तपश्चर्या

सकाळचं कोवळं सोनं आकाशात चढत चढत गेलं. सूर्याचं तापट बिंब आता ओढ्याच्या हिरवट निळसर पाण्यात चमचमू लागलं. लाल-हिरवे चतुर स्तब्ध पाण्यावर थरथरते तरंग उमटवीत असताना पाण्याखाली छोट्या माश्यांची अन्न शोधायची लगबग अजून चालू होती.

ओढ्याच्या दोन्ही काठांना ही इवली इवली जीवनचक्र नि:शब्द नांदत होती. काठांवर ओठंगलेली गर्द झाडी, अन ओढ्याच्या पात्रातच ठिय्या देऊन बसलेली शेरणीचे झुडपं आपल्या मुळ्याच्या आडोश्याने कितीक इवले संसार फुलताना पहात होती…

कडेच्या निळ्या हिरव्या डोहांमध्ये डोकावून आपलीच प्रतिमा कौतुकाने न्याहाळणारे बांबू आपापली बेटं बनवून झुलत होते मदमस्त हत्तीच्या डौलात!

सकाळी पाण्यावर उतरलेले हॉर्नबिल अन बगळे आपले रुंद पंख पसरून दिमाखात उडून गेले होते जोड्या जोड्यांनी….

आता ओढ्याकाठी होती नीरव शांत दुपार अन आपली जाडजूड मुळ पाण्यात सैलावून बसलेला पोक्तसा वृक्ष… त्याच्या खरबरीत खोडावर पाण्यावरून कवडसे उमटत होते…. त्याचे प्रतिबिंब पाण्यात अन पाण्याचे प्रतिबिंब जणू त्याच्यात उतरले होते…

ही एकरूपता कित्येक वर्षांची तपश्चर्या होती…..वृक्षाने ओढ्याकाठी अन् ओढ्याने वृक्षाखाली मांडलेली…

विंचुर्णी….

गतजन्मीचे हरवलेले वेडे पुन: सापडताच माणसाला वेडेपणाचे अधिकच डोहाळे लागत असावेत. त्यामुळे हिमालयाच्या जादूगिरीतून बाहेर येतायेता आम्हाला आता विंचुर्णीच्या माळाचे वेध लागले. सामान्य मानवी डोळ्याना जिथे वैराण माळ दिसत होता तिथे आम्हाला जैवविविधतेचे अभयारण्य दिसणार होते….!

धुळीच्या लोटांमधून पहिले दर्शन होताच लक्षात आले, गौरी देशपांडेच्या विंचुरणीशी आपली जुनीच ओळख आहे कि! मैलोनमैल पसरलेले मोकळेढाकळे सोनेरी माळ. त्यावर वेड्या बाभळीचे हिरवे ठिपके….त्याखाली मोठ्या मुष्किलीने दिसणारी…..सावली. वैराण डोळ्यांना सुखावणारी गारव्याची बेटं.

थकलेले, थबकलेले, आटून आक्रसलेले ओढे-नाले. पावसाळ्याच्या एखाद्या ओल्या आठवड्यात त्यांना भरभरून वाहण्याचं सुख मिळतं. इथे वर्षाचा सगळा पाउस केवळ काही तासात पडतो. मग सगळे ओढे नाले भरून ओसंडून जाणार…रानससे अन मेंढरांचे कळप त्या चार दिवसांच्या हिरवळीवर पोसणार… त्यांच्या मागे संधी साधत एकटे दुकटे रेंगाळणारे लांडगे! कितीक वर्षांच्या चक्रात अडकलेले हे विंचुर्णीचे माळ…

अधूनमधून पाहुणचाराला हक्काने येणारे अवर्षणाचे सावट… अन त्याच्याशी खेळत भांडत असल्या रानवटपणात संस्कृती वसवणारा माणूस…. त्यानं वर्षातून एकदाचा भरभरून ओसंडणारं पाणी थांबवलं, जिरवलं…पुरवून पुरवून वापरलं.फळबागा तगवल्या. डाळिंब चिक्कू रुजवले. चिंच पिंपळ अन वडाच्या गरगरीत वृक्षांनाही अवर्षणाचं कौतुक नव्हतं. कडुनिंबाची हिरवट बेटं देखिल बांधाबांधावर तग धरून रहात….

निरखून पाहिलं तरच या सोनेरी माळाचं हिरवं काळीज उलगडतं. दुरूनच आठ्या घालून पाहणाऱ्या नवख्या पाव्हण्याला हा आडमुठा माळ एका झुळकेसरशी धूळ चारतो!

तोच ठसका घेऊन जन्माला येत असावीत विंचुर्णीची माणसंही?! कठोर, शुष्क पण गुंतवून ठेवणारी….कपड्यांत अडकलेल्या कुसळासारखी मनात रुतलेली माणसं…टोचरी पण तुटल्याशिवाय पदर न सोडणारी…

तुम्ही चाचपडत हसाल तर तोंडभर हसून उत्तर देणारी….एखाद दोन तासात चिंब भिजवून जाणाऱ्या विंचुर्णीच्या पावसासारखी…..