शेजार….

माणसांच्या आयुष्याचे…. त्यांच्या बरोबर-चूकचे संदर्भ असतात वेगवेगळे. सरळ आयुष्याला कौतुकमिश्रित तिरस्कार वाटतो आडनिड्या वाटेने भटकणाऱ्या स्वच्छंदी आयुष्याचा…. अन मुक्तपणे विहरत उलघडत जाणाऱ्या आयुष्याला त्याच सरळ आयुष्याच्या स्थिरतेचे….. विश्वासाचे असाध्य अप्रूप असते….

माझ्या शेजारणीला षोक आहे स्वच्छतेचा….. माझ्याहूनही जास्त! तिच्या दाराखिडक्यांनाच काय सभोतीच्या भिंतीना देखिल तिच्या भुश्शकन पाणी ओतणाऱ्या बादलीची सवय! बरं पुन्हा तिच्या स्वच्छतेचे शिंतोडे माझ्या घरात उडले तर काय फरक पडणार असा?!

असंही माझ्या घराला स्वच्छतेच्या शिस्तीपेक्षा लहरी नादिष्टपणाचेच अधिक डोहाळे….. मग तिच्या घरातून अलगद वाऱ्यावर स्वार होत आलेल्या कचऱ्याचा अनमान कसा करावा, तोही निमूट माझ्या केराच्या टोपलीत जाऊन बसतो….. शेवटी आम्हा दोघींची घरे स्वच्छ झालीच ना!

माझ्या बागेतल्या कचऱ्याच्या वाफ्याशी मात्र सखी शेजारणीचे कट्टर वैर आहे…. जिथे मला ओल्या कचऱ्यापासून पाहता पाहता उमलणारी मोगऱ्याची फुलं दिसतात तिथे तिला कांद्याची साले, मटाराची टरफले अन असलंच काहीबाही दिसतं…..

चौदा वर्षात हळूहळू कंपोस्टच्या वासावर माझे प्रेम जडले आहे! इतका मऊसूत, जमिनीशी बांधलेला, मार्दवी वास लोकांना दुर्गंध कसा वाटू शकतो असा कैक वेळा विचार करून पाहिला…. पण तरीही पुन्हा मातीत हात घालताना सुखाची शिरशिरी आल्याखेरीज रहात नाही! शेजारीण मात्र पहात असते तिला शिसारी आल्यागत!!

कदाचित माझ्या हसण्याची बाधा तिला होऊ नये म्हणून आठ्यांचे संरक्षण घेत असावी!

मला मात्र कचऱ्यावर पोसलेल्या अळूचे, दोडक्या-कारल्यांच्या वेलींनी घातलेल्या वळ्से-वेलांटयांचेच कौतुक….. कचऱ्यातच पडलेल्या मिरच्यांच्या बिया रुजून जेव्हा चांदणीदार फुलोरे वाऱ्यावर डोलले तेव्हा तर आमच्या घरात नव्या बाळजन्मागत आनंद झाला साऱ्यांना….. त्या झुडपातल्या मिरच्या शोधून तोडून स्वयंपाकघरात नेल्या जात तेव्हा उगाच स्वयंपाक अधिक चांगला झाल्यागत वाटत असे….

या बागेत मी हौसेनी लावलेल्या रोपा-झाडांपेक्षा स्वत:च्या मर्जीने मूळ धरणाऱ्या उत्साही झाडांचेच राज्य अधिक चालते! त्याभोवतीच्या पसाऱ्यात आमच्या घरातल्या इतर छंदांचे अवशेष सापडतात ते वेगळेच! गेल्या चैत्रातल्या मातीकामाचे वेडाचे भेगाळलेले नमुने, पुनरुज्जीवनाची वाट पहात बसलेल्या फुटक्या कुंड्या, गेरूची सुकली ढेकळं अन मातीच्या गिलाव्याची नवी पद्धत आजमावून पाहताना भिंतीवर केलेले नमुन्याचे सारवण!

तिथंच मांडी ठोकून चहा घेत, आपल्याच पसाऱ्याचे कौतुक करत, येत्या रविवाराला आवराआवरीचे खोटेच वचन देत मी रोजची सकाळ घालवते! टागोरांच्या पोरवयापासून ते रविवार लोकसत्तेच्या पुरवण्यांपर्यंत साऱ्या “साहित्यावर” माझ्या बागेच्या मातीचे शिक्कामोर्तब कधीनाकधी होतेच! आमच्या घरातून नव्या जुन्या गाण्यांच्या लकेरी आकंठ येत राहतात जाग असेपर्यंत सारा वेळ….. अन असल्या पावसाळी हवेत इथे उंच डोंगरातून जेव्हा वारा घुमतो तेव्हा दुपारच्या नीरव शांततेलाही कसलीशी राकट, आदिम नैसर्गिक ओढ लावून जातो…. झुळकेवरला श्रावणगंध हुंगून मन भरत नाही….

सारे आकाश ढगाळ ढगाळ…. अन बाहेरच्या कदंबावर फुलोऱ्यांचे चेंडू लटकत असतात वाऱ्यावर झोके खात! सकाळी थोडे जरी ऊन आले तर त्यांवर झुंबड उडते पक्षी, फुलपाखरं अन मधमाश्यांची! खिडकीत अडकावलेल्या खोक्याच्या घरट्यातून चिमणा-चिमणीची पोक्त लगबग चालूच असते….. खाली दरीत माझं लाडकं पुणं उन्हाची वाट पहात सुस्तावलेलं…… कट्ट्यावर आमचा शुभ्र पांढरा बोका देखिल तसाच पहुडलेला, उन्हाची तिरीप आलीच एखादी तर पाठीवर लोळून सूर्यस्नान घेणारा!

मग मीही नि:श्वास सोडत वेताच्या झुल्यात अंग सोडून देते….पुढच्या रविवारच्या सफाईचे नियोजन करत करत डोळा बरा लागतो! जाग येते तेव्हा मी कौतुकाने पहाते तिच्याकडे, शेजीबाई मात्र घसघसून खिडक्या पुन्हा धूत असते आठ्या घालून!

प्रेमाने बांधलेले…

खूप वर्षांपूर्वी उंच उंच गगनचुंबी इमारती माझ्या पुण्यात बांधण्याचं स्वप्न मी पहात असे. हे शहर कुठल्यातरी उंच गच्चीवरून मनभरून पाहण्याचं स्वप्न! मी लहान होते, या शहराचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक होते! पुण्यावर अतोनात प्रेम करणारी अस्सल पुणेकर!

पण गेल्या वर्षभरात काहीतरी गडबड झाली आहे. नाही…. पुण्यावर प्रेम अजूनही आहे माझं, हेच घर आहे ना! पण आता मला त्या आकाशाला खिजवणाऱ्या इमारती नको आहेत….अगदी अज्जिबात! मी अन माझा सगळा गोतवळा इथेच रहात अहोत, किती पिढ्यांपासून! या नव्या शहरातील घर अन त्यासाठी आवश्यक अशी महागडी जीवनशैली आम्हाला परवडेल का?

कोणाला परवडेल, ते ठाऊक आहे मला आता. आम्ही ज्यांच्यासाठी रोज रोज कष्ट करतो, ज्यांची चाकरी करतो, त्यांना परवडेल हे सारे. ते लोक आम्हाला स्वप्न दाखवतील, “खूप मेहनत करा म्हणजे एक दिवस तुम्हीही आमच्यासारखे व्हाल!” मग आम्ही त्यांच्यासारखे होऊ…..सुख-सुविधा विकत घेण्याची ऐपत येईतो मान खाली घालून काम करून झिजलेले म्हातारे! आमच्या सोयी पुरवण्यासाठी कितीकांचा जगण्याचा हक्क हिरावला गेला आहे त्याची रोज जाणीव असेल आम्हाला. अन मग त्या सगळ्या सोयी अन सुविधा पोकळ वाटू लागतील. मग आम्ही त्या पोकळीला न जुमानण्याची सवय करून घेऊ….काहीही मनाला लावून न घेण्याची सवय करून घेऊ, अगदी शुद्ध आनंद देखिल!

हा विनोद इतका क्रूर आहे कि हसू येणार नाही. काचेच्या चकचकाटामागे लपलेल्या या बांधकाम क्षेत्राच्या सत्याने मला काही गुपितं शिकवली आहेत. मी ज्यांच्यासाठी कम करते ते लोक मला या शहराचा चेहरा अन नशीब कधीच बदलू देणार नाहीत. माझ्या स्वप्नातली नगरी प्रत्यक्षात बांधण्याची लोभसवाणी संधी ते मला देतील….फक्त काही तडजोडी करण्याच्या बोलीवर. माझे शहर पुन्हा उजळवण्यासाठी मी साऱ्या तडजोडी मान्य करत जाईन. पण माझ्या कल्पनाशक्तीचे मालक ते लोक असतील. माझं स्वप्न ते तुकड्या-तुकड्याने विकतील, तशी ऐपत असलेल्या लोकांना! माझे उरलेले आयुष्य एखाद्या काड्यापेटी- घरात घालवत मी अभिमानाने पाहेन त्या गगनचुंबी शहराकडे, “हे मी उभारले!”. मी कधीही न संपणाऱ्या रांगांमधे उभी राहीन, गर्दीत घुसमटेन, पण खोकत, गुदमरत मी वर पाहेन, “हे मी उभारले!”. गरीब अधिक गरीब होतील, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील, दोघे एकमेकांना आळीपाळीने लुटतील, माझ्याने बघवले नाही तर मी नजर टाळण्यासाठी वर पाहेन, “हे मी उभारले!”

इथून पुढे, दहा वर्षांनी “हे मी उभारले” असा शिक्का नको आहे मला…. हे उभारण्यासाठी मी हातभार लावलेला नको आहे मला. मान्य आहे ते लोक माझ्याशिवाय देखिल बांधतील, अधिकच भयंकर बांधतील. पण मला त्यातला वाटा नको. माझे घर…माझे शहर कदाचित नष्ट होईल, पण मी मात्र स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इथून पळून जाणार आहे. माझ्याआधी खूप लोक गेले आहेत! पूर्वी मी त्यांना हसत असे, घाबरट म्हणून हिणवत असे…. पण आता मलाही या बुडत्या नावेतून उडी मारावी लागेल.

नशीब माझे! मला बांधता येते! कुठल्यातरी अज्ञात जागी मी पुन्हा दुसरे घर बांधेन, ज्याच्या पायाभरणीत माझ्याच भाईबांधवांचे तळतळाट नसतील….जे घर केवळ एका विराग्याची गुहा असेल…कलाकाराचे झोपडे असेल….यहून अधिक काहीही नाही.

माझ्यासारखे अजूनही आहेत लोक….ते देखिल येतील. मी त्यांच्यासाठी सुद्धा प्रेमाने बांधेन. आमच्या स्पर्शाने या जमिनीच्या जखमा पुन्हा भरून येतील. ती मनापासून फुलेल. मीही बहरेन थोडी तिच्यासोबतीने, एके दिवशी शांतपणे मरण्यासाठी, माझी माती तिच्या मातीत मिसळून टाकण्यासाठी….