तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पहिजे ना…
दिसणार नाहीस रोज याची सवय व्हायला पाहिजे ना…
दिवस म्हणजे मख्खपणा
रात्र शिरशिरी सरत नाही…
रडणंबिडणं मूर्खपणा तरी
डोळचं पाणी खळत नाही…
आता तरी वेडेपणा शहाणा व्हायला पाहिजे ना?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…
तुझं एकुलतं एक पत्र
अजून कशाला उशाशी?
माझ्याकडल्या तुझ्या वस्तू
ठेवून दिल्यात हाताशी…
आता तरी मन यातून मोकळं व्हायला पाहिजे ना?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…
प्रेम प्रेम म्हणजे काय
कधी कुणाला कळलंय का?
ज्यांना कळलं त्यांना तरी
या जन्मी ते वळलंय का?!!
आता मात्र तुला हसून निरोप द्यायला पहिजे ना?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…
तरी तुझ्या दारावरती
एक क्षण नजर थांबते…
लवून पापण्या अश्रूंवरती
प्रेमाचा ती मुजरा करते…
प्रेमकविता टुकार असतात तरीही लिहायला पाहिजेच का?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…