तुझी आठवण- II

तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पहिजे ना…
दिसणार नाहीस रोज याची सवय व्हायला पाहिजे ना…

दिवस म्हणजे मख्खपणा
रात्र शिरशिरी सरत नाही…
रडणंबिडणं मूर्खपणा तरी
डोळचं पाणी खळत नाही…
आता तरी वेडेपणा शहाणा व्हायला पाहिजे ना?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…

तुझं एकुलतं एक पत्र
अजून कशाला उशाशी?
माझ्याकडल्या तुझ्या वस्तू
ठेवून दिल्यात हाताशी…
आता तरी मन यातून मोकळं व्हायला पाहिजे ना?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…

प्रेम प्रेम म्हणजे काय
कधी कुणाला कळलंय का?
ज्यांना कळलं त्यांना तरी
या जन्मी ते वळलंय का?!!
आता मात्र तुला हसून निरोप द्यायला पहिजे ना?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…

तरी तुझ्या दारावरती
एक क्षण नजर थांबते…
लवून पापण्या अश्रूंवरती
प्रेमाचा ती मुजरा करते…
प्रेमकविता टुकार असतात तरीही लिहायला पाहिजेच का?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…

कवितावाद…

http://amrutsanchay.blogspot.com/2011/01/blog-post_23.html इथे सुरुवातीची सुरुवात वाचा…

😦
दारे-खिडक्या सताड उघड्या
बाहेर पडू देत नाहीत अदृश्य बेड्या
खिडकीतल्या आभाळात मळभ साठतयं…
मला फार एकटं वाटतयं…
😦

-स्वानंद

आकाशात बसलेली बोळकी आज्जीबाई
तिला म्हणावं करत जा थोडी साफसफाई…
झाडू फिरव आकाशात, बघ मळभ सरतंय…
आज्जीबाई आहे ना, मग कश्श्याला एकटं वाट्टंय?!!

-अनुज्ञा

म्हटलं मी आज्जीला “झाडू जरा मार”
“मला नाही वेळ” -म्हणे “कामे आहेत फार”
कुरकुरणार्‍या आज्जीशी हुज्जत कोण घालणार ?
एकटं वाटायचं ते एकटंच वाटत राहणार…

-स्वानंद

कुरकुरणाऱ्या आज्जीला दे लिम्लेटची गोळी…
काम जरा राहू देत, आधी शोध तिची कवळी…
गोष्ट सांग एखादी, म्हणावं, झाडू मग नंतर…
कुरकुरणारे आजी-नातू, दोघांत नाही अंतर!!

-अनु्ज्ञा

नेहमी का ‘मी’च चांगले वागायचे?
दुसर्‍याच्या मनासाठी स्वत:चे मारायचे
आजी नको, गोष्ट नको, नको कोणी कोणी
एकटचं इथे राहू दे मला वेड्यावाणी

-स्वानंद

ठीक आहे…
ठीक आहे तुला मुळी नको कोणी कोणी…
आता मीही धाडणार नाही शब्दांमागून गाणी…

-अनुज्ञा

कुणाला कशाला उगाच माझा त्रास?
माझाच मला लखलाभ प्रवास…

-स्वानंद

नको नको करता प्रसविता…
ही घडतेच पुन्हा कविता…
रुसल्या कवीला कशास पुसता…
हसतो पडता, रडतो हसता…

-अनुज्ञा

या कवितावादाचे मूळ कवी इथे सापडतील….

http://amrutsanchay.blogspot.com/

“माझे मन… माझ्या कविता..”

-स्वानंद मारुलकर

रे नभा…

कशी इथे उभी कंपित अधरा…
रे नभा कवेत घे तुझी ही धरा….

शतकांची भ्रमणे अन ग्रहणे सरली…
दिवसांची पडछाया रात्र पसरली…
श्वासांचे धरणीकंप रोधुनी जरा…
रे नभा कवेत घे तुझी ही धरा…

सावर…

मोजल्या मात्रा अन तोलले मी शब्द आजवर
पण त्यात ओतलं माझं मन ओंजळभर…
प्रेम शब्द मात्र टाळला, जशी टाळली नजर…
तू तर साद ही दिली नाहीस, तरी राहिले मी हजर….

पण तुझा तर साराच मुक्त छंद…
गुलाबांचे ताटवे अन भ्रमण स्वच्छंद…
मागे घेऊन प्रेमाचा जाच मी सरले थोडी दूर…
पण दुराव्यातही ओतलं माझं मन ओंजळभर…

आत्ता कुठे होतं आपल्यात एका श्वासाचं अंतर
पाहता पाहता वाढलं अन झालं की मैलभर…
हाक माझी केविलवाणी विरून गेली वाऱ्यावर..
संपलंय त्राण माझ्यामधलं आता तूच सावर…