धर्म..खूप जळता आणि विनाकारण अतिरेकी झालेला विषय आहे…. आधीच धर्म खूप प्रकारचे… आणिक आता नास्तिक धर्म नावाचाही नवीन धर्म उदयाला आला आहे…
अधर्मवादी, धर्मवादी अन निधर्मवादी सुद्धा कट्टर असतात आताशा! यातला प्रत्येक वाद आधीच्या वादाची प्रतिक्रिया म्हणून सुरु झाला… धर्माचं मूळचं सात्त्विक स्वरूप जेव्हा सवर्णांनी स्वत:च्या स्वर्थासाठी मोडून वाकवून वापरलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया उमटली…आम्हाला तुमच्या धर्माचे जोखडच नको अशा मुक्त विचाराचे वारे आले, अन त्यांनी भलं बुरं सगळंच उधळून लावलं. माझ्या आधीच्या पिढीने तिची उमेदीचे वर्षं धर्माच्या पताकेच्या चिंध्या करून घोषणा देण्यात घालवली.
सहाजिक परिणाम होता…. एक असा समाज जन्म घेऊ लागला, ज्याच्या जगण्याला योग्यायोग्यतेची बंधनंच नको होती. स्वातंत्र्याचा अर्थ प्रत्येकाने मन मानेल तसा लावावा. स्वत:च्या वागण्याला गोजिरवाण्या समाजवादी शब्दांची रंगरंगोटी करावी…मान सन्मान आणि job satisfaction मिळवावं!! पण या सगळयात एक गोष्ट हरवत जात होती… साध्या अश्राप निरागसतेची किंमत….श्रद्धा आणि विश्वास, सगळ्या समाजाचा आत्मा सगळं नामशेष होत होतं. अंधश्रद्धा निर्मूलन करता करता आम्ही श्रद्धा पण खरवडून काढून फेकली होती. आता आयुष्याला बंधनं कमी होती पण काही आधार…काही पायाच उरु दिला नाही.
मग सायन्सवादी जन्माला आले. कुणाच्या लक्षातच आलं नाही कि आपण राम-कृष्णाच्या जागी आइनस्टाइन आणि स्टीफन किंग्सची स्थापना केली. अंधविश्वास इथेही होताच! बोहरला दिसलेल्या ऍटमवर आमची कणादाच्या अणुपेक्षा जास्त श्रद्धा होती. न दिसलेला ऍटम “असतो” असं लिहितात बाबा सातवीच्या पुस्तकात…मग असेलचकी खरं! पण देव दिसत नसला सध्या, तरी तो आहे असं म्हणणारे मात्र ढोंगी थोतांडवादी ठरत गेले. बुद्धिवादाची फॅशन “इन” झाली. आम्ही देव बिव काही मानत नाही असं अभिमानाने सांगणं ओघाने आलंच!
ज्या काही परंपरा, संस्कार उरले होते..त्यांचीही फॅशन व्हायला वेळ नाही लागला. मनाचे श्लोक हे पाठांतर स्पर्धेत पहिला नंबर पटकावण्यासाठीच रचले आहेत असा समज चिमुकल्या मुलांनी करुन घेतला तर काय चुकलं? लग्नसमारंभ दिवसेंदिवस आलिशान होत गेले…हा एक मोठा corporate व्यवसायच झाला. पण आगीभोवती फे~या मारणं आम्हाला intellectually पटत नसल्यामुळे स्वागत समारंभ हेच खरं लग्न झालं…
करणा~यांचा ही डोळस विश्वास नसेल तर न करणारेच परवडले असं म्हणायची पाळी आली…. छोटे छोटे धक्के, अपयश अन व्यक्तिगत दु:ख यातून उभं रहायला जी ताकद लागते ती कुठूनच मिळेनाशी झाली…. देवाशी भार घालून निष्काम कर्म करण्यासाठी आधी देव तर असावा लागतो तुमच्या आयुष्यात!
नाही! तसाही तो असतोच…तुम्ही नाकारल्याने त्याला कुठं फरक पडला?! फरक तर आपल्याला पडतो! का आलो जन्माला? अन असल्या अपघातांनी भरलेल्या जगात रोज हजारो माणसं मरत असताना आपणच बुवा कसे जगलो?! खूप हुषार होतो म्हणून जगलो असा समज असेल तर मृत्यू तुमच्यापेक्षाही भल्या भल्यांना रोज शेंडी लावतो हे लक्षात असू द्या!
सुया टोचून आणि face-lift surgery करून लोकांसमोर तरुण दिसणं शक्य आहे. पण मरण टळणं शक्य नाही. त्याच्यावर मात जर करायची असेल तर त्याच्यापलीकडे जगण्याचं कसब शिकलं पाहिजे. आजकाल अशा खरोखर जीवनोपयोगी गोष्टी शाळेत शिकवायची फॅशन नाही. मेकॊलेचा आत्मा बोकांडी बसत असावा…. (अर्थात त्याला आत्मा होता का हा प्रश्नच आहे!)
माणसाला मुळात धर्माची गरज असते ती असं जगण्याचं शिक्षण मिळवण्यासाठी….म्हणून धर्म तयार होतात. धर्म म्हणजे यज्ञयाग कर्मकांड अशा भातुकलीसाठी उत्तर म्हणून बनवलेला नसतो.
धर्म म्हणजे तलवारी अन एके ४७ उचलून बेछूट नरसंहार करायचं लायसन्स नसतं…
धर्म म्हणजे आपली लायकी जन्मानेच महान असल्याचा पुरावाही नसतो…
धर्म म्हणजे अस्पृश्यतेचा, असमानतेचा आधार नसतो…
धर्म खरंतर या सगळ्याचा विपर्यास असतो! खूप खूप शतकांपूर्वी तो धर्म हरवला आपण…त्याच्या छिन्नविच्छिन्न तुकड्यांतून आता शोधला पहिजे तो…
धर्म म्हणजे जगण्याचं सायन्स…
धर्म म्हणजे माणूसप्राण्याचा “माणूस” करण्याची कला…
धर्म म्हणजे मनुष्यजन्माचा स्थायीभाव…
धर्म म्हणजे जगताना समोर येणा~या बिकट समस्यांवर उत्तर शोधायचं पाठ्यपुस्तक… यात गाइडबुकाप्रमाणे readymade उत्तरं नाही मिळणार. पण उत्तर शोधयचं कसं हे शिकवलं जाईल.
जो डोळसपणे वापरेल त्याचं आयुष्य साधं सोपं का होईना पण सार्थ करणारी गुरुकिल्ली म्हणजे धर्म…
असा धर्म पुन्हा शोधायला हवा…. त्यासाठी भारतयात्रा वगैरे करण्याची गरज नाही, हातात बॅनर घेऊन…. तो धर्म आपल्या मनात, आत्म्यात सुप्त आहे, जो निश्चयाने स्वत:च्या आत निरखून बघेल त्याला सापडेल असा गुप्त खजिना आहे….
प्रत्येकाचा एक धर्म असतोच…नास्तिकवाद हाही एक धर्मच असतो! पण जो माणूस त्या धर्माच्या गाभ्याला हात घालतो त्याला एक दिवस उमगतं कि सगळे धर्म, सगळं सायन्स, सगळं सगळं शेवटी एकवटत जातं… सगळे फरक, सगळ्या सीमरेषा पुसून जातात…. एक दिव्य प्रकाश भारून टाकतो त्याला… म्हटलं तर तोच त्याचा देव असतो… काही म्हणा, नका म्हणू, फरक कुणाला पडतो?!