आपण सूक्ष्मजीवांना का घाबरतो…?

एका वाक्यात सांगायचं तर आपल्याला डेटॉलने घाबरवलं…. बाकी काहीच नाही झालं.

आपल्या भोवतीची हवा, पाणी, आपलं अन्न, इतकंच काय आपले केस, त्वचा, तोंड सगळीकडे सूक्ष्मजीव उदंड नांदत असतात.

सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय दही, चीज, इडली, डोसा, ब्रेड शक्य नाहीत. आपल्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय अन्नपचन शक्य नाही, कुठल्याही जैविक वस्तूचं विघटन शक्य नाही.

या पृथ्वीवर सूक्ष्मजीव आपले निव्वळ शेजारी नाहीत तर सहचर देखिल आहेत. त्यांची संख्या, वैविध्य अन सभोवतालाशी नवनवीन प्रकारे जुळवून घेत टिकून राहण्याची जिगीषा पाहता अनेक अभ्यासक असं मानतात की सूक्ष्मजीवांनी व्यापलेल्या या जगात एक आपली माणूसजमात देखिल राहते!

इतकेच काय तर, माणसाचा इतिहास हा बराचसा जंतूंनी घडवला आहे असे प्रतिपादन काही अभ्यासक करतात! साथीचे रोग अन त्यातून झालेल्या राजकीय उलाढाली पाहता त्यात काहीच चूक नाही. आपण सूक्षजीवांशी पिढ्यानपिढ्यांपासून भांडत आहोत. गेल्या दोन शतकातील वैज्ञानिक प्रगती नंतर आपल्याला सूक्ष्मजीवांचे विश्वव्यापी स्वरूप लक्षात आले पण त्यांच्यावर मात करता आलेली नाही हेच सत्य आहे.

सूक्ष्मजीवांच्या अभ्यासातून व्यक्तिगत स्वच्छतेच्या अनेक नियमांना सबळ पुरावा मिळाला. नियमित आंघोळ, शौचानंतर अथवा जेवण्यापूर्वी हात धुणे, खाण्यापिण्याचे पदार्थ अन पाणी स्वच्छ ठेवणे इतपत ढोबळ पायाभूत स्वच्छतेच्या नियमांचे आरोग्य राखण्याच्या दृष्टीने महत्त्व आपल्याला समजले.

एकीकडे सामाजिक स्वच्छतेचे नियम तर सांगूनही आपल्याला अजून आचरणात आणता येत नाहीत. मात्र दुसरीकडे सूक्ष्मजीवांचा नायनाट करण्याच्या हौसेला मोल उरले नाही. “मॉं माने सिर्फ डेटॉल का धुला” हेच स्वच्छतेचं ब्रीदवाक्य झालं. ते टीव्हीवर सूक्ष्मदर्शकाच्या गोलात एका बाजूला वळवळणारे जंतू अन दुसरीकडे स्व्च्छ पांढरं हे प्रतीकात्म चित्र आपल्याला खरंच वाटू लागलं. संडासात बसून माणसांच्या आरोग्यावर हल्ला करण्याचे बेत आखणारे हिरवे-पिवळे विचित्र जीव पाहता पहता सरसकट सगळेच सूक्ष्मजीव आधुनिक खलनायक झाले. आणि त्यांचा पाडाव करण्यासाठी जहालातील जहाल रसायनांचा वापर अपरिहार्यच झाला.

त्यांचे जग साध्या मानवी डोळ्यांनी दिसत नाही अन सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नायनाट माणसाच्याने शक्यच नाही. खरंतर आपल्या ऍंटीबायोटीक्स, डिस इनफेक्टंट इत्यादींनी सूक्ष्मजीवांना काहीएक फरक पडत नाही हे गेल्या काही दशकात अभ्यासकांच्या लक्षात आले आहे. आपण जर सूक्ष्मजीवांना हरवू शकत नसू तर काय करायचं?! त्यांनाच सोबत घेऊन लढता आलं तर?!

पायाभूत स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे, योग्य आहार अन व्यायामाने शरीराची काळजी घेणे अन आपली प्रतिकार शक्ती उत्तमातल्या उत्तम स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करणे इतकेच खात्रीशीर आपल्या हातात असते. कितीही प्रयत्न केले तरी रोग पसरवणारे सूक्ष्मजीव माझ्या संपर्कातच येऊ नयेत अशी काळजी घेणे निव्वळ अशक्य अन हास्यासपद आहे. मात्र आपल्या शरीरात रोग पसरवणाऱ्या सूक्ष्मजीवांसोबत त्यांना विरोध करणारे जीव देखिल जर असतील तर आपण रोगाला प्रतिकार करू शकू. म्हणजेच आपली खरी सुरक्षितता सूक्ष्मजीवांच्या जैवविविधतेत आहे.

आपल्या शरीरातील “अंगभूत” प्रतिकारशक्ती भलतीच मजेदार गोष्ट आहे. अनेक प्रकारच्या जीवाणू अन विषाणूंना आपल्या पांढऱ्या रक्तपेशी ओळखत असतात. त्यातील बहुतेक जीवांना रोखणारी प्रथिने आपल्याला बनवता येतात. एकदा एका प्रकारच्या प्रथिनाची ओळख पटली कि पुन्हा त्याच infection ला आपण सहजी बळी पडत नाही. आपण आपल्या शरीराला जितक्या अधिकाधिक जैववैविध्याची, पण मर्यादेत ओळख करून देऊ तितकी आपली रोगप्रतिकारक शक्ति अधिकाधिक ’सशक्त’ होते.

याविरुद्ध १००% जीवाणूमुक्त जगण्याचा प्रयत्न कधीच सफल होत नाही. जितकी नवी रसायने वापरावी तितके सूक्ष्मजीव अधिकाधिक धीट होत जातात, मात्र त्या नादात आपली प्रतिकार शक्तीच आपण घालवून बसलेलो असतो.

सूक्ष्मजीवांची भीति बाळगत सतत स्वच्छतेचा अतिरेक करणे हे पुढारलेपणाचे लक्षण नसून नवे वैचारिक अंधत्व आहे. आणि वैचारिक अंधत्वाला विज्ञान कधीच साथ देत नाही.

गेल्या काही वर्षात अनेक लोकांशी बोलून, प्रतिकारशक्ती अन सूक्ष्मजीवांविषयी उपलब्ध असलेली अथांग अन तरीही अपूर्ण माहिती समजून घेऊन, स्वत:च्या जीवनशैलीत हळूहळू बदल करत मी माझे स्वत:चे सूक्ष्मजीव धोरण बनवते आहे. यात अनेकानेक चित्रविचित्र लोकांचे, अभ्यासक-विचारवंतांचे, फ़िरस्त्यांचे मौल्यवान योगदान आहे. मात्र माझ्या वेडेपणाबद्दल भरपूर लोकांना आक्षेप असणार हे गृहित धरून अन्य वेड्यांचा उल्लेख न केलेला बरा….

मात्र हे सूक्ष्मजीव धोरण सांगण्यापूर्वी काही स्पष्टीकरण गरजेचे आहे…

  • या धोरणात स्थल-कालानुसार, परिस्थिती तसेच गोष्टींच्या उपलब्धतेनुसार ’धोरणीपणे’ बदल होतात. हे एक लवचिक धोरण आहे, धर्म नव्हे!
  • मी वैद्यकीय अभ्यासक, डॉक्टर अथवा तज्ञ नाही. मात्र माझ्या आरोग्याचे निर्णय हवे तसे घेण्याचे मूलभूत स्वातंत्र्य मी पुरेपूर वापरते आहे, इतकेच.
  • हे माझे धोरण आहे आणि निव्वळ उदाहरणादाखल घ्यावे. हे जसेच्या तसे दुसऱ्यांना लागू होऊ शकत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपापले धोरण ठरवावे अन पाळावे, मात्र आपल्या धोरणाचा दुसऱ्यांच्या आरोग्याला अथवा धोरणाला त्रास होईल असे काही सहाजिकपणे करू नये!
  • आपल्याला आपले धोरण ठरवायचे नसेल तरीही काहीच प्रश्न नाही. डेटॉल ते काम आपल्या सगळ्यांसाठी करतेच. आपण मुकाट ते सांगतील तसे करावे. बराच मनस्ताप वाचतो!

माझे सूक्ष्मजीव धोरण

तर… मी कामानिमित्त भरपूर फिरते, अन तेही बहुतेक वेळा बऱ्यापैकी दुर्गम भागात, आडगावातून. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आजकाल सगळीकडे विकत मिळतात, पण त्यांचा कचरा मागे सोडत फिरणे अजिबात पटत नाही. मला स्वत:ला सूक्ष्मजीवांपेक्षा अधिक भीति प्लॅस्टीकची वाटते. मी माझी-माझी धातूची पाण्याची बाटली घेऊन फिरते. स्थानिक पाणपोया, चहाच्या टपऱ्या किंवा होटेलं, बस स्थानके अशा सर्वसामान्यपणे अस्वच्छ मानल्या जाणाऱ्या जागी बाटली भरून घेते. घरी देखिल गेली अनेक वर्षे साधं नळाचंच पाणी पिते आहे. कुठलाही फिल्टर नाही, पुण्यात, त्यतल्या त्यात आमच्या भागात तरी बरं पाणी येतं. आपली काहीही तक्रार नाही.

बाहेर खाण्याची वेळ खूपदा येते, तेव्हा स्वच्छतेचा अजिबात विचार करत नाही. मात्र मुक्कामी पोहोचल्यावर स्थानिक, घरचे जे काही पानात वाढले जाईल ते आनंदाने खाते. क्वचित पोटात किरकोळ गुडगुड होण्याव्यतिरिक्त गंभीर काही त्रास आजवर झालेला नाही.

भारतातल्या बहुतेक सर्व गावांमधून आसपासच्या शेतांतून पिकवलेले, घरचे, कधीकधी चुलीवरचे, साधे, शाकाहारी अन स्वच्छ जेवण मिळतेच मिळते. त्यात रासायनिक खता-कीटकनाशकांचा वापर जवळात जवळील शहरापर्यंतच्या अंतराच्या व्यस्त प्रमाणात असतो. जितका भाग दुर्गम तितका रसायनांचा वापर कमी.

मात्र प्लास्टिक सर्व चराचरात भरलेले असल्यामुळे आजकाल गावागावात चूल पेटवण्यासाठी लेय्ज, कुरकुरेची पाकिटं जाळली जातात. त्या तसल्या निखाऱ्यात फुलवलेल्या भाकऱ्यांची मला थोडी भीति वाटते.

पुण्यात रोज सकाळी उठून धुरात अजून धूर सोडत गाडी चालवत, रस्त्यावरच्या मुर्दाड लोकांशी भांडत कामावर जाणे बंद केल्यापासून गाड्यांचा धूर खायला मिळेनासा झालाय. तेव्हापासून सर्दी-पडसं होणं जवळपास बंदच झालं. पूर्वी माझा खोकला महिना महिना ठाण मांडून बसत असे… आजकाल जरा घसा खवखवला तरी आश्चर्य वाटते. पडशाच्या जंतूंना मी आवडेनाशी झाले बहुदा.

त्यातून दोनेक वर्षात एखादं पडसं झालंच तर मी मनाला लावून घेत नाही. उगाच कुठले जंतू आपल्या नाकातोंडात गेले असतील असा विचार करत बसत नाही. चार दिवस मस्त आराम करणे परवडते कारण वर सांगितल्याप्रमाणे रोज गाडी काढून कुठे घडघड करत जायचे नसते.

गावकडची कामं निवांत चालतात… स्वत:च्या आरोग्याशी तडजोड करत खेचावे लागत नाही. पैशांशी तडजोड मात्र करावी लागते थोडी…

स्वत:च्या घरात भांडी-कपड्यासाठी रिठा- लिंबू घालून केलेले व्हिनेगर पुरते. आंघोळीला मसुरीच्या पिठाचे उटणे, साय किंवा स्वयंपाकघरातील बऱ्याच गोष्टी आलटून पालटून चालतात मला! रिठा-लिंबू व्हिनेगर शांपू म्हणून माझ्या केसांना चालते. (सूक्ष्मजीव नसते तर माझे व्हिनिगर कुणी बनवले असते?!)

रिठा-व्हिनिगरचा फेस मस्त होतो आणि सांडपाण्याबरोबर नदीत वहात गेल्याने नदीतील जैववैविध्याला त्याचा काहीही अपाय नाही.

महाराष्ट्र ते दक्षिण भारतात खोबरेल, उत्तरेत, थंडीत सरसोचे तेल केसांना चालते. दही, अंडे असल्या स्वयंपाकघरातील गोष्टी कंडिशनर म्हणून अधून मधून केसांना लावल्या की आपलेच लाड केल्याचे समाधान!

दही, ताक, इडली, डोसे, ब्रेड अन इतर फरमेंट्स आवडीने खाते (आणि पिते). तेवढीच माझ्या पाळीव जैववैविध्यात भर! प्रवासामुळे अधूनमधून अस्वच्छ हाताने रस्त्यावरचे अन्नपदार्थ होतातच….

एरव्हीच्या या असल्या वेडेपणासोबत घरी अथवा मुक्कामाच्या गावी मात्र हात-पाय न चुकता धुते… ज्या गावात पाणी असेल त्या गावात आंघोळ करते, नाहीच मिळाली करायला तर चालवून घेते.

भरपूर ऋतुजन्य, स्थनिक फळं, भाज्या, रानभाज्या मिळतील तशा आवर्जून खाते. रोजरोज गव्हाची साधी पोळी नकोच त्यापेक्षा वेगवेगळ्या धान्यांची विशेषत: नाचणी-तांदळाची भाकरी (स्वत:च्या घरी असेन तर) चालते. तुरीची डाळ गेल्या वर्षी एकदा खाल्ली होती. मसुर डाळ, मूग डाळ किंवा अन्य (कुठल्याही राजकारणात भाव खाऊन न चढणाऱ्या) डाळी खायला लागल्यावर अधिक आवडू लागल्या.

कांदा महाग झाला म्हणजे तो खाण्यासाठीचा योग्य ऋतु नाही असं आपलं मला वाटतं. बरेचदा तेव्हा रानभाज्यांची चंगळ असतेच. काही बिघडत नाही.

स्वयंपाकासाठी रिफाईड तेल नाही. घाण्याचं शक्यतो दरवेळी वेगवेगळं तेल वापरते. एकाच तेलाला काय डोक्यावर घ्यायचं?! मला कुठल्याही तेलाचा वास त्रासदायक होत नाही अन कुठल्याही प्रदेशातील अन्नसंस्कृती अद्याप तरी नावडली नाही.

सगळ्यात ’वैविध्य’ जमलं की कुठलेही एकाच प्रकारचे जंतू पोसले जात नाहीत. त्यांचं वैविध्य जितकं तेवढी आपली तब्येत चांगली रहात असावी असं माझं निरिक्षण आहे.

त्यातून जे मला खात येत नाही ते ते सगळं आमचे कंपोस्टमधले सूक्ष्मजीव खातात… अधूनमधून मिर्च्या, कारली, टोमॅटो उगवलेच तर ते परत मीच खाते!

सूक्ष्मजीवाय नम:!

अर्थात या सगळ्यात मी फारशी आजारी पडत नाही यात माझे काहीच कर्तृत्व नाही, कारण आपली प्रतिकारशक्ती ही अजबच असते, व्यक्तीनुसार बदलते. फारतर माझ्या पूर्वजांच्या जनुकांना अन सूक्ष्मजीवांना धन्यवाद… वयानुसार अन इतर कारणांनी जंतूंमुळे न होणारे आजार होऊच शकतात. मात्र त्यासाठी सूक्ष्मजीवांना बोल लावणार नाही मी!

अजून अनेक गोष्टी अशा अहेत जिथून बाजारू रसायनांना दरवाजा दाखवून सूक्ष्मजीवांना मोकळं सोडायला आवडेल… काम सावकाश चालू आहे. कारण कुठल्याही एकाच धोरणाचा अतिरेक म्हणजे अंधश्रद्धाच पुन्हा…

अम्मा अन्नपूर्णा

हे एक भाषांतर फार दिवसांपासून अधांतरी होते. पूर्ण करून ब्लॉगावर टाकेपर्यंत पुढच्या दक्षिणयात्रेची वेळ झाली आहे!! तरीही……
***

ते बाकी काही असो, आयुष्य ही एक खाद्ययात्राच असते! एका जेवणाकडून दुसऱ्या जेवणापर्यंत माणसाचा प्रवास निव्वळ पुढच्या मेजवानीच्या आशेवर होत असतो! तसं पाहिलं तर एकाच प्रवासाचं अनेक प्रकारे वर्णन करता येतं, पण या प्रवासाची गोष्ट मात्र चवीपरीने चाखता येईल अशी आहे!

असं म्हणतात कि साक्षात आदिशक्तीच माणसाच्या भौतिक गरजा जसे की भूक, भागवण्याचं काम करत असते. या समजामागे हेतू असा कि माणसाने आयुष्यात छोट्यामोठ्या गरजांपाठी धावत राहू नये. त्याच्या जगण्यामागे काही मोठा हेतू असावा. मनुष्य जर विश्वाच्या पसाऱ्यात काही कळीची भूमिका पार पाडत असेल तर विश्वच त्याचे क्षेम वहात असते. यात अंधविश्वासापेक्षाही साधा उपयुक्ततेचा विश्वनियम आहे. याला तुम्ही वैश्विक शक्ति म्हणा, मदर मेरी म्हणा, आदिशक्ति, अंबाबाई, ग्वादलूपे किंवा आई, आज्जी, काकी, मामी म्हणा! नाटकातले नट बदलत राहतात मात्र भूमिका तीच असते. कुणीही रांधले तरी शेवटी काय?! आपले पोट रोज भरले जाते.

तर ते दोन आठवडे माझेही पोटपाणी आदिशक्तीच्या कुठल्या ना कुठल्या रूपाने सांभाळलेच! ही एक मजेदार गोष्ट आहे जी पोटाला आत्म्याशी सांधून घालते!

पहिला एक आठवडा मी ऑरोविलमधे मातीचे बांधकाम शिकण्यात घालवला. माझा दिवस लेक्चर्स, केसस्टडी, डिझाइन स्टुडिओ अन भाराभार पुस्तके खाण्यात जात असे. असल्या बौद्धिक कसरतींशिवाय पहिले दोन दिवस ऑरोविलचा नकाशा मनात पक्का करणे, एका हातात टॉर्च धरून सायकल चालवणे इत्यादी कौशल्य शिकण्यात गेले. इथे एकापेक्षा एक वरचढ खायच्या जागा असल्या तरी मला झाडीतून निवांत सायकलवर फिरत त्या शोधण्याचा वेळ अजिबात नव्हता.

दगडी ब्रेडवर बटर अन जाम थापटून खाणे हा माझ्या रात्रीच्या जेवणाचा ठरलेला बेत होता. माझ्या खोलीच्या मध्यात फ़रशीवर, पुस्तकांच्या गराद्यात बसून मी रोज नित्यनियमाने ब्रेड बटर “जेवत” होते. बंद न करण्यासाठी बनवलेल्या खिडक्यांमधून डासांसोबत देशोदेशीचं संगीत खोलीत शिरत असे. फ्रेंच, इटालियन, ग्रीक किंवा मध्यपूर्वेतील लोकसंगीत हा माझ्या जेवणातला एकमेव नवा पदार्थ असे!

पण त्या एका आठवड्याची आठवण येतात मनामधे एकच चित्र उभे राहतं, अर्थ इन्स्टिट्यूटचं उजळ ग्रंथालय, तिथली नीरव शांतता भंग करण्याचे अधिकार फक्त चिरचिरत झाडांवर फिरणाऱ्या खारींना अन मोरांच्या केकांना आहेत. जेव्हा भोवतीच्या डहाळ्यांतून वाऱ्याची झुळुक फिरायची, तेव्हा पानातून गाळून खाली उतरणाऱ्या उन्हाचा सोनहिरवा नाच सुरू व्हायचा…

मातीच्या बांधकामावरच्या जगातल्या उत्तमोत्तम पुस्तकांच्या रांगांचा वास! या वासाला दिवसातून दोनदा खंड पडायचा, गरमागरम तामिळ कॉफीच्या सुगंधाने! इन्स्टिट्यूट्मधील दुपारचे जेवण हा एक साग्रसंगीत कार्यक्रम असतो. बांधकाम, पर्यावरण, देशोदेशीच्या कार्यसंस्कृतीचे अनुभव हे सारे  तिथला जागतिक विद्यार्थी समुदाय एका तितक्याच जागतिक खाद्यानुभवासाठी एकत्र जमतो! नारळाच्या दुधातले डोसे, “चपाथी”चे तामिळ रूप, भात अन सांबाराचे अनेक प्रकार! मात्र एका दिवशी पास्ता अन सांबार एकाच ताटात वाढून मिळाले तेव्हा मात्र मी हातच जोडले!

दुपारचे जेवण हेच एक खरे जेवण मिळणार असल्याने इन्स्टिट्यूटमधल्या अंजनी अम्माला मनोमन धन्यवाद दिले. जे काही रांधले असेल ते अम्मा एकदम हसऱ्या चेहऱ्याने वाढत असे! मी चुकून लायब्ररीतच खूप वेळ घालवला तर माझ्यासाठी राखून ठेवत असे…

तर अशा प्रकारे एक अभ्यासू अन भुकेला आठवडा संपत आला अन मी पॉंडिचेरीला जाऊन मनसोक्त खऊन घेण्याची संधी साधली! एका मस्त कोवळ्या सकाळी पॉंडिचेरीत पोहोचताच मी सरळ तामिळ रेस्टॉरंट गाठले. इडली वडा सांबरम अन गरम कॉफीच्या कपात मला, देवाशपथ, स्वर्गप्राप्तीच झाली. खरं सांगते, सांबाराच्या वाटीत कढिपत्त्याची फोडणी दिसली कि माणसाचा जगण्याचा दृष्टिकोनच सुधारतो!

गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या अबोल खाद्यप्रेमीचा एव्हाना ड्रायवरला अंदाज आला होता! त्याने दुपारच्या जेवणाला एका खास जागी गाडी थांबवली. हे एका फ्रेंच आर्किटेक्टने चालवलेले रेस्टॉरंट होते. अर्थात हे सांगण्याची गरज नाही कि हा गोरा देखिल ऑरोविलचाच आहे! फ्रेंचांची हलकाफुलकी पण रुचिपूर्ण सौंदर्यदृष्टी इथे पुरेपूर उतरली होती…त्यात तामिळ किनारपट्टीच्या बांधकाम कौशल्याची भर!

मी एका कोपऱ्यातल्या वेताच्या टेबलाशी जाऊन टेकले. अन मग बेसिल सॉसमधला मासा, उकडलेले बटाटे, फ्रेंच ब्रेड अन माणकं वितळवल्यागत हलणारी फ़्रेंच वाईन… तो तामिळ सर्व्हर मेन्यूवरील खास पदार्थ उत्साहाने सुचवत होता. हसऱ्या चेहऱ्याने खाऊ घालणाऱ्या आदिमातेच्या या रूपाला देखिल माझी काही म्हणता काहीसुद्धा हरकत नव्हती!

ऑरोविलमधून आपला गाशा गुंडाळण्यापूर्वी मी पूर्ण वसाहतीमधून एक फेरफ़टका मारला, ऑरोविलच्या सदस्य किंवा पाहुण्यांसाठी राखीव असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर भटकून आले. इथली शेवटची संध्याकाळ विझिटर सेंटरच्या मोकळ्या ढाकळ्या रेस्टॉरंटमधे घालवावी हे तर विचार न करताच मनाशी ठरून गेले होते. लाल मातीच्या ब्लॉक्स वापरून बांधलेल्या कमानी अन पुस्तकांच्या दुकानांनी वेढलेला लहानसा चौक म्हणजे हे रेस्टॉरंट. माडांच्या उंच खांबांमागे सूर्य मावळत होता. माझ्याभोवती रेस्टॉरंटची गजबज होती. टेबलावर एका कागदी कंदिलात दिव्याची ज्योत फुरफुरत होती. योगी अरविंदांच्या शिक्षणदृष्टीवर आधारित पुस्तकाला सोबत म्हणून डाळिंबाच्या रसाचा पेला अन केकचा तुकडा देखिल होते!

गेल्या काही दिवसात या आदिमायेने फक्त माझ्या पोटालाच नाही तर आत्म्याला देखिल खाऊ घातले होते. ती संध्याकाळ मी मनाशी जपून ठेवली आहे, आईच्या मऊ स्पर्शासारखी, शाळेत पोंक्षेसरांच्या घनदाट दाढीत हसणाऱ्या शाब्बासकीसारखी अन भविष्याच्या आश्वासक अभिवादनासारखी…

मी ऑरोविल सोडले तरी तिची हळुवार काळजी मला सोडत नव्हती. विमानवाल्या गारढोण सॅंडविचवर दिवस ढकलून मी त्रिवेंद्रममधल्या हॉटेलात सामान टाकलं अन सरळ जवळच्या खानावळीचा रस्ता धरला. खानावळीची मालकीण एक गोड मल्याळी बाई होती. तिच्या गजऱ्यातल्या जाईच्या सुवासाने मला खरोखर केरळात आणून ठेवले!

आपले मोठाले डोळे रोखून मालकीणबाईंनी माझी पूसतास केली. कित्येक तास आवरून धरलेली भूक मला नीटशी लपवता येत नाही बहुदा! तिने लगोलग माझ्या पनात भाताचा शीग लावला. दोन चार प्रकारची सांबारं अन केरळी चटण्या वाढल्या. मग गोड हसून तळलेल्या माशाचे दोन तुकडे देखिल वाढले, मी न मागता!! माझा अर्धा रडवेला अन अर्धा हसरा चेहरा काय ते सांगून गेला असावा कारण अम्हा दोघीत शब्दांची कुठलीच भाषा शक्य नव्हती!

त्रिवेंद्रमचे रिक्षावाले मात्र इतके हळुवार अजिबात नाहीत! अगदी पिसाळलेल्या वळूसारखे गाडी चालवतात! विचित्र पत्ते शोधून काढण्याच्या त्यांच्या हातखंडा कौशल्याशिवाय माझी लॉरी बेकर तीर्थयात्रा सफळ संपूर्ण झाली नसती हे मात्र इथे मान्य केले पाहिजे. चांगली टीप हवी असेल तर मला त्यातल्यात्यात अस्सल जागी खायला उतरवायचे हे त्या चलाख रिक्षावाल्याला अंतर्ज्ञानानेच कळले!

जेऊनखाऊन मी जेव्हा कन्याकुमारीला जाण्यासाठी गाडीत बसले तेव्हा मात्र झोप अगदी डोळ्यावर आली. कोवलमच्या समुद्रकिनाऱ्याचा खारा वारा अमली पदार्थागत काम करत होता. मधूनच जाग आली तर एक हिरव्या रंगाची सलग भिंत मागे धावत असावी तशा नारळीच्या बागा खिडकीतून दिसत होत्या. इतका हिरवा रंग पहात झोपलं तर स्वप्नसुद्धा हिरवी पडतात, मी खात्रीशीर सांगू शकते!

विवेकानंद केंद्राच्या शांत आवारात उतरले ती एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात अल्लद उतरावं तसंच काहीतरी. एका दीर्घ मुलाखतीनंतर ज्यात माझ्या भेटीच्या उद्देशापासून ते पूर्वजांपर्यंत सगळे सखोल चौकशी झाली, मला केंद्राच्या अतिथिगृहात रहायची परवानगी मिळाली. विवेकानंद केंद्राचं हे आवार म्हणजे एक छोटं शहरच आहे. कार्यकर्ते, सदस्य अन कर्मचारी यांशिवाय पाच हजार केवळ अतिथी एकाच वेळी इथे राहू शकतील! स्वच्छ नेटक्या खोल्या अन सुरेख खारा वारा, बस्स मी तर खूष होते.

सुरवातीची कडक चौकशी वगळता, एकदा आत घेतल्यावर मात्र केंद्राच्या लोकांनी भरभरून कोडकौतुक पुरवलं! सख्ख्या घरच्यागत खाऊपिऊ घातलं! विवेकानंद केंद्राचं कॅंटीन, “गौरीशंकर” ही एक अजब जागा आहे जिथे केंद्राचे कार्यकर्ते, पाहुणे, माझ्यासारखे विनाकारण अभ्यासू असले सगळे नमुने एकगठ्ठा सापडतात. गौरीशंकराचे लुंगीबद्ध म्यानेजर साहेब हसून मला टेबलापाशी बसवून गेले अन मला अचानकच मोकळं वाटू लागलं…..परकेपणा विसरूनच गेले मी! तिथला “लिमिटेड रैस मीळ” माझ्या पोटाच्या लिमिटच्या पलीकडेच होता. पण मी ताट कसंबसं रिकामं करतेय तोवरच वाढपी दादा आपल्या शुभ्र दंतपंक्ती दाखवीत भात वाढायला सरसावले. त्यांची “लिमिटेड” ची संकल्पना नक्की काय होती? माझ्यात ठासून भात भरून पाठवणे?! तोवर म्यानेजर साहेब माझ्यासाठी केळं घेऊन आले, “गुड फार डायजेशण्ण!” स्वत: एका केळ्याचा समाचार घेत म्हणाले!

मला एकटीला जेवायला आवडतं, कारण मग वाचता वाचता जेवता येतं. मात्र गौरीशंकरातल्या सगळ्यांना माझी ही खोड विचित्र वाटत असे. माझे “व्हायब्रेशन” म्हणे फार चांगले होते, असा अभिप्राय एका जेव्याने दिला तेव्हा मी सपाटच! आपल्याला बुवा लोकांची “व्हायब्रेशन” नुसार वर्गवारी करता येत नाही!

तिथे एक मलेशियन बाई येत असत. आपली चिनी नववर्षाची सुट्टी त्या केंद्रात योग व अन्य काहीबाही शिकण्यात घालवत होत्या. एक अत्तिशय चिवित्र कार्यकर्ता देखिल येत असे. तो अध्यात्म-भुकेल्यांची एक फेसबुक जत्रा चलवत असे. त्याने मलाही जत्रेत सामील करून घेण्याचा बराच यत्न चालवला. माझ्या “व्हायब्रेशन”चा परिणाम कि काय कोण जाणे! शेवटी हात जोडून स्पष्टच नाही म्हणल्याशिवाय काही लष्टकं सुटत नाहीत हेच खरं.

केंद्रात विवेकानंदांवर एक अतिशय सुरेख चित्रप्रदर्शन आहे. तिथल्या तिकीटमास्तरांनी मला “टॉप आर्किटेक्ट” होण्याचा आशीर्वाद दिला आहे! आहेम! मी त्यांना “असं टॉप नावाचं काही नसतं हो” असं समजावायचा वायफळ प्रयत्न केला…. पण जाऊदेत.

खूपदा जेव्हा तुम्ही सपक, साधं, अनग्लॅमरस खरं बोलता तेव्हा लोकांना तो तुमचा मानभावीपणा वाटतो अन अधिकच पंचाईत होते! मग ती मोठेपणाची अवजड टोपी घालून घेण्यावाचून पर्यायच नाही उरत. त्यात काही गौरवाची भावना होत नाही, तर अतीगोड औषध प्याल्याची भावना होते….. नंतर जिभेवर कडवटपणा रेंगाळवणारं मिट्ट गोड औषध…..

त्यांची निरागस सद्भावना माझ्या फटकळपणाने का दुखवा असा विचार करून मी माझा जुनाच निरागस बहिरेपणाचा आव आणून प्रश्न निकालात काढला. हे सगळेच लोक मला गोड हसून सामोरे आले, माझ्याशी फार प्रेमाने वागले. त्यात त्यांचा काहीही हेतू नव्हता, माझ्याकडून मिळण्यासारखं काहीएक नव्हतं. मी केवळ एक पाहुणी होते, दोन चार दिवसात कायमची निघून जाणारी…. तरीही त्यांच्यासाठी मी परकी नव्हते…..पुन्हा “व्हायब्रेशन”चा परिणाम बहुदा!!!

केंद्राला भेट देण्याचा माझा मुख्य हेतू होत वासुदेवजींची भेट घेणे. विवेकानंद केंद्राच्या natural resource development प्रकल्पाचे प्रमुख अन अनेक भाषा ज्ञात असलेला हा एक सुरेख माणूस जो organic architecture बद्दल एक आनंददायी जीवनानुभव असल्यागत बोलतो!

त्यांच्याच हाताखाली बांधला गेलेला “technology research center” चा परिसर हे पर्यावरणपूरक वास्तुरचनेचं एक सरळसोट उदाहरण आहे! सिस्टर सरस्वथी तिथल्या व्यवस्थापनाची जबाबदारी पाहतात. मी त्यांना प्रथम भेटले तेव्हा ही चिटुकली बाई स्वयंपाकघरामागे “हरिभजनम” गुणगुणत “पाप्पडम” तळत बसली होती. सरस्वथीअक्कानी मला “सगळा परिसर पाहून जेवायला इथे ये” अशी आज्ञा केली. मी बारीक आवाजात “कँटीनमधे जाईन मी” असं पुटपुटले मात्र अन ती आदिमाया आपले काजळ रेखलेले डोळे माझ्यावर वटारून म्हणाली, “अम्मा जेव्हा आमच्या सोबत जेवायची आज्ञा करते तेव्हा नाही म्हणायचं नसतं”. मी बिचारी काय बोलणार! त्या अम्माने पुन्हा डोळे वटारू नयेत अशी प्रर्थना करून स्वयंपाक घरात मदतीला सरसावले.

एकदा मी जेवणाला थांबायचे कबूल केल्यावर मात्र सरस्वथीअक्का एकदम खुषीत आल्या अन म्हणाल्या कि तुमचं पुणं फारच बाई बकवास शहर आहे. मी लगोलग मनापासून हो म्हणून टाकलं!! मग त्या म्हणाल्या कि आर्किटेक्ट लोक फारच उपद्रवी जमात असते. मी त्यालाही मान डोलावली! अन अशा प्रकारे आमच्यात एकमत झाल्याने सुसंवाद प्रस्थापित झाला! अक्कांच्या ताबेदारीत मी “कुंजुम” तामिळ देखिल शिकून घेतलं. “मोदुम” म्हणजे ताक अन “पोडुम” म्हणजे पुरे झालं. माझं तामिळचं अज्ञानप्रदर्शन देखिल इथेच पोडुम झालं.

हळूहळू अक्कांचं सगळं जग माझ्यापुढे उलगडू लागलं. त्यांची झाडं, त्यांचे लोक, त्यांचे विद्यार्थी, त्यांचं स्वयंपाकघर, पाळलेली मांजरं, पक्षी…. अन मी देखिल…. सरस्वतीअक्कांनी त्यांच्या नकळतच मला माझ्या सगळ्या प्रवासांचं सार काढण्यापर्यंत आणलं…. इतके दिवस मला का अन कोण जेऊ घालत होते याचा आश्चर्यकारक उलगडा त्यांच्या रागे भरण्यातून होऊ लागला आहे. जेवणाची किंमत हजार रुपये, चाळीस रुपये किंवा नुसताच एक रागीट कटाक्ष असो, मात्र या दक्षिणयात्रेत मला दररोज जेऊ घातले गेले. काहीतरी कारण नक्कीच असणार…..

शेजार….

माणसांच्या आयुष्याचे…. त्यांच्या बरोबर-चूकचे संदर्भ असतात वेगवेगळे. सरळ आयुष्याला कौतुकमिश्रित तिरस्कार वाटतो आडनिड्या वाटेने भटकणाऱ्या स्वच्छंदी आयुष्याचा…. अन मुक्तपणे विहरत उलघडत जाणाऱ्या आयुष्याला त्याच सरळ आयुष्याच्या स्थिरतेचे….. विश्वासाचे असाध्य अप्रूप असते….

माझ्या शेजारणीला षोक आहे स्वच्छतेचा….. माझ्याहूनही जास्त! तिच्या दाराखिडक्यांनाच काय सभोतीच्या भिंतीना देखिल तिच्या भुश्शकन पाणी ओतणाऱ्या बादलीची सवय! बरं पुन्हा तिच्या स्वच्छतेचे शिंतोडे माझ्या घरात उडले तर काय फरक पडणार असा?!

असंही माझ्या घराला स्वच्छतेच्या शिस्तीपेक्षा लहरी नादिष्टपणाचेच अधिक डोहाळे….. मग तिच्या घरातून अलगद वाऱ्यावर स्वार होत आलेल्या कचऱ्याचा अनमान कसा करावा, तोही निमूट माझ्या केराच्या टोपलीत जाऊन बसतो….. शेवटी आम्हा दोघींची घरे स्वच्छ झालीच ना!

माझ्या बागेतल्या कचऱ्याच्या वाफ्याशी मात्र सखी शेजारणीचे कट्टर वैर आहे…. जिथे मला ओल्या कचऱ्यापासून पाहता पाहता उमलणारी मोगऱ्याची फुलं दिसतात तिथे तिला कांद्याची साले, मटाराची टरफले अन असलंच काहीबाही दिसतं…..

चौदा वर्षात हळूहळू कंपोस्टच्या वासावर माझे प्रेम जडले आहे! इतका मऊसूत, जमिनीशी बांधलेला, मार्दवी वास लोकांना दुर्गंध कसा वाटू शकतो असा कैक वेळा विचार करून पाहिला…. पण तरीही पुन्हा मातीत हात घालताना सुखाची शिरशिरी आल्याखेरीज रहात नाही! शेजारीण मात्र पहात असते तिला शिसारी आल्यागत!!

कदाचित माझ्या हसण्याची बाधा तिला होऊ नये म्हणून आठ्यांचे संरक्षण घेत असावी!

मला मात्र कचऱ्यावर पोसलेल्या अळूचे, दोडक्या-कारल्यांच्या वेलींनी घातलेल्या वळ्से-वेलांटयांचेच कौतुक….. कचऱ्यातच पडलेल्या मिरच्यांच्या बिया रुजून जेव्हा चांदणीदार फुलोरे वाऱ्यावर डोलले तेव्हा तर आमच्या घरात नव्या बाळजन्मागत आनंद झाला साऱ्यांना….. त्या झुडपातल्या मिरच्या शोधून तोडून स्वयंपाकघरात नेल्या जात तेव्हा उगाच स्वयंपाक अधिक चांगला झाल्यागत वाटत असे….

या बागेत मी हौसेनी लावलेल्या रोपा-झाडांपेक्षा स्वत:च्या मर्जीने मूळ धरणाऱ्या उत्साही झाडांचेच राज्य अधिक चालते! त्याभोवतीच्या पसाऱ्यात आमच्या घरातल्या इतर छंदांचे अवशेष सापडतात ते वेगळेच! गेल्या चैत्रातल्या मातीकामाचे वेडाचे भेगाळलेले नमुने, पुनरुज्जीवनाची वाट पहात बसलेल्या फुटक्या कुंड्या, गेरूची सुकली ढेकळं अन मातीच्या गिलाव्याची नवी पद्धत आजमावून पाहताना भिंतीवर केलेले नमुन्याचे सारवण!

तिथंच मांडी ठोकून चहा घेत, आपल्याच पसाऱ्याचे कौतुक करत, येत्या रविवाराला आवराआवरीचे खोटेच वचन देत मी रोजची सकाळ घालवते! टागोरांच्या पोरवयापासून ते रविवार लोकसत्तेच्या पुरवण्यांपर्यंत साऱ्या “साहित्यावर” माझ्या बागेच्या मातीचे शिक्कामोर्तब कधीनाकधी होतेच! आमच्या घरातून नव्या जुन्या गाण्यांच्या लकेरी आकंठ येत राहतात जाग असेपर्यंत सारा वेळ….. अन असल्या पावसाळी हवेत इथे उंच डोंगरातून जेव्हा वारा घुमतो तेव्हा दुपारच्या नीरव शांततेलाही कसलीशी राकट, आदिम नैसर्गिक ओढ लावून जातो…. झुळकेवरला श्रावणगंध हुंगून मन भरत नाही….

सारे आकाश ढगाळ ढगाळ…. अन बाहेरच्या कदंबावर फुलोऱ्यांचे चेंडू लटकत असतात वाऱ्यावर झोके खात! सकाळी थोडे जरी ऊन आले तर त्यांवर झुंबड उडते पक्षी, फुलपाखरं अन मधमाश्यांची! खिडकीत अडकावलेल्या खोक्याच्या घरट्यातून चिमणा-चिमणीची पोक्त लगबग चालूच असते….. खाली दरीत माझं लाडकं पुणं उन्हाची वाट पहात सुस्तावलेलं…… कट्ट्यावर आमचा शुभ्र पांढरा बोका देखिल तसाच पहुडलेला, उन्हाची तिरीप आलीच एखादी तर पाठीवर लोळून सूर्यस्नान घेणारा!

मग मीही नि:श्वास सोडत वेताच्या झुल्यात अंग सोडून देते….पुढच्या रविवारच्या सफाईचे नियोजन करत करत डोळा बरा लागतो! जाग येते तेव्हा मी कौतुकाने पहाते तिच्याकडे, शेजीबाई मात्र घसघसून खिडक्या पुन्हा धूत असते आठ्या घालून!

ग्रामपरीच्या प्रकरणात अधिक खोलवर….

भाग १: ग्रामपरीच्या प्रकरणात…

एमआरएचं आवार गेल्या चाळीस वर्षात राखलेल्या झाडांची फुला, पक्ष्यांनिशी नांदती राई आहे. इथे सकाळी, संध्याकाळी, रात्रीच्या शांततेत….कधीही एकांत धावून येतो, जिवलग मित्रागत! मला तर या एकांतात इथल्या पायवाटांनी भिरीभिरी फिरतच रहावंसं वाटतं!

एखाद्या पायवाटेवर मधेच अचानक गुलमोहराचा भडक लालबुंद तुरा उगवलेला असतो…. तर वळणापलीकडे जॅकरांडाने निळ्या जांभळ्या मखमलीच्या पायघड्या घातलेल्या असतात…मधेच जणू आहेत ते रंग कमीच पडले असावेत असा बहाव्याचा सोनपिवळा संभार उसळून येतो! माझ्या कमळांच्या तळ्याभोवतीची झाडी पाण्यावर ओठंगलेली असते…. त्यात धिटाईने नाचणारे दयाळ अन बुलबुल माझ्याकडे तुच्छ दुर्लक्ष करतात! त्याच झाडांत राहणारा एमआरएचा निवासी पॅराडाइझ फ्लायकॅचर एखाद्या सेलिब्रिटीसारखा क्वचित दर्शन देतो! कुण्या रसिकाने त्याचं नाव स्वर्गीय नर्तक ठेवलंय कोण जाणे….पण त्याचे कमनीय विभ्रम मी फक्त मुक्याने पाहून घेतले आहेत. सौंदर्याच्या पुराव्यासाठी फोटो काढत बसण्याइतकी जागरूक पर्यावरणप्रेमी नाहीच बहुदा मी!

संध्याकाळी एखाद्या पायवाटेनं जरा लांबवर गेले तर रानमोगऱ्याने सगळा सुवासिक दंगा घातलेला असतो! करवंदी अन जांभळांचे घोस पाहून आताशा हरखून जाणं बंद केलंय मी…. त्या झाडांवर माझ्यापेक्षा अधिक अवलंबून असलेले पक्षी, किडे अन छोटी पोरं जास्त महत्त्वाची आहेत!

अर्थात निसर्गवर्णनात मला आग्या माश्यांचा उल्लेख मोठ्या आदराने केला पाहिजे. या वात्रट माश्यांनी माझ्या सकाळच्या “वॉक”चा “जॉग” केला होता! त्यांची घोंघों माझी पाठ सोडत नव्हती अन मग धूम पळत खोलीत जावं लागलं होतं!!

माझी रहायची व्यवस्था “व्हॅली व्ह्यू” नावाच्या इमारतीत आहे. इथून पाचगणीची हिरवीगार दरी दिसते हे पुन्हा सांगायला नकोच. वळवाचा पाऊस अन गारा या दरीतून उसळी खात अंगावर धावून येतात तेव्हा मात्र “रौद्र” या शब्दाचा अर्थ नीट कळतो!

अजून देखिल खूप आवडीच्या जागा आहेत माझ्या या आवारात विखुरलेल्या…. सोनचाफ्याच्या झाडाखाली गोलाकार लावलेले बाक, बॉटलब्रशच्या झिपऱ्या झाडाखाली गप्पांच्या आमंत्रणासारख्या रेंगाळलेल्या खुर्च्या…

अन ग्रामपरीच्या शेतांभोवती अती सलगीने वावरणारे मोर! आवारातच उंडारणारे दोन चार भटके कुत्रे कंटाळा घालवायला या मोरांच्या मागे लागतात. पण हे अगोचर पक्षी आपला अवजड संभार घेऊन मोठ्या चपळाईने उंच कुंपणावर जाऊन बसतात….. तेही मोठ्या तोऱ्यात! यातल्या एका बेट्याने ग्रामपरीत काम करणाऱ्या मावशींच्या मागे मागे फ़िरून त्यांना चोची मारून अगदी वैताग आणला होता म्हणे!

क्वचित कधीतरी त्यांच्या आर्त केका साऱ्या दरीत घुमून येतात…. एखाद्या ढगाळ संध्याकाळी तो आवाज मन ढवळून काढतो…. काहीतरी सलणारं, एरव्ही मनाच्या कोपऱ्यात अडगळ म्हणून सारलेलं वर येऊ पाहतं…. मात्र असल्या सुंदर जागी दुखऱ्या आठवणी देखिल नकोश्या होत नाहीत…. बरंवाईट सगळंच आपलंसं होऊन जातं….माझ्या अस्तित्वासाठी पूरक होऊन जातं….

***

ग्रामपरीच्या सेंद्रीय शेतात काम करणाऱ्या  सुनीताताईंच्या (नाव वेगळं आहे) घराची दुरुस्ती चालू आहे. त्यात मदत करायला सौम्या (ग्रामपरीच्या “वॉश” प्रकल्पाची प्रमुख), मला घेऊन गेली होती. सुनीता ताई अन त्यांच्या नवऱ्याची मिळून मासिक कमाई दहा हजार पण नाही. घरात स्वत:ची अन नात्यातली मिळून पाच लहान मुलं आहेत. वाटणीत मिळालेला घराचा पडका भाग दुरुस्त करण्यासाठी अन नवीन शौचालय बांधण्यासाठी त्यांना ग्रामपरीतले सगळे मदत करत आहेत. सौम्या अन मी सुनीता ताईंच्या घरी गेलो तेव्हा जोरदार पाहुणचार झाला…. आमच्यासाठी ते माझाच्या जातीतलं मॅंगो ड्रिंक आणण्यात आलं…. त्या पडक्या घरात माझाची बाटली चकाकत होती… मात्र अजिबात शोभत नव्हती….उगाच मला टोचत होती! सौम्याने मला डोळ्यानेच दटावले. पाहुणचार नाकारून त्यांचा अपमान करणे अधिक वाईट आहे. पण आम्हा दोघींनाच ते सरबत अजिबात गिळवेना. मग सुनीता ताईना मी अजून थोडे कप आणायला सांगितले. सौम्याने सगळ्यांसाठी थोडं थोडं ओतलं. तिच्या सहजतेनं, मोकळ्या आपुलकीनं सगळे आपपर भाव पुसून टाकले! माझाच्या पार्टीवर पोरं जाम खूष होती! त्यांचं शुभ्र हसू पाहून माझा कडवटपणा कमी न होता तर काय!

आज पुण्यात कतरीना कैफचं माझाच्या जाहिरातीचं मोठ्ठं होर्डिंग अन त्याच्या भोवतीचा झगझगीत उजेड पाहिला कि….त्या घराच्या पडक्या भिंती आठवतात….

मोठ्ठा प्रश्न उगारावासा वाटतो विकासाच्या, सुखाच्या उपऱ्या कल्पनेवर!

हे ग्रामपरी प्रकरण फार जड जाणार आहे मला….
***
पाचगणीत महागडं ग्रिल्ड सॅंडविच, स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाणे, अवाच्या सवा किमती लावलेल्या अनावश्यक वस्तू खरेदी करणे हे सगळं पूर्वी केलंय मीही. पण माझ्या भोवतीच्या आवाराने आता मला इतकं घट्ट गुंतवून ठेवलंय कि गेल्या दोन महिन्यात मी एकदाही बाजारात गेले नाहीये. अद्याप काहीही खरेदी केलं नाहीये…. अन तेव्हापेक्षा मळक्या कपड्यात, चिखला मातीत, साध्या चपला घालून मी अधिक आनंदात आहे…. हे कसं काय?!
आता पाचगणीच्या बाजारात आनंद विकत घेता येणार नाही का मला?! पाचगणीतल्या महागड्या हॉटेलांना विकण्यासाठी आसपासच्या गावातून पाणी उपसून आणणारे टॅंकर, त्या गावातला वर्गसंघर्ष, राजकारण, पाण्याचं विकृत असमान वाटप…. दरवर्षी आटत चाललेल्या, पाण्याच्या हावेपोटी अधिक खोल अधिक रुंद होत असलेल्या विहिरी विसरताच येणार नाहीत?!

पाचगणीतल्या हिरव्या जंगलावर कडी करून उगवणारे अत्याधुनिक गृहप्रकल्प…. त्यांच्या सिमेंटने माखलेल्या उजाड जमिनी…. जांभ्या दगडाच्या हावेपोटी कुरतडून खाल्लेले सह्याद्रीचे लचके….

डोळ्यासमोर वणव्यात भस्मसात झालेली साडेतीनशे देशी झाडांची रोपं…. स्ट्रॉबेरीच्या अतिरिक्त लागवडीने गिळून टाकलेले डोंगरउतार…. उजाड झालेली टेबल लॅंड, हरवलेली जंगलं…. कायमचे उडून गेलेले पक्षी…. यांचा सगळ्याचा हिशेब पाचगणीच्या बाजारात मिळेल का मला?!

अस्वस्थ करून सोडणाऱ्या खूप गोष्टी आहेत इथल्या साजऱ्या पर्यटनाच्या चेहऱ्यामागे….. त्यांचे सगळे वाभाडे इथे काढणं कदाचित योग्य नाही…. माझ्या लोकांना त्याचा त्रास होता कामा नये.

मात्र या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आक्रमक न होता देण्याची हिंमत अन चिकाटी आहे आमच्या ग्रामपरीकडे…. विकासासाठी आपल्यापेक्षा दुर्बळाचा बळी द्यावा नाही लागत…. निसर्ग अन माणूस, श्रीमंत अन गरीब माणूस, लहान अन मोठा माणूस हे सगळे एकत्र सुखाने वाटचाल करू शकतात हा विश्वास आहे….

शाश्वत बदलाची सुरुवात स्वत:च्या अंतर्मनातच करावी लागते. एकदा तिथे परिवर्तन सुरू झालं कि त्याचे पडसाद बाहेरच्या जगात पडू लागतात. चांगल्या बदलांची शृंखलाच सुरू होते. एमआरएच्या व्यापक पसाऱ्याचा गाभा इतक्या साध्या विचारसरणीत आहे!

सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी आदर्शवादी बकवास खरंच प्रत्यक्षात आणू शकणारे लोक आहेत! साध्या वेषात, हसऱ्या चेहऱ्याने, सहजतेने बोलणारे…. माझ्यातल्या वेडेपणाला अधिकाधिक अभिव्यक्त करू देणारे…. आयुष्याची फार मोठी रहस्य जेवणाच्या टेबलावर गप्पा मारत वाटून घेणारे… आहेत अजून जगात!

या संस्थेची मी देत असलेली माहिती कदाचित अपुरी आहे. अधिक सविस्तर माहिती संकेतस्थळांवर पाहता येईल

http://www.iofc.org/panchgani तसेच www.grampari.org

ग्रामपरीच्या प्रकरणात…..

या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला खरंतर….

अगदी नक्की ठरवलं होतं मी कि आता उडाणटप्पूपणा बास करायचा अन शहाण्यासारखं एखाद्या आर्किटेक्टकडे काम करायचं नाकासमोर दररोज दहा ते सहा!

***

इकॉलोजिकल सोसायटीच्या वर्गातला माझा मित्र, रेनी, पाचगणीत काहीतरी काम करायचा म्हणे. ऑयकॉसमधल्या पर्यावरण सर्व्हेसाठी या भूगोलशास्त्रज्ञ मित्राला सोबत घेऊन भरपूर भटकायला मिळालं. तेव्हा मी त्याच्या मूळ कामाबद्दल चौकश्या सुरू केल्या.

तो एम आर ए च्या ग्रामीण पर्यावरण केंद्रात (ग्रामपरी) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचं काम करत होता. आता यातून मला सुद्धा काडीचा अर्थबोध झाला नाही. प्रत्यक्ष जाऊन काय काम आहे ते पाहिल्याशिवाय जिवाला स्वस्थता लाभलीच नसती, म्हणून मी ऑयकॉसचा निरोप घेतल्यावर एका दिवशी तडक उठून पाचगणीला गेले.

सहजच गेले…. या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला खरंतर….

तो जागतिक स्त्री दिन होता. ग्रामपरीच्या आवारात बरीच लगबग चालू होती. आसपासच्या गावातल्या महिला सरपंच अन त्यांचे पुरुष उपसरपंच (आहे किनी मज्जा!) जमले होते. ग्रामपंचायतीच्या कामकाजातला महिलांचा सहभाग निव्वळ प्रतिनिधित्व मिळून सुधारलेला नाही. मात्र ग्रामपरीमधे थोडं प्रशिक्षण घेऊन, कायदेतज्ञांशी, अनुभवी कार्यकर्त्यांशी चर्चा करून या महिला लोकप्रतिनिधींचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसला मला….

रेनीच्या मदतीने ग्रामपरीतल्या सगळ्यांशी ओळखी झाल्या. हसऱ्या जयश्री आंटी, रेनीचे बॉस, डॉ. जॅरेड अन सौम्यावर तर मी बेहद्द खूष होते! हे लोक ग्रामपरीचे डायरेक्टर वगैरे असतात याची फार गंभीर कल्पना नव्हती मला!

कोण कुठल्या देशातून उठून इथे पाचगणीत राहून माझ्या लोकांना पाण्याचं व्यवस्थापन, स्थानिक पर्यावरण, स्वच्छता, योग्य शौचालय बांधणी वगैरेबद्दल विचार अन काम करायला उद्युक्त करणारे हे कोण चमत्कारिक लोक आहेत?!

माझ्या नेहमीच्या अबोलपणावर कडी करून माझे सगळे विचित्र प्रश्न बाहेर उड्या मारत होते. अन तात्पर्य असं की रोजच्यासारख्या त्या साध्या दिवसाच्या शेवटी जॅरेडने मला ग्रामपरीत काम करायचं आवतन दिलं!

मी खूप घाईघाईने होकारार्थी मान डोलावून, तोंडाने नाही म्हणत होते….

पुढच्या आठवडयात जॅरेडसोबत गोडवली गावात चालू असलेलं झऱ्यांच्या व्यवस्थापनाचं काम बघायला गेले. (त्यावर एक अजून पोस्ट लिहू आपण) पण नुसतं बघायला माझं काय जात होतं…..

असंही या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला….

त्याच दिवशी माझ्या कामाचं स्वरूप, कामाचे तास, दिवस अन इतर तपशील ठरत गेले. पुढच्या आठवड्यात मी ग्रामपरीसोबत काम करण्याचा करार केला! हा दोन महिन्यांचा करार अतिशय हुशारीने आखलेला असून त्याच्या कालावधीत भविष्यात वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे! मी मात्र नाही म्हणणार आहे….

अजूनही या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचं नाहीये मला….

मग जमेल तेव्हा घरून काम करणं सुरू झालं. झरे पुनरुज्जीवन प्रकल्पाचं संपूर्ण दस्तावेज दोन भाषांत तयार करणे हे मुख्य काम. भरपूर रेखांकने, नकाशे अन चित्रं वापरून पश्चिम घाटात अथवा तत्सम प्रदेशात वापरता येईल असं भूजल व्यवस्थापन हस्तपुस्तक तयार होत आहे.

मात्र त्यासाठी मलाच आधी भूजलसाक्षर होणं भाग होतं. त्याशिवाय कसली रेखाचित्रं काढणार होते?!

मग माझ्या पुणे पाचगणी फेऱ्या सुरू झाल्या. आता एसटी महामंडळ माझं दुसरं घरच झालंय. पुणे महाबळेश्वर निमआरामच्या सगळ्या कंडक्टरांना मी ओळखते आताशा! त्याशिवाय माझ्या नमुनेदार सहप्रवाशांवर एक सविस्तर पोस्ट लिहेन कधीतरी!

पाचगणीत दरवेळी बसमधून उतरले की एक खोल श्वास घेते मी….. सगळा सह्याद्री…. सगळं जंगल… सगळे झरे, दरीवर घिरट्या घालणारे गरूड, पायरीदार भातखाचरं अन भन्नाट गार वारा…. हे सगळं सगळं एका श्वासात भरून घेते!

आता इथून पुढे या सगळ्या प्रकरणात न पडणं शक्यच नाही हे लक्षात येतं माझ्या…..

एम आर ए च्या आवारात शिरतानाच मी दात काढत हसायला लागलेली असते…. जणूकाही संचार होतो माझ्यात कुठल्यातरी उत्साही चिवचिवत्या पक्ष्याचा! चालत जाते कि उडत जाते तेही लक्षात येत नाही!

मग भरपूर चर्चा, झालेल्या कामाचा मागोवा, पुढे काय काय रेखांकने करायची याचा विचार…. कधीकधी सकाळ ते संध्याकाळ गावात चालू असलेल्या कामाची पहाणी. अर्थात त्याला पहाणी म्हणणं हास्यास्पद आहे. जॅरेड अन त्याचे सहायक अशोकभाऊ यांच्यासोबत मी देखिल पोती उचल, सिमेंट कालव असले उद्योग करते. जुने दगडी हौद खराट्याने साफ करण्यापासून सिमेंटची घमेली वाहून नेण्यापर्यंत अन जॅरेडसाठी दिवसभर धावते भाषांतर करण्यापासून ते एमआरएच्या आवारात, कमळाच्या तळ्याकाठी बसून रेखांकने करण्यापर्यंत सगळेकाही माझे काम आहे!

एका दिवशी सकाळपासून भाषांतरे करून मी इतकी बावचळले होते की गोडवलीच्या मीटींगमधे मी गावकऱ्यांशी इंग्रजी अन जॅरेडशी मराठी बोलायला सुरुवात केली. अख्खं गाव हसत होतं मला! मग एका तुकाराम आबांनी आवाज टाकला, “ताईंसाटी च्या सांगा रे!”

***

एम आर ए मधे रहाण्याजेवण्याची सोय फारच उत्तम आहे. मला विचाराल तर माझ्या जरूरीपेक्षा खूपच लाड होत आहेत! शिवाय मला स्वयंपाक करावा लागत नाही हा बोनस!

इथली जेवणवेळ हा एक विशेष कार्यक्रम असतो. सुरुवातीला इतक्या साऱ्या अनोळखी लोकांसोबत जेवायला मी फार घाबरत असे. कुठे बसू? कुणाशी बोलू? अन काय बोलू?!

मुळातच ही संस्था समजून घेणं अन एका पोस्टमधे समजावून सांगणं अशक्य आहे माझ्यासाठी…

मात्र बघता बघता या जेवणवेळा माझ्या सगळ्यात मोठ्या शैक्षणिक संधी झाल्या. अनोळखी लोक हा शिकण्याचा केवढा मोठ्ठा खजिना असतो! रोज मी नवीन टेबलाशी बसते. कधी माझ्या शेजारी एम आर ए मधे काम करायला आलेले इंटर्न्स असतात, कधी माझे बॉस लोक असतात, त्यांचेही वरिष्ठ पदाधिकारी, एम आर ए चे जुने सहकारी, निवासी कर्मचारी, स्वयंसेवक…. वेगवेगळ्या देशातून आलेले विविधरंगी लोक! त्यातल्या प्रत्येकाचं काम, पूर्वेतिहास, त्यांच्या प्रेरणा… सगळं किती वेगळं!

मी मात्र जे सापडेल त्याला प्रश्न विचारून सोडते! एकदा एम आर ए च्या सेक्रेटरी काकांचं ताट माझ्या प्रश्नांची उत्तरं देतदेता सुकून गेलं आहे! (नंतर बहुदा त्यांनी माझं टेबल टाळलं असावं!)

रोज किमान शंभर दिडशे लोक जेवणार म्हणजे घासण्यात भांडी किती पडत असतील! इथे रोज एका विभागातले लोक ताटं वाट्या विसण्याचं काम करतात. गाणी म्हणत, चेष्टा मस्करी करत भांडी घासायला मीही जाऊ लागले. तसंही मला लहानपणी भांडी घासण्याचा खूप षोक होता…

मोठं झाल्यावर (म्हणजे ओट्यावर हात पुरण्याइतकं मोठं!) भांडी घासण्याचं स्वप्न असं पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं!

एका विशेष गर्दीच्या दिवशी भांडी घासायला मदत केल्याबद्दल आमच्या आफ्रिकन इंटर्न “योना”ने चक्क मला मिठी मारली! मीही बावचळल्यागत हसून साबणाच्या फ़ेसात घातलेले हात तिच्या गळ्यात टाकून मोकळी झाले!

याच मुलीने एका संध्याकाळी प्रार्थनागृहात तिच्या मधाळ आवाजात कुठलीतरी आर्त देवकवनं गायली होती….. तो स्वच्छ घंटेसारखा नाद देवाच्या कानावर न पडणं अशक्य आहे!

***

उरलेल्या गोष्टी वेळ काढून लिहीत आहेच…. आणिक फोटो सुद्धा टाकेन पु्ढच्या पोस्टमधे!

भाग २: ग्रामपरीच्या प्रकरणात अधिक खोलवर

चौकट….

शाळेत चित्रकला विषयात मला नेहमी दहापैकी नऊ गुण मिळत. एक गुण कापला जाई, चित्राला चौकट न काढल्याबद्दल! सुदैवाने कुणी दहापैकी दहा मिळव म्हणून भुणभुण करीत नसे! मलाही नऊ गुण मिळवून पुरेसा आनंद होत असे त्यामुळे साधी एक चौकट काढून दहा गुण मिळवायचे मात्र लक्षात आले नाही!

पुढे सरकारी चित्रकला परीक्षेत मी नापास झाले, बहुदा चौकट नसल्याने बाद केले असावे!! तर त्यामुळे मला कलेचा “गाभा” शोधावासा असे वाटू लागले! असा काही एक गाभा नसतो शोधण्यासाठी हे तर अगदी इतक्यात कळले. मात्र तोपर्यंत या रंग-रेषांच्या जगाने माझ्या दृष्टीभोवती एक अदृष्य वलय विणून टाकले आहे. या झिरझिरीत जादूच्या पडद्यातून बाहेर पाहताना, सारे जग एखाद्या अचाट चित्रविषयासारखे दिसते! तुमच्याशी संवाद साधण्यासाठी देखिल मला या वलयातून व्यक्त व्हावे लागते. पण त्याने माझ्या अभिव्यक्तीला मर्यादा पडण्याऐवजी अधिक खुलवून आणले आहे!

माझ्या चित्राला अजूनही चौकट नाही…. अन आताशा नापस झाल्याने कुणी माझे गुण कधीच कापत नाही! कला अशा प्रकारे माणसांना अतिशय आनंद देते!

प्रेमाने बांधलेले…

खूप वर्षांपूर्वी उंच उंच गगनचुंबी इमारती माझ्या पुण्यात बांधण्याचं स्वप्न मी पहात असे. हे शहर कुठल्यातरी उंच गच्चीवरून मनभरून पाहण्याचं स्वप्न! मी लहान होते, या शहराचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक होते! पुण्यावर अतोनात प्रेम करणारी अस्सल पुणेकर!

पण गेल्या वर्षभरात काहीतरी गडबड झाली आहे. नाही…. पुण्यावर प्रेम अजूनही आहे माझं, हेच घर आहे ना! पण आता मला त्या आकाशाला खिजवणाऱ्या इमारती नको आहेत….अगदी अज्जिबात! मी अन माझा सगळा गोतवळा इथेच रहात अहोत, किती पिढ्यांपासून! या नव्या शहरातील घर अन त्यासाठी आवश्यक अशी महागडी जीवनशैली आम्हाला परवडेल का?

कोणाला परवडेल, ते ठाऊक आहे मला आता. आम्ही ज्यांच्यासाठी रोज रोज कष्ट करतो, ज्यांची चाकरी करतो, त्यांना परवडेल हे सारे. ते लोक आम्हाला स्वप्न दाखवतील, “खूप मेहनत करा म्हणजे एक दिवस तुम्हीही आमच्यासारखे व्हाल!” मग आम्ही त्यांच्यासारखे होऊ…..सुख-सुविधा विकत घेण्याची ऐपत येईतो मान खाली घालून काम करून झिजलेले म्हातारे! आमच्या सोयी पुरवण्यासाठी कितीकांचा जगण्याचा हक्क हिरावला गेला आहे त्याची रोज जाणीव असेल आम्हाला. अन मग त्या सगळ्या सोयी अन सुविधा पोकळ वाटू लागतील. मग आम्ही त्या पोकळीला न जुमानण्याची सवय करून घेऊ….काहीही मनाला लावून न घेण्याची सवय करून घेऊ, अगदी शुद्ध आनंद देखिल!

हा विनोद इतका क्रूर आहे कि हसू येणार नाही. काचेच्या चकचकाटामागे लपलेल्या या बांधकाम क्षेत्राच्या सत्याने मला काही गुपितं शिकवली आहेत. मी ज्यांच्यासाठी कम करते ते लोक मला या शहराचा चेहरा अन नशीब कधीच बदलू देणार नाहीत. माझ्या स्वप्नातली नगरी प्रत्यक्षात बांधण्याची लोभसवाणी संधी ते मला देतील….फक्त काही तडजोडी करण्याच्या बोलीवर. माझे शहर पुन्हा उजळवण्यासाठी मी साऱ्या तडजोडी मान्य करत जाईन. पण माझ्या कल्पनाशक्तीचे मालक ते लोक असतील. माझं स्वप्न ते तुकड्या-तुकड्याने विकतील, तशी ऐपत असलेल्या लोकांना! माझे उरलेले आयुष्य एखाद्या काड्यापेटी- घरात घालवत मी अभिमानाने पाहेन त्या गगनचुंबी शहराकडे, “हे मी उभारले!”. मी कधीही न संपणाऱ्या रांगांमधे उभी राहीन, गर्दीत घुसमटेन, पण खोकत, गुदमरत मी वर पाहेन, “हे मी उभारले!”. गरीब अधिक गरीब होतील, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील, दोघे एकमेकांना आळीपाळीने लुटतील, माझ्याने बघवले नाही तर मी नजर टाळण्यासाठी वर पाहेन, “हे मी उभारले!”

इथून पुढे, दहा वर्षांनी “हे मी उभारले” असा शिक्का नको आहे मला…. हे उभारण्यासाठी मी हातभार लावलेला नको आहे मला. मान्य आहे ते लोक माझ्याशिवाय देखिल बांधतील, अधिकच भयंकर बांधतील. पण मला त्यातला वाटा नको. माझे घर…माझे शहर कदाचित नष्ट होईल, पण मी मात्र स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इथून पळून जाणार आहे. माझ्याआधी खूप लोक गेले आहेत! पूर्वी मी त्यांना हसत असे, घाबरट म्हणून हिणवत असे…. पण आता मलाही या बुडत्या नावेतून उडी मारावी लागेल.

नशीब माझे! मला बांधता येते! कुठल्यातरी अज्ञात जागी मी पुन्हा दुसरे घर बांधेन, ज्याच्या पायाभरणीत माझ्याच भाईबांधवांचे तळतळाट नसतील….जे घर केवळ एका विराग्याची गुहा असेल…कलाकाराचे झोपडे असेल….यहून अधिक काहीही नाही.

माझ्यासारखे अजूनही आहेत लोक….ते देखिल येतील. मी त्यांच्यासाठी सुद्धा प्रेमाने बांधेन. आमच्या स्पर्शाने या जमिनीच्या जखमा पुन्हा भरून येतील. ती मनापासून फुलेल. मीही बहरेन थोडी तिच्यासोबतीने, एके दिवशी शांतपणे मरण्यासाठी, माझी माती तिच्या मातीत मिसळून टाकण्यासाठी….

 

 

असंबद्ध खजिना…

वाऱ्यावर उडणारी धूळ अन डोक्यावर कडाडते ऊन, पायाला चटका देणारे कातळ अन गारेगार नितळ ओढे… गच्च वेलींनी जमिनीला बांधून घातलेली अन तरीही आकाशाला जाऊन भिडलेली जंगले… जंगलवाटेवरचे पानातून गाळून उतरलेले कवडसे….

“मोठ्या जनावराची” नुसती पावलट पाहून उडणारी घाबरगुंडी!

संध्याकाळी सुकल्या फाट्याची मोळी डोक्यावर घेऊन गुरे हाकीत घरी निघालेली एखादी सुरकुतली म्हातारी…. विहिरीवरच्या गुपित-गप्पा, सुना-मुलींच्या वेण्याफण्या, भडक्क फेटे मिरवीत पारावर टेकलेले, पांढरीच मिशी पुन्हा पुन्हा पिळणारे सुरकुतलेले म्हातारे…. टायरमागे काठ्या घेऊन पळणारी शेंबडी पोरे!

चुलीवरच्या तव्यातून निखाऱ्यावर भाकरी पडताच सुटणारा खरपूस भुकेचा वास!

मिरचीची फोडणी, खोबऱ्याचे वाटण…. हिरवट ओले मऊशार सारवण….

मुलायम काळ्या मातीत पाट सोडताना घमघमणारा मृद्गंध…. अन त्या पाण्याच्या जोरावर स्वार होऊन डोलणारी पोपटी हिरवी शेतं…

ज्वार-बाजरीचे ढीग… अन भातखाचरातली गाणी….

बांधावरच्या सर्पदेवाला कोंबड्याचा निवद! सक-सकाळी दरीत घुमणारी मोरांची केक!

दुपारभर वळचणीला चिमण्यांची घाई… चिखलामधून टोच्या मारीत कोंबडीची पिलावळ…

दूर आकाशात गिरक्या घेत पिलांपाशी लक्ष ठेवणारी घार…

जत्रेमधल्या रंगीत बांगड्या…. आकाशपाळण्याची सफर!

रात्रीच्या थंडीत टोचऱ्या घोंगड्याची ऊब! शेकोटीभवती थरथरत ऐकलेल्या भुताच्या गोष्टी… सावलीमधून लवलवणारा पिंपळावरचा मुंजा!

देवघरात निरांजन, अंगणात रांगोळी…. दारावर लावलेली आंब्याची डहाळी…

सूर सनईचे मुलायम, ताशाचे कडक! कुस्तीचे….अन तमाशाचे फड…

देवळात घंटा…. आरतीला बेताल टाळ्या!

सूक्त, स्तोत्र, मनाचे श्लोक….

अंधारे नागमोडी जिने अन त्यांच्यावरल्या गुप्त प्रेमकथा!

 

या साऱ्यांचा काही काही संबंध नाही… पण तरीही हे सारे मी उगाच कवटाळून बसले आहे… एका लालबुंद संध्याकाळी.

रस्त्याकडेची संस्कृती…..

रोज घरी जाताना मी रस्त्याकडेला थांबून भाजी घेते. मीच काय आपल्या घरातलं कुणी ना कुणी हे काम करतंच की! काल मात्र रस्त्याची कड स्वच्छ अन सुनीसुनी होती. एका टोकाला महापालिकेचा ट्रक उभा होता…. अन त्यात कोवळ्या कोवळ्या मेथी, कोथिंबीरीच्या जुड्या भरलेली पोती कोंबली होती. भाजीवाले अन पालिकेचे लोक एका घोळक्यात घासाघीस करीत उभे होते…..

हा काही आजचा प्रसंग नाही… अधूनमधून रोजचाच प्रसंग आहे. वृत्तपत्रात यावर किती वर्ष किती लिहिलं गेलं आहे…. “अनधिकृत” फेरीवाले पथारीवाले, त्यांचे प्रश्न, त्याची उत्तरं, त्यावर चर्चा….अजूनही चालू आहे.

अगदी वाहतुकीच्या आड येईतो हा बाजार वाढत जातो. गाड्या अडतात… वाहतुकीची कोंडी अन भांडणे….. मग लेखी तक्रारी…. मग कुणीतरी उपाय काढला कि शहराच्या प्रत्येक भागात एक छोटी मंडई बांधावी, तिथले गाळे भाजी विक्रेत्यांना वाटून द्यावे. मग या छोट्या बाजारातले गाळे भरपूर ओळखीपाळखी असलेल्या दलालांना मिळाले. भाजीबाजार मात्र रस्त्याकडेने चालूच राहिला. भाजी घेणाऱ्याना घरी जाताजाता भाजी मिळतेय अन हातोहात विक्री होतेय… छोटे भाजीविक्रेते रस्त्याचा काठ काही सोडत नाहीत.

चूक त्यांची नाही… भाजी घेणाऱ्या लोकांचीही नाही…. रस्त्याला अडथळा नको म्हणून अनधिकृत हातगाड्या उचलणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याची चूक असेल का…. तो रस्त्यापर्यंत फर्निचर मांडून बसलेल्या दुकानवाल्या मारवाड्याला ठणकावू शकत नाही पण हातावर पोट असलेल्या भाजीवाल्याची हातगाडी खसकन ओढून ट्रकमध्ये टाकू शकतो…. हे कसे?

चूक आपल्या व्यवस्थेची आहे… आपण वागतो पौर्वात्य मनाने…. अन व्यवस्था मात्र पाश्चिमात्य उचलतो. त्यातून होणारे गोंधळ निस्तरताना अजून खोल पाय अडकतो आपला….

“तिकडे अमेरिकेत नाय हा असले घाण रस्ते”, या देशी-अमेरिकनांच्या वाक्याचीच आताशा चीड येऊ लागली आहे. मनात येतं, “हे माझे रस्ते आहेत. नाही तुम्हाला पटत तर जावा तुमच्या अमेरिकेतच! इकडे जसं अळूचं फद्फदं मिळतं तसं अमेरिकेत नाही की मिळत! म्हणून आम्ही म्हणतो का कि अमेरिका चांगली नाही?!” इकडे मात्र अमेरिकन मोजमाप कशासाठी?

एका ठरलेल्या ठिकाणी, “मॉलमध्ये” प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला बाजार भरवण्याची पद्धत पाश्चिमात्यांची आहे. आपली बहुसंख्य जनता कामावरून घरी येता जाता “ताजी” भाजी घेऊन जाते. मग आपला बाजार रस्त्याच्या कडेनेच चालणार. पुण्यात आल्याच की टोलेजंग मॉल, पण रस्त्यावरचा भाजीबाजार इंचाने तरी मागे हटला का?!

भाजीवाले… त्यांचे वरच्या पट्टीत हेल काढून ओरडणे…. घासाघीस अन बाचाबाची… वैयक्तिक ओळखी अन त्यातून मिळणारे बिनहिशेबी डिस्काउंट!! “ताई तुमच्यासाठी कोथिंबीर सात रुपये लावली, बाहेर नऊ रुपयाच्या खाली नाही भेटणार!” काकूंच्या पिशवीआडून तोंड घालत कोबीचा गड्डा फस्त करणारी भटकी गाय… धंद्याच्या टायमाला तिला हकालाणारा पण रात्री गर्दी सरली कि उरलेल्या भाजीतली कोमेजल्या पाल्याची जुडी स्वत:च्या हाताने त्या गायीला घालणारा भाजीवाला….

हे सगळं अनधिकृत कसं असू शकेल?

या सगळ्या गोंधळाची… कोलाहलातच स्फुरणाऱ्या जीवनाची सांस्कृतिक किंमत शून्य कशी असेल?

नाहीत आमचे एकूणएक रस्ते स्वच्छ….नाहीत सगळे रस्ते गुळगुळीत आठपदरी अतिवेगवान द्रुतमार्ग….

पण या रस्त्यांना एक संस्कृती आहे, एकेक भिन्न व्यक्तिमत्त्व आहे…

सिंहगड रस्ता मला एखाद्या घरगुती बाईसारखा वाटतो, गृहोपयोगी वस्तूंनी गजबजलेला…. सध्या घरच्या सुगरणीसारखा!

लक्ष्मी रस्ता मात्र नावाप्रमाणे, ठेवणीतली नऊवार नेसून, पेटीतले दागिनेबिगीने लेऊन आलेल्या घरंदाज बाईसारखा…

फर्ग्युसन रस्ता फटाकड्या कॉलेजकन्येसारखा इवल्या कपड्यात ठुमकत पाणीपुरीपासून महागड्या कॉफीपर्यंत सारे खात खिदळत मिरवणारा!

रस्त्याकडेलाच तर समाजाचे व्यक्तिमत्त्व जन्माला येते…वाढते…. अन त्याचीच संस्कृती तयार होते…. त्यावर अधिकृततेची मोहर लावा न लावा काय फरक पडतो?!

या विविधरंगी संस्कृतीला पुसून टाकूनच शिस्त अन स्वच्छता आणावी लागेल का? तशी बाहेरून ती आमच्यात रुजेल का?

कि छोट्या मनातून रुजवून फुललेल्या एका रंगीत, जिवंत, सुसंस्कृत अन स्वच्छ रस्त्याचे अन पर्यायाने देशाचे स्वप्न आम्ही पाहू शकू?

ठेकडीचे देवघर….

केरळयात्रेचा पुढचा थांबा होता ठेकडी. रस्त्याकडेला अजस्त्र बांबूच्या कनाती लावून हे गाव तुमचं पेरियार व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर स्वागत करतं! तुमची नजर अन नशीब सावध असेल तर ठेकडीच्या वाटेवर एखादी शेकरू नक्की दर्शन देते!

आमचं सामानसुमान अंबाडी नावाच्या रीसोर्तमध्ये स्थानापन्न करण्यात आलं. अंबाडी म्हणजे म्हणे कृष्णाचे घर. (इति गाईडसाहेब)

ही जागा मात्र मजेशीर होती… दगडी तुकडे लावून आखलेल्या पायवाटा… बांबूची उंचनिंच बेटं उगवायला इथे फार काही करावे लागत नाही ते एक झालंच! तेलपाणी करून गुळगुळीत काळीशार राखलेल्या कोरीव लाकडी तुळया अन वासे….त्यांचे साधे, मजबूत पण डोकेबाज सांधे! मातीशी नातं सांगणारी टेराकोटा फरशी, नाजूक भुरे डोळे रोखल्यागत तेवणारे मऊशार दिवे…. असले स्वर्गीय अंबाडी हे कृष्णाचे घर असायला त्याची देखील काही हरकत नसावी!

हेडमास्तर गाईडसाहेब इतर सारी पर्यटक पिल्ले घेऊन बाजारविहार करावयास गेले. अन मी स्वत:ला अंबाडीच्या स्वर्गीय स्नानगृहात अभ्यंग करवून घेतले! मला वाटून दिलेले अंबाडीतले कोटर (कॉतेज!) अतिशय शांत होते. इथे केवळ झाडावरून तुरतुर फिरत खिडकीत डोकावणाऱ्या खारोट्याना अविरत चिरकायची परवानगी होती! कोटरासमोरच्या ओटीवर गरमागरम “कापी” चा कप घेऊन बांबूपलीकडे उतरणाऱ्या सूर्याची सोनेरी लाल छबी पाहण्यात केरळयात्रेचं सार्थक झालेसे वाटले!

हळूहळू आकाश काळवंडले. खालच्या पायवाटेवरच्या दिव्यांनी बांबूचे बेट खालपासून वर उजळवले… कॉफी सोबत सूर्यास्ताचा कप रिकामा झाला मग मीही जरा गावात भटकायला निघाले. काही विशेष नियोजन नव्हते! उगाच रस्ते पहात फिरले… अनोळखी लोकांना भेटले… जुईचे सुगंधी शीग लावून विकायला बसलेल्या चिमुरड्या पोरींशी दोस्ती झाली!

रस्त्याकडेला छोट्या छोट्या स्टुडीओमध्ये लाकडी शिल्पकलेचे नमुने ओसंडून वाहात होते… अप्पम साम्बरमच्या मेनूने सज्ज हॉटेले (याना रेस्तोरांत म्हणणे जरा अधिकच होईल!) साधी “मुंडू” लुंगी नेसलेला एक शिल्पकार दुकानाच्या मागच्या बाजूला कामात गढला होता. त्यांचा डोळ्यांत तेज विचारांची चमक होती अन चेहऱ्यावर शांत गांभीर्य होतं…. एखाद्या कालातीत जगात जणू मी पाऊल टाकले होते… जिथे अजूनही कलासक्त हात दगडातून देव जन्माला घालत होते! एका अतिभव्य नाट्याची प्रेक्षक असल्यागत जडशीळ पायाने मी रात्री परतले…

केरळच्या निव्वळ उल्लेखाने देखील ठेकडीची दृश्ये मनातून उसळून येतात… त्यांनी माझ्यातले जिवंतपणाचे बीज असे काही रुजवले असावे…की ते मला कंटाळलेल्या मृतवत जगण्याला कधीच शरण जाऊ देणार नाही….