आपण सूक्ष्मजीवांना का घाबरतो…?

एका वाक्यात सांगायचं तर आपल्याला डेटॉलने घाबरवलं…. बाकी काहीच नाही झालं.

आपल्या भोवतीची हवा, पाणी, आपलं अन्न, इतकंच काय आपले केस, त्वचा, तोंड सगळीकडे सूक्ष्मजीव उदंड नांदत असतात.

सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय दही, चीज, इडली, डोसा, ब्रेड शक्य नाहीत. आपल्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय अन्नपचन शक्य नाही, कुठल्याही जैविक वस्तूचं विघटन शक्य नाही.

या पृथ्वीवर सूक्ष्मजीव आपले निव्वळ शेजारी नाहीत तर सहचर देखिल आहेत. त्यांची संख्या, वैविध्य अन सभोवतालाशी नवनवीन प्रकारे जुळवून घेत टिकून राहण्याची जिगीषा पाहता अनेक अभ्यासक असं मानतात की सूक्ष्मजीवांनी व्यापलेल्या या जगात एक आपली माणूसजमात देखिल राहते!

इतकेच काय तर, माणसाचा इतिहास हा बराचसा जंतूंनी घडवला आहे असे प्रतिपादन काही अभ्यासक करतात! साथीचे रोग अन त्यातून झालेल्या राजकीय उलाढाली पाहता त्यात काहीच चूक नाही. आपण सूक्षजीवांशी पिढ्यानपिढ्यांपासून भांडत आहोत. गेल्या दोन शतकातील वैज्ञानिक प्रगती नंतर आपल्याला सूक्ष्मजीवांचे विश्वव्यापी स्वरूप लक्षात आले पण त्यांच्यावर मात करता आलेली नाही हेच सत्य आहे.

सूक्ष्मजीवांच्या अभ्यासातून व्यक्तिगत स्वच्छतेच्या अनेक नियमांना सबळ पुरावा मिळाला. नियमित आंघोळ, शौचानंतर अथवा जेवण्यापूर्वी हात धुणे, खाण्यापिण्याचे पदार्थ अन पाणी स्वच्छ ठेवणे इतपत ढोबळ पायाभूत स्वच्छतेच्या नियमांचे आरोग्य राखण्याच्या दृष्टीने महत्त्व आपल्याला समजले.

एकीकडे सामाजिक स्वच्छतेचे नियम तर सांगूनही आपल्याला अजून आचरणात आणता येत नाहीत. मात्र दुसरीकडे सूक्ष्मजीवांचा नायनाट करण्याच्या हौसेला मोल उरले नाही. “मॉं माने सिर्फ डेटॉल का धुला” हेच स्वच्छतेचं ब्रीदवाक्य झालं. ते टीव्हीवर सूक्ष्मदर्शकाच्या गोलात एका बाजूला वळवळणारे जंतू अन दुसरीकडे स्व्च्छ पांढरं हे प्रतीकात्म चित्र आपल्याला खरंच वाटू लागलं. संडासात बसून माणसांच्या आरोग्यावर हल्ला करण्याचे बेत आखणारे हिरवे-पिवळे विचित्र जीव पाहता पहता सरसकट सगळेच सूक्ष्मजीव आधुनिक खलनायक झाले. आणि त्यांचा पाडाव करण्यासाठी जहालातील जहाल रसायनांचा वापर अपरिहार्यच झाला.

त्यांचे जग साध्या मानवी डोळ्यांनी दिसत नाही अन सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नायनाट माणसाच्याने शक्यच नाही. खरंतर आपल्या ऍंटीबायोटीक्स, डिस इनफेक्टंट इत्यादींनी सूक्ष्मजीवांना काहीएक फरक पडत नाही हे गेल्या काही दशकात अभ्यासकांच्या लक्षात आले आहे. आपण जर सूक्ष्मजीवांना हरवू शकत नसू तर काय करायचं?! त्यांनाच सोबत घेऊन लढता आलं तर?!

पायाभूत स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे, योग्य आहार अन व्यायामाने शरीराची काळजी घेणे अन आपली प्रतिकार शक्ती उत्तमातल्या उत्तम स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करणे इतकेच खात्रीशीर आपल्या हातात असते. कितीही प्रयत्न केले तरी रोग पसरवणारे सूक्ष्मजीव माझ्या संपर्कातच येऊ नयेत अशी काळजी घेणे निव्वळ अशक्य अन हास्यासपद आहे. मात्र आपल्या शरीरात रोग पसरवणाऱ्या सूक्ष्मजीवांसोबत त्यांना विरोध करणारे जीव देखिल जर असतील तर आपण रोगाला प्रतिकार करू शकू. म्हणजेच आपली खरी सुरक्षितता सूक्ष्मजीवांच्या जैवविविधतेत आहे.

आपल्या शरीरातील “अंगभूत” प्रतिकारशक्ती भलतीच मजेदार गोष्ट आहे. अनेक प्रकारच्या जीवाणू अन विषाणूंना आपल्या पांढऱ्या रक्तपेशी ओळखत असतात. त्यातील बहुतेक जीवांना रोखणारी प्रथिने आपल्याला बनवता येतात. एकदा एका प्रकारच्या प्रथिनाची ओळख पटली कि पुन्हा त्याच infection ला आपण सहजी बळी पडत नाही. आपण आपल्या शरीराला जितक्या अधिकाधिक जैववैविध्याची, पण मर्यादेत ओळख करून देऊ तितकी आपली रोगप्रतिकारक शक्ति अधिकाधिक ’सशक्त’ होते.

याविरुद्ध १००% जीवाणूमुक्त जगण्याचा प्रयत्न कधीच सफल होत नाही. जितकी नवी रसायने वापरावी तितके सूक्ष्मजीव अधिकाधिक धीट होत जातात, मात्र त्या नादात आपली प्रतिकार शक्तीच आपण घालवून बसलेलो असतो.

सूक्ष्मजीवांची भीति बाळगत सतत स्वच्छतेचा अतिरेक करणे हे पुढारलेपणाचे लक्षण नसून नवे वैचारिक अंधत्व आहे. आणि वैचारिक अंधत्वाला विज्ञान कधीच साथ देत नाही.

गेल्या काही वर्षात अनेक लोकांशी बोलून, प्रतिकारशक्ती अन सूक्ष्मजीवांविषयी उपलब्ध असलेली अथांग अन तरीही अपूर्ण माहिती समजून घेऊन, स्वत:च्या जीवनशैलीत हळूहळू बदल करत मी माझे स्वत:चे सूक्ष्मजीव धोरण बनवते आहे. यात अनेकानेक चित्रविचित्र लोकांचे, अभ्यासक-विचारवंतांचे, फ़िरस्त्यांचे मौल्यवान योगदान आहे. मात्र माझ्या वेडेपणाबद्दल भरपूर लोकांना आक्षेप असणार हे गृहित धरून अन्य वेड्यांचा उल्लेख न केलेला बरा….

मात्र हे सूक्ष्मजीव धोरण सांगण्यापूर्वी काही स्पष्टीकरण गरजेचे आहे…

  • या धोरणात स्थल-कालानुसार, परिस्थिती तसेच गोष्टींच्या उपलब्धतेनुसार ’धोरणीपणे’ बदल होतात. हे एक लवचिक धोरण आहे, धर्म नव्हे!
  • मी वैद्यकीय अभ्यासक, डॉक्टर अथवा तज्ञ नाही. मात्र माझ्या आरोग्याचे निर्णय हवे तसे घेण्याचे मूलभूत स्वातंत्र्य मी पुरेपूर वापरते आहे, इतकेच.
  • हे माझे धोरण आहे आणि निव्वळ उदाहरणादाखल घ्यावे. हे जसेच्या तसे दुसऱ्यांना लागू होऊ शकत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपापले धोरण ठरवावे अन पाळावे, मात्र आपल्या धोरणाचा दुसऱ्यांच्या आरोग्याला अथवा धोरणाला त्रास होईल असे काही सहाजिकपणे करू नये!
  • आपल्याला आपले धोरण ठरवायचे नसेल तरीही काहीच प्रश्न नाही. डेटॉल ते काम आपल्या सगळ्यांसाठी करतेच. आपण मुकाट ते सांगतील तसे करावे. बराच मनस्ताप वाचतो!

माझे सूक्ष्मजीव धोरण

तर… मी कामानिमित्त भरपूर फिरते, अन तेही बहुतेक वेळा बऱ्यापैकी दुर्गम भागात, आडगावातून. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आजकाल सगळीकडे विकत मिळतात, पण त्यांचा कचरा मागे सोडत फिरणे अजिबात पटत नाही. मला स्वत:ला सूक्ष्मजीवांपेक्षा अधिक भीति प्लॅस्टीकची वाटते. मी माझी-माझी धातूची पाण्याची बाटली घेऊन फिरते. स्थानिक पाणपोया, चहाच्या टपऱ्या किंवा होटेलं, बस स्थानके अशा सर्वसामान्यपणे अस्वच्छ मानल्या जाणाऱ्या जागी बाटली भरून घेते. घरी देखिल गेली अनेक वर्षे साधं नळाचंच पाणी पिते आहे. कुठलाही फिल्टर नाही, पुण्यात, त्यतल्या त्यात आमच्या भागात तरी बरं पाणी येतं. आपली काहीही तक्रार नाही.

बाहेर खाण्याची वेळ खूपदा येते, तेव्हा स्वच्छतेचा अजिबात विचार करत नाही. मात्र मुक्कामी पोहोचल्यावर स्थानिक, घरचे जे काही पानात वाढले जाईल ते आनंदाने खाते. क्वचित पोटात किरकोळ गुडगुड होण्याव्यतिरिक्त गंभीर काही त्रास आजवर झालेला नाही.

भारतातल्या बहुतेक सर्व गावांमधून आसपासच्या शेतांतून पिकवलेले, घरचे, कधीकधी चुलीवरचे, साधे, शाकाहारी अन स्वच्छ जेवण मिळतेच मिळते. त्यात रासायनिक खता-कीटकनाशकांचा वापर जवळात जवळील शहरापर्यंतच्या अंतराच्या व्यस्त प्रमाणात असतो. जितका भाग दुर्गम तितका रसायनांचा वापर कमी.

मात्र प्लास्टिक सर्व चराचरात भरलेले असल्यामुळे आजकाल गावागावात चूल पेटवण्यासाठी लेय्ज, कुरकुरेची पाकिटं जाळली जातात. त्या तसल्या निखाऱ्यात फुलवलेल्या भाकऱ्यांची मला थोडी भीति वाटते.

पुण्यात रोज सकाळी उठून धुरात अजून धूर सोडत गाडी चालवत, रस्त्यावरच्या मुर्दाड लोकांशी भांडत कामावर जाणे बंद केल्यापासून गाड्यांचा धूर खायला मिळेनासा झालाय. तेव्हापासून सर्दी-पडसं होणं जवळपास बंदच झालं. पूर्वी माझा खोकला महिना महिना ठाण मांडून बसत असे… आजकाल जरा घसा खवखवला तरी आश्चर्य वाटते. पडशाच्या जंतूंना मी आवडेनाशी झाले बहुदा.

त्यातून दोनेक वर्षात एखादं पडसं झालंच तर मी मनाला लावून घेत नाही. उगाच कुठले जंतू आपल्या नाकातोंडात गेले असतील असा विचार करत बसत नाही. चार दिवस मस्त आराम करणे परवडते कारण वर सांगितल्याप्रमाणे रोज गाडी काढून कुठे घडघड करत जायचे नसते.

गावकडची कामं निवांत चालतात… स्वत:च्या आरोग्याशी तडजोड करत खेचावे लागत नाही. पैशांशी तडजोड मात्र करावी लागते थोडी…

स्वत:च्या घरात भांडी-कपड्यासाठी रिठा- लिंबू घालून केलेले व्हिनेगर पुरते. आंघोळीला मसुरीच्या पिठाचे उटणे, साय किंवा स्वयंपाकघरातील बऱ्याच गोष्टी आलटून पालटून चालतात मला! रिठा-लिंबू व्हिनेगर शांपू म्हणून माझ्या केसांना चालते. (सूक्ष्मजीव नसते तर माझे व्हिनिगर कुणी बनवले असते?!)

रिठा-व्हिनिगरचा फेस मस्त होतो आणि सांडपाण्याबरोबर नदीत वहात गेल्याने नदीतील जैववैविध्याला त्याचा काहीही अपाय नाही.

महाराष्ट्र ते दक्षिण भारतात खोबरेल, उत्तरेत, थंडीत सरसोचे तेल केसांना चालते. दही, अंडे असल्या स्वयंपाकघरातील गोष्टी कंडिशनर म्हणून अधून मधून केसांना लावल्या की आपलेच लाड केल्याचे समाधान!

दही, ताक, इडली, डोसे, ब्रेड अन इतर फरमेंट्स आवडीने खाते (आणि पिते). तेवढीच माझ्या पाळीव जैववैविध्यात भर! प्रवासामुळे अधूनमधून अस्वच्छ हाताने रस्त्यावरचे अन्नपदार्थ होतातच….

एरव्हीच्या या असल्या वेडेपणासोबत घरी अथवा मुक्कामाच्या गावी मात्र हात-पाय न चुकता धुते… ज्या गावात पाणी असेल त्या गावात आंघोळ करते, नाहीच मिळाली करायला तर चालवून घेते.

भरपूर ऋतुजन्य, स्थनिक फळं, भाज्या, रानभाज्या मिळतील तशा आवर्जून खाते. रोजरोज गव्हाची साधी पोळी नकोच त्यापेक्षा वेगवेगळ्या धान्यांची विशेषत: नाचणी-तांदळाची भाकरी (स्वत:च्या घरी असेन तर) चालते. तुरीची डाळ गेल्या वर्षी एकदा खाल्ली होती. मसुर डाळ, मूग डाळ किंवा अन्य (कुठल्याही राजकारणात भाव खाऊन न चढणाऱ्या) डाळी खायला लागल्यावर अधिक आवडू लागल्या.

कांदा महाग झाला म्हणजे तो खाण्यासाठीचा योग्य ऋतु नाही असं आपलं मला वाटतं. बरेचदा तेव्हा रानभाज्यांची चंगळ असतेच. काही बिघडत नाही.

स्वयंपाकासाठी रिफाईड तेल नाही. घाण्याचं शक्यतो दरवेळी वेगवेगळं तेल वापरते. एकाच तेलाला काय डोक्यावर घ्यायचं?! मला कुठल्याही तेलाचा वास त्रासदायक होत नाही अन कुठल्याही प्रदेशातील अन्नसंस्कृती अद्याप तरी नावडली नाही.

सगळ्यात ’वैविध्य’ जमलं की कुठलेही एकाच प्रकारचे जंतू पोसले जात नाहीत. त्यांचं वैविध्य जितकं तेवढी आपली तब्येत चांगली रहात असावी असं माझं निरिक्षण आहे.

त्यातून जे मला खात येत नाही ते ते सगळं आमचे कंपोस्टमधले सूक्ष्मजीव खातात… अधूनमधून मिर्च्या, कारली, टोमॅटो उगवलेच तर ते परत मीच खाते!

सूक्ष्मजीवाय नम:!

अर्थात या सगळ्यात मी फारशी आजारी पडत नाही यात माझे काहीच कर्तृत्व नाही, कारण आपली प्रतिकारशक्ती ही अजबच असते, व्यक्तीनुसार बदलते. फारतर माझ्या पूर्वजांच्या जनुकांना अन सूक्ष्मजीवांना धन्यवाद… वयानुसार अन इतर कारणांनी जंतूंमुळे न होणारे आजार होऊच शकतात. मात्र त्यासाठी सूक्ष्मजीवांना बोल लावणार नाही मी!

अजून अनेक गोष्टी अशा अहेत जिथून बाजारू रसायनांना दरवाजा दाखवून सूक्ष्मजीवांना मोकळं सोडायला आवडेल… काम सावकाश चालू आहे. कारण कुठल्याही एकाच धोरणाचा अतिरेक म्हणजे अंधश्रद्धाच पुन्हा…

ग्रामपरीच्या प्रकरणात अधिक खोलवर….

भाग १: ग्रामपरीच्या प्रकरणात…

एमआरएचं आवार गेल्या चाळीस वर्षात राखलेल्या झाडांची फुला, पक्ष्यांनिशी नांदती राई आहे. इथे सकाळी, संध्याकाळी, रात्रीच्या शांततेत….कधीही एकांत धावून येतो, जिवलग मित्रागत! मला तर या एकांतात इथल्या पायवाटांनी भिरीभिरी फिरतच रहावंसं वाटतं!

एखाद्या पायवाटेवर मधेच अचानक गुलमोहराचा भडक लालबुंद तुरा उगवलेला असतो…. तर वळणापलीकडे जॅकरांडाने निळ्या जांभळ्या मखमलीच्या पायघड्या घातलेल्या असतात…मधेच जणू आहेत ते रंग कमीच पडले असावेत असा बहाव्याचा सोनपिवळा संभार उसळून येतो! माझ्या कमळांच्या तळ्याभोवतीची झाडी पाण्यावर ओठंगलेली असते…. त्यात धिटाईने नाचणारे दयाळ अन बुलबुल माझ्याकडे तुच्छ दुर्लक्ष करतात! त्याच झाडांत राहणारा एमआरएचा निवासी पॅराडाइझ फ्लायकॅचर एखाद्या सेलिब्रिटीसारखा क्वचित दर्शन देतो! कुण्या रसिकाने त्याचं नाव स्वर्गीय नर्तक ठेवलंय कोण जाणे….पण त्याचे कमनीय विभ्रम मी फक्त मुक्याने पाहून घेतले आहेत. सौंदर्याच्या पुराव्यासाठी फोटो काढत बसण्याइतकी जागरूक पर्यावरणप्रेमी नाहीच बहुदा मी!

संध्याकाळी एखाद्या पायवाटेनं जरा लांबवर गेले तर रानमोगऱ्याने सगळा सुवासिक दंगा घातलेला असतो! करवंदी अन जांभळांचे घोस पाहून आताशा हरखून जाणं बंद केलंय मी…. त्या झाडांवर माझ्यापेक्षा अधिक अवलंबून असलेले पक्षी, किडे अन छोटी पोरं जास्त महत्त्वाची आहेत!

अर्थात निसर्गवर्णनात मला आग्या माश्यांचा उल्लेख मोठ्या आदराने केला पाहिजे. या वात्रट माश्यांनी माझ्या सकाळच्या “वॉक”चा “जॉग” केला होता! त्यांची घोंघों माझी पाठ सोडत नव्हती अन मग धूम पळत खोलीत जावं लागलं होतं!!

माझी रहायची व्यवस्था “व्हॅली व्ह्यू” नावाच्या इमारतीत आहे. इथून पाचगणीची हिरवीगार दरी दिसते हे पुन्हा सांगायला नकोच. वळवाचा पाऊस अन गारा या दरीतून उसळी खात अंगावर धावून येतात तेव्हा मात्र “रौद्र” या शब्दाचा अर्थ नीट कळतो!

अजून देखिल खूप आवडीच्या जागा आहेत माझ्या या आवारात विखुरलेल्या…. सोनचाफ्याच्या झाडाखाली गोलाकार लावलेले बाक, बॉटलब्रशच्या झिपऱ्या झाडाखाली गप्पांच्या आमंत्रणासारख्या रेंगाळलेल्या खुर्च्या…

अन ग्रामपरीच्या शेतांभोवती अती सलगीने वावरणारे मोर! आवारातच उंडारणारे दोन चार भटके कुत्रे कंटाळा घालवायला या मोरांच्या मागे लागतात. पण हे अगोचर पक्षी आपला अवजड संभार घेऊन मोठ्या चपळाईने उंच कुंपणावर जाऊन बसतात….. तेही मोठ्या तोऱ्यात! यातल्या एका बेट्याने ग्रामपरीत काम करणाऱ्या मावशींच्या मागे मागे फ़िरून त्यांना चोची मारून अगदी वैताग आणला होता म्हणे!

क्वचित कधीतरी त्यांच्या आर्त केका साऱ्या दरीत घुमून येतात…. एखाद्या ढगाळ संध्याकाळी तो आवाज मन ढवळून काढतो…. काहीतरी सलणारं, एरव्ही मनाच्या कोपऱ्यात अडगळ म्हणून सारलेलं वर येऊ पाहतं…. मात्र असल्या सुंदर जागी दुखऱ्या आठवणी देखिल नकोश्या होत नाहीत…. बरंवाईट सगळंच आपलंसं होऊन जातं….माझ्या अस्तित्वासाठी पूरक होऊन जातं….

***

ग्रामपरीच्या सेंद्रीय शेतात काम करणाऱ्या  सुनीताताईंच्या (नाव वेगळं आहे) घराची दुरुस्ती चालू आहे. त्यात मदत करायला सौम्या (ग्रामपरीच्या “वॉश” प्रकल्पाची प्रमुख), मला घेऊन गेली होती. सुनीता ताई अन त्यांच्या नवऱ्याची मिळून मासिक कमाई दहा हजार पण नाही. घरात स्वत:ची अन नात्यातली मिळून पाच लहान मुलं आहेत. वाटणीत मिळालेला घराचा पडका भाग दुरुस्त करण्यासाठी अन नवीन शौचालय बांधण्यासाठी त्यांना ग्रामपरीतले सगळे मदत करत आहेत. सौम्या अन मी सुनीता ताईंच्या घरी गेलो तेव्हा जोरदार पाहुणचार झाला…. आमच्यासाठी ते माझाच्या जातीतलं मॅंगो ड्रिंक आणण्यात आलं…. त्या पडक्या घरात माझाची बाटली चकाकत होती… मात्र अजिबात शोभत नव्हती….उगाच मला टोचत होती! सौम्याने मला डोळ्यानेच दटावले. पाहुणचार नाकारून त्यांचा अपमान करणे अधिक वाईट आहे. पण आम्हा दोघींनाच ते सरबत अजिबात गिळवेना. मग सुनीता ताईना मी अजून थोडे कप आणायला सांगितले. सौम्याने सगळ्यांसाठी थोडं थोडं ओतलं. तिच्या सहजतेनं, मोकळ्या आपुलकीनं सगळे आपपर भाव पुसून टाकले! माझाच्या पार्टीवर पोरं जाम खूष होती! त्यांचं शुभ्र हसू पाहून माझा कडवटपणा कमी न होता तर काय!

आज पुण्यात कतरीना कैफचं माझाच्या जाहिरातीचं मोठ्ठं होर्डिंग अन त्याच्या भोवतीचा झगझगीत उजेड पाहिला कि….त्या घराच्या पडक्या भिंती आठवतात….

मोठ्ठा प्रश्न उगारावासा वाटतो विकासाच्या, सुखाच्या उपऱ्या कल्पनेवर!

हे ग्रामपरी प्रकरण फार जड जाणार आहे मला….
***
पाचगणीत महागडं ग्रिल्ड सॅंडविच, स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाणे, अवाच्या सवा किमती लावलेल्या अनावश्यक वस्तू खरेदी करणे हे सगळं पूर्वी केलंय मीही. पण माझ्या भोवतीच्या आवाराने आता मला इतकं घट्ट गुंतवून ठेवलंय कि गेल्या दोन महिन्यात मी एकदाही बाजारात गेले नाहीये. अद्याप काहीही खरेदी केलं नाहीये…. अन तेव्हापेक्षा मळक्या कपड्यात, चिखला मातीत, साध्या चपला घालून मी अधिक आनंदात आहे…. हे कसं काय?!
आता पाचगणीच्या बाजारात आनंद विकत घेता येणार नाही का मला?! पाचगणीतल्या महागड्या हॉटेलांना विकण्यासाठी आसपासच्या गावातून पाणी उपसून आणणारे टॅंकर, त्या गावातला वर्गसंघर्ष, राजकारण, पाण्याचं विकृत असमान वाटप…. दरवर्षी आटत चाललेल्या, पाण्याच्या हावेपोटी अधिक खोल अधिक रुंद होत असलेल्या विहिरी विसरताच येणार नाहीत?!

पाचगणीतल्या हिरव्या जंगलावर कडी करून उगवणारे अत्याधुनिक गृहप्रकल्प…. त्यांच्या सिमेंटने माखलेल्या उजाड जमिनी…. जांभ्या दगडाच्या हावेपोटी कुरतडून खाल्लेले सह्याद्रीचे लचके….

डोळ्यासमोर वणव्यात भस्मसात झालेली साडेतीनशे देशी झाडांची रोपं…. स्ट्रॉबेरीच्या अतिरिक्त लागवडीने गिळून टाकलेले डोंगरउतार…. उजाड झालेली टेबल लॅंड, हरवलेली जंगलं…. कायमचे उडून गेलेले पक्षी…. यांचा सगळ्याचा हिशेब पाचगणीच्या बाजारात मिळेल का मला?!

अस्वस्थ करून सोडणाऱ्या खूप गोष्टी आहेत इथल्या साजऱ्या पर्यटनाच्या चेहऱ्यामागे….. त्यांचे सगळे वाभाडे इथे काढणं कदाचित योग्य नाही…. माझ्या लोकांना त्याचा त्रास होता कामा नये.

मात्र या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आक्रमक न होता देण्याची हिंमत अन चिकाटी आहे आमच्या ग्रामपरीकडे…. विकासासाठी आपल्यापेक्षा दुर्बळाचा बळी द्यावा नाही लागत…. निसर्ग अन माणूस, श्रीमंत अन गरीब माणूस, लहान अन मोठा माणूस हे सगळे एकत्र सुखाने वाटचाल करू शकतात हा विश्वास आहे….

शाश्वत बदलाची सुरुवात स्वत:च्या अंतर्मनातच करावी लागते. एकदा तिथे परिवर्तन सुरू झालं कि त्याचे पडसाद बाहेरच्या जगात पडू लागतात. चांगल्या बदलांची शृंखलाच सुरू होते. एमआरएच्या व्यापक पसाऱ्याचा गाभा इतक्या साध्या विचारसरणीत आहे!

सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी आदर्शवादी बकवास खरंच प्रत्यक्षात आणू शकणारे लोक आहेत! साध्या वेषात, हसऱ्या चेहऱ्याने, सहजतेने बोलणारे…. माझ्यातल्या वेडेपणाला अधिकाधिक अभिव्यक्त करू देणारे…. आयुष्याची फार मोठी रहस्य जेवणाच्या टेबलावर गप्पा मारत वाटून घेणारे… आहेत अजून जगात!

या संस्थेची मी देत असलेली माहिती कदाचित अपुरी आहे. अधिक सविस्तर माहिती संकेतस्थळांवर पाहता येईल

http://www.iofc.org/panchgani तसेच www.grampari.org

ग्रामपरीच्या प्रकरणात…..

या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला खरंतर….

अगदी नक्की ठरवलं होतं मी कि आता उडाणटप्पूपणा बास करायचा अन शहाण्यासारखं एखाद्या आर्किटेक्टकडे काम करायचं नाकासमोर दररोज दहा ते सहा!

***

इकॉलोजिकल सोसायटीच्या वर्गातला माझा मित्र, रेनी, पाचगणीत काहीतरी काम करायचा म्हणे. ऑयकॉसमधल्या पर्यावरण सर्व्हेसाठी या भूगोलशास्त्रज्ञ मित्राला सोबत घेऊन भरपूर भटकायला मिळालं. तेव्हा मी त्याच्या मूळ कामाबद्दल चौकश्या सुरू केल्या.

तो एम आर ए च्या ग्रामीण पर्यावरण केंद्रात (ग्रामपरी) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचं काम करत होता. आता यातून मला सुद्धा काडीचा अर्थबोध झाला नाही. प्रत्यक्ष जाऊन काय काम आहे ते पाहिल्याशिवाय जिवाला स्वस्थता लाभलीच नसती, म्हणून मी ऑयकॉसचा निरोप घेतल्यावर एका दिवशी तडक उठून पाचगणीला गेले.

सहजच गेले…. या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला खरंतर….

तो जागतिक स्त्री दिन होता. ग्रामपरीच्या आवारात बरीच लगबग चालू होती. आसपासच्या गावातल्या महिला सरपंच अन त्यांचे पुरुष उपसरपंच (आहे किनी मज्जा!) जमले होते. ग्रामपंचायतीच्या कामकाजातला महिलांचा सहभाग निव्वळ प्रतिनिधित्व मिळून सुधारलेला नाही. मात्र ग्रामपरीमधे थोडं प्रशिक्षण घेऊन, कायदेतज्ञांशी, अनुभवी कार्यकर्त्यांशी चर्चा करून या महिला लोकप्रतिनिधींचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसला मला….

रेनीच्या मदतीने ग्रामपरीतल्या सगळ्यांशी ओळखी झाल्या. हसऱ्या जयश्री आंटी, रेनीचे बॉस, डॉ. जॅरेड अन सौम्यावर तर मी बेहद्द खूष होते! हे लोक ग्रामपरीचे डायरेक्टर वगैरे असतात याची फार गंभीर कल्पना नव्हती मला!

कोण कुठल्या देशातून उठून इथे पाचगणीत राहून माझ्या लोकांना पाण्याचं व्यवस्थापन, स्थानिक पर्यावरण, स्वच्छता, योग्य शौचालय बांधणी वगैरेबद्दल विचार अन काम करायला उद्युक्त करणारे हे कोण चमत्कारिक लोक आहेत?!

माझ्या नेहमीच्या अबोलपणावर कडी करून माझे सगळे विचित्र प्रश्न बाहेर उड्या मारत होते. अन तात्पर्य असं की रोजच्यासारख्या त्या साध्या दिवसाच्या शेवटी जॅरेडने मला ग्रामपरीत काम करायचं आवतन दिलं!

मी खूप घाईघाईने होकारार्थी मान डोलावून, तोंडाने नाही म्हणत होते….

पुढच्या आठवडयात जॅरेडसोबत गोडवली गावात चालू असलेलं झऱ्यांच्या व्यवस्थापनाचं काम बघायला गेले. (त्यावर एक अजून पोस्ट लिहू आपण) पण नुसतं बघायला माझं काय जात होतं…..

असंही या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला….

त्याच दिवशी माझ्या कामाचं स्वरूप, कामाचे तास, दिवस अन इतर तपशील ठरत गेले. पुढच्या आठवड्यात मी ग्रामपरीसोबत काम करण्याचा करार केला! हा दोन महिन्यांचा करार अतिशय हुशारीने आखलेला असून त्याच्या कालावधीत भविष्यात वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे! मी मात्र नाही म्हणणार आहे….

अजूनही या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचं नाहीये मला….

मग जमेल तेव्हा घरून काम करणं सुरू झालं. झरे पुनरुज्जीवन प्रकल्पाचं संपूर्ण दस्तावेज दोन भाषांत तयार करणे हे मुख्य काम. भरपूर रेखांकने, नकाशे अन चित्रं वापरून पश्चिम घाटात अथवा तत्सम प्रदेशात वापरता येईल असं भूजल व्यवस्थापन हस्तपुस्तक तयार होत आहे.

मात्र त्यासाठी मलाच आधी भूजलसाक्षर होणं भाग होतं. त्याशिवाय कसली रेखाचित्रं काढणार होते?!

मग माझ्या पुणे पाचगणी फेऱ्या सुरू झाल्या. आता एसटी महामंडळ माझं दुसरं घरच झालंय. पुणे महाबळेश्वर निमआरामच्या सगळ्या कंडक्टरांना मी ओळखते आताशा! त्याशिवाय माझ्या नमुनेदार सहप्रवाशांवर एक सविस्तर पोस्ट लिहेन कधीतरी!

पाचगणीत दरवेळी बसमधून उतरले की एक खोल श्वास घेते मी….. सगळा सह्याद्री…. सगळं जंगल… सगळे झरे, दरीवर घिरट्या घालणारे गरूड, पायरीदार भातखाचरं अन भन्नाट गार वारा…. हे सगळं सगळं एका श्वासात भरून घेते!

आता इथून पुढे या सगळ्या प्रकरणात न पडणं शक्यच नाही हे लक्षात येतं माझ्या…..

एम आर ए च्या आवारात शिरतानाच मी दात काढत हसायला लागलेली असते…. जणूकाही संचार होतो माझ्यात कुठल्यातरी उत्साही चिवचिवत्या पक्ष्याचा! चालत जाते कि उडत जाते तेही लक्षात येत नाही!

मग भरपूर चर्चा, झालेल्या कामाचा मागोवा, पुढे काय काय रेखांकने करायची याचा विचार…. कधीकधी सकाळ ते संध्याकाळ गावात चालू असलेल्या कामाची पहाणी. अर्थात त्याला पहाणी म्हणणं हास्यास्पद आहे. जॅरेड अन त्याचे सहायक अशोकभाऊ यांच्यासोबत मी देखिल पोती उचल, सिमेंट कालव असले उद्योग करते. जुने दगडी हौद खराट्याने साफ करण्यापासून सिमेंटची घमेली वाहून नेण्यापर्यंत अन जॅरेडसाठी दिवसभर धावते भाषांतर करण्यापासून ते एमआरएच्या आवारात, कमळाच्या तळ्याकाठी बसून रेखांकने करण्यापर्यंत सगळेकाही माझे काम आहे!

एका दिवशी सकाळपासून भाषांतरे करून मी इतकी बावचळले होते की गोडवलीच्या मीटींगमधे मी गावकऱ्यांशी इंग्रजी अन जॅरेडशी मराठी बोलायला सुरुवात केली. अख्खं गाव हसत होतं मला! मग एका तुकाराम आबांनी आवाज टाकला, “ताईंसाटी च्या सांगा रे!”

***

एम आर ए मधे रहाण्याजेवण्याची सोय फारच उत्तम आहे. मला विचाराल तर माझ्या जरूरीपेक्षा खूपच लाड होत आहेत! शिवाय मला स्वयंपाक करावा लागत नाही हा बोनस!

इथली जेवणवेळ हा एक विशेष कार्यक्रम असतो. सुरुवातीला इतक्या साऱ्या अनोळखी लोकांसोबत जेवायला मी फार घाबरत असे. कुठे बसू? कुणाशी बोलू? अन काय बोलू?!

मुळातच ही संस्था समजून घेणं अन एका पोस्टमधे समजावून सांगणं अशक्य आहे माझ्यासाठी…

मात्र बघता बघता या जेवणवेळा माझ्या सगळ्यात मोठ्या शैक्षणिक संधी झाल्या. अनोळखी लोक हा शिकण्याचा केवढा मोठ्ठा खजिना असतो! रोज मी नवीन टेबलाशी बसते. कधी माझ्या शेजारी एम आर ए मधे काम करायला आलेले इंटर्न्स असतात, कधी माझे बॉस लोक असतात, त्यांचेही वरिष्ठ पदाधिकारी, एम आर ए चे जुने सहकारी, निवासी कर्मचारी, स्वयंसेवक…. वेगवेगळ्या देशातून आलेले विविधरंगी लोक! त्यातल्या प्रत्येकाचं काम, पूर्वेतिहास, त्यांच्या प्रेरणा… सगळं किती वेगळं!

मी मात्र जे सापडेल त्याला प्रश्न विचारून सोडते! एकदा एम आर ए च्या सेक्रेटरी काकांचं ताट माझ्या प्रश्नांची उत्तरं देतदेता सुकून गेलं आहे! (नंतर बहुदा त्यांनी माझं टेबल टाळलं असावं!)

रोज किमान शंभर दिडशे लोक जेवणार म्हणजे घासण्यात भांडी किती पडत असतील! इथे रोज एका विभागातले लोक ताटं वाट्या विसण्याचं काम करतात. गाणी म्हणत, चेष्टा मस्करी करत भांडी घासायला मीही जाऊ लागले. तसंही मला लहानपणी भांडी घासण्याचा खूप षोक होता…

मोठं झाल्यावर (म्हणजे ओट्यावर हात पुरण्याइतकं मोठं!) भांडी घासण्याचं स्वप्न असं पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं!

एका विशेष गर्दीच्या दिवशी भांडी घासायला मदत केल्याबद्दल आमच्या आफ्रिकन इंटर्न “योना”ने चक्क मला मिठी मारली! मीही बावचळल्यागत हसून साबणाच्या फ़ेसात घातलेले हात तिच्या गळ्यात टाकून मोकळी झाले!

याच मुलीने एका संध्याकाळी प्रार्थनागृहात तिच्या मधाळ आवाजात कुठलीतरी आर्त देवकवनं गायली होती….. तो स्वच्छ घंटेसारखा नाद देवाच्या कानावर न पडणं अशक्य आहे!

***

उरलेल्या गोष्टी वेळ काढून लिहीत आहेच…. आणिक फोटो सुद्धा टाकेन पु्ढच्या पोस्टमधे!

भाग २: ग्रामपरीच्या प्रकरणात अधिक खोलवर