे काम अन लगूनवर राहणे आवडत होते. त्याचे उरलेले कुटुंब कोट्टयमला होते अन त्याची मुलगी, “अनुश्री” तिथे इंजिनियरिंग कॉलेजात शिकत होती. (बाकी केरळभर इंजिनियरिंग कॉलेजांची रेलचेल आहे!)

या सारंगाच्या कुशल हाताखाली आमची कमला हेलकावत बंदराला लागली…. सवयीच्या लाडक्या मातीवर पाय ठेवला अन निरोप घ्यायला वळले… कमलासारंग सज्जीवन-अन्टोनीच्या जोडगोळीला हसून हात करताना पावले जड होण्याचे काही कारण नाही असे स्वत:ला दटावले.

परतीच्या प्रवासात सज्जीवनचे सहज शब्द मनात घुमत होते, “नाव वळवतो तो…..सारंग”

या विचित्र अनुभवांच्या बेटांतून मला वळवतो अन त्याचे चंदेरी प्रतिबिंब साऱ्या जगाच्या तळ्यात दाखवतो तो….. सारंग

संतसाहित्यात देवाला नेहमीच नावाड्याची उपमा दिली ती उगाच नाही. जगाच्या खडकाळ किनाऱ्यापासून आत्म्याची नाव अथांग आनंदाच्या खोल समुद्रात वळवणारा….. सारंग.

ठेकडीचे देवघर….

केरळयात्रेचा पुढचा थांबा होता ठेकडी. रस्त्याकडेला अजस्त्र बांबूच्या कनाती लावून हे गाव तुमचं पेरियार व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर स्वागत करतं! तुमची नजर अन नशीब सावध असेल तर ठेकडीच्या वाटेवर एखादी शेकरू नक्की दर्शन देते!

आमचं सामानसुमान अंबाडी नावाच्या रीसोर्तमध्ये स्थानापन्न करण्यात आलं. अंबाडी म्हणजे म्हणे कृष्णाचे घर. (इति गाईडसाहेब)

ही जागा मात्र मजेशीर होती… दगडी तुकडे लावून आखलेल्या पायवाटा… बांबूची उंचनिंच बेटं उगवायला इथे फार काही करावे लागत नाही ते एक झालंच! तेलपाणी करून गुळगुळीत काळीशार राखलेल्या कोरीव लाकडी तुळया अन वासे….त्यांचे साधे, मजबूत पण डोकेबाज सांधे! मातीशी नातं सांगणारी टेराकोटा फरशी, नाजूक भुरे डोळे रोखल्यागत तेवणारे मऊशार दिवे…. असले स्वर्गीय अंबाडी हे कृष्णाचे घर असायला त्याची देखील काही हरकत नसावी!

हेडमास्तर गाईडसाहेब इतर सारी पर्यटक पिल्ले घेऊन बाजारविहार करावयास गेले. अन मी स्वत:ला अंबाडीच्या स्वर्गीय स्नानगृहात अभ्यंग करवून घेतले! मला वाटून दिलेले अंबाडीतले कोटर (कॉतेज!) अतिशय शांत होते. इथे केवळ झाडावरून तुरतुर फिरत खिडकीत डोकावणाऱ्या खारोट्याना अविरत चिरकायची परवानगी होती! कोटरासमोरच्या ओटीवर गरमागरम “कापी” चा कप घेऊन बांबूपलीकडे उतरणाऱ्या सूर्याची सोनेरी लाल छबी पाहण्यात केरळयात्रेचं सार्थक झालेसे वाटले!

हळूहळू आकाश काळवंडले. खालच्या पायवाटेवरच्या दिव्यांनी बांबूचे बेट खालपासून वर उजळवले… कॉफी सोबत सूर्यास्ताचा कप रिकामा झाला मग मीही जरा गावात भटकायला निघाले. काही विशेष नियोजन नव्हते! उगाच रस्ते पहात फिरले… अनोळखी लोकांना भेटले… जुईचे सुगंधी शीग लावून विकायला बसलेल्या चिमुरड्या पोरींशी दोस्ती झाली!

रस्त्याकडेला छोट्या छोट्या स्टुडीओमध्ये लाकडी शिल्पकलेचे नमुने ओसंडून वाहात होते… अप्पम साम्बरमच्या मेनूने सज्ज हॉटेले (याना रेस्तोरांत म्हणणे जरा अधिकच होईल!) साधी “मुंडू” लुंगी नेसलेला एक शिल्पकार दुकानाच्या मागच्या बाजूला कामात गढला होता. त्यांचा डोळ्यांत तेज विचारांची चमक होती अन चेहऱ्यावर शांत गांभीर्य होतं…. एखाद्या कालातीत जगात जणू मी पाऊल टाकले होते… जिथे अजूनही कलासक्त हात दगडातून देव जन्माला घालत होते! एका अतिभव्य नाट्याची प्रेक्षक असल्यागत जडशीळ पायाने मी रात्री परतले…

केरळच्या निव्वळ उल्लेखाने देखील ठेकडीची दृश्ये मनातून उसळून येतात… त्यांनी माझ्यातले जिवंतपणाचे बीज असे काही रुजवले असावे…की ते मला कंटाळलेल्या मृतवत जगण्याला कधीच शरण जाऊ देणार नाही….