“मन्दाकिनी की आवाज” बांधताना….

पुरानी दिल्ली स्टेशन, कमसम येथून नमस्कार!

आज इंटरनेट उपलब्ध आहे, स्थानबद्ध वेळ आहे अन दुसरं काही व्यवधान नसल्याने शहाण्यासारखी ब्लॉग लिहितेय! जरा जगाशी जोडल्यागत वाटतंय….

***

तर निघताना मी विचारलं, “मला जमेल का? काही चुकलं, गडबड झाली तर?!”

त्या म्हणाल्या, “तू काम कर फक्त. अनुभव महत्त्वाचा, त्यातून शिकत रहा, सगळं ठीक होईल”

हा अशीर्वाद अन चार कागदांवर रेखाटलेली स्केचेस एवढाच आधार घेऊन निघाले….

कारण यावेळी डीडीच्या हिमाचलमधून माझी उचलबांगडी झाली होती थेट उत्तराखंड राज्यात गुप्तकाशीजवळच्या गावात. “सेना गडसरी” गावाचं नाव खालच्या फाट्यावरच्या बाजारात देखिल कोणाला ठाऊक नाही, नकाशावर शोधायच्या फंदातच पडू नका!

या गावामधे गेलं वर्षंभर बेंगलोरच्या “पीपल्स पॉवर क्लेक्टिव्ह” या संस्थेचं त्रिकूट जाऊन राहिलंय. लंडनमधे बीबीसीसाठी दीर्घ काळ काम करून परतलेली रेडियो पत्रकार अन संस्थेची सह-संस्थापक, सरिता, वयाने सगळ्यात छोटी पण अतिविलक्षण श्वेता अन अबोल, शिस्तशीर तरी सौम्य स्वभावाचा त्यांचा इंजिनियर, विन्सेंट यांनी मिळून गावातल्या स्थानिक गढवाली लोकांना सोबत घेऊन एक सामुदायिक रेडियो केंद्र सुरू केलं.

सगळ्या सांस्कृतिक, भाषिक अन वैयक्तिक विसंवादातून संवादाचं एक माध्यम उभं राहिलं…..

रेडियो केंद्राचे सगळे कार्यक्रम हिंदी-गढवाली भाषेत, गावागावांत फिरून ध्वनिमुद्रित केले जातात. गाणी, कविता, नाटुकली अन विनोद यांचा देशी खजिना जमवला जातो अन रोज ठराविक वेळी “मंदाकिनी की आवाज”चे एकाहून एक वरचढ रेडियो निवेदक त्याचं प्रसारण करतात.

छोट्या गावात राहून एक स्वप्न पाहणाऱ्या मानविंदर नेगींसाठी त्या स्वप्नापासून प्रत्यक्षात रोज बोलणाऱ्या रेडियो केंद्रापर्यंत घेऊन येणारा प्रवास खूप अवघड होता. मानविंदरजी अन त्यांच्या पत्नी, उमादीदी यांचं व्यक्तिमत्त्वच रेडियोने पालटून टाकलंय!

वीज गेलेली असताना, मिणमिणत्या उजेडात चुलीतली लाकडं सरसावून रात्री आम्हाला “आलू के पराठे” रांधून घालणाऱ्या उमादीदीकडे पहात मी त्यांचं दिवसाचं रूप आठवायचे…

हातात लॅपटॉप घेऊन प्लेलिस्ट बनवणाऱ्या अन मधेच कोणी त्यांच्याशी बोलयला गेलं तर वर न पाहताच हाताने थांबवणाऱ्या व्यग्र उमादीदी….

असंख्य बटनांनी ग्रासलेल्या स्टुडियोत भारतीय बैठकीवर ताठ बसलेल्या, आत्मविश्वासाने निवेदन करणाऱ्या शांत उमादीदी!

कालपर्यंत स्वयंपाकघराबाहेर न ऐकला जाणारा त्यांचा आवाज मंदाकिनीच्या खोऱ्यात, घराघरांत जात असणार…

एका रेडियोने हे सगळं घडवलं!

पण या रेडियो केंद्राला इमारतीच्या रूपात घडवणं इतकं सोपं नाही, हे देखिल मला लवकरच समजलं! जन्माने मुलगी असणं अन वयाने फार प्रौढ नसणं हे एका आर्किटेक्टच्या कामातले सगळ्यात मोठे अडथळे असतात.

मुळातच आपल्याकडची कार्यसंस्कृती खूप किडवून ठेवली आहे आपण. आता तर ब्रिटिशांना दोष देण्याचीही पळवाट उरली नाही! श्रमाला कवडीची किंमत नाही अन दिल्या शब्दाला देखिल. काम करणाऱ्यांना अन काम करवून घेणाऱ्यांना देखिल कामाविषयी आस्था नसण्याचाच प्रघात आहे. तो मोडायचा म्हणजे, त्यापेक्षा हिमालय सर केलेला सोपा!

पण चांगल्या माणसांचं एक अदृष्य जाळं असतं, ते सगळ्यातून सांभाळून घेऊन जातं, जिथे जाईन तिथे! रेडियो स्टेशनच्या बांधकामावर नियमितपणे येणारे दोन सहायक (उद्धट मराठीत त्यांना मजूर म्हणतात) महावीरजी- प्रमोदजी इथे मदतीला आले. त्यांच्या भावकीतले जीतपालजी अतिशय सरळ, मेहनती अन सौम्य स्वभावाचे मिस्त्री आहेत. मला पाहताच बिडी विझवून लपवतात अन मला “जी सर” म्हणतात! माझ्या मुलगी असण्याबद्दल त्यांना काही आक्षेप नसणं हा देखिल एकत्र काम करण्याच्या दृष्टीने मोठाच घटक होता!

नकाशा समजावून सांगताना ते अतिशय शांतपणे लक्षपूर्वक ऐकतात. त्यांचे प्रश्न इतके वास्तववादी अन थेट असतात कि खूप विचारपूर्वक उत्तर द्यावं लागतं अन एका चांगल्या प्रश्नाचं उत्तर देता आल्याचा सुप्त आनंद होतो!

या काम करण्यातूनच खूप धीर आला मलाही. एकटीच बाजारात जाऊन, बांधकाम साहित्य विकत घेऊन, ट्रक भरून साईटवर आणत असे.

माझ्या बांधकामाच्या टीमसोबत खडी फोडली, वाळूचा ट्रक उतरवला, कॉक्रीट केलं, घमेली वाहून नेण्याच्या साखळीत काम केलं, दगडांचं बांधकाम, ज्याला “चिनाई” म्हणतात ते केलं…. गजांची जाळी बनवून जोत्याचा बीम भरला.

रोज आमच्या माणसांच्या आधी मी अन आमचा इंजिनियर, विन्सेंट साईटवर हजर रहात होतो. अन सारे घरी परतल्यावर, सगळी अवजारं जागच्याजागी गेल्याची खात्री करूनच आम्ही परत जात होतो. सारे चहा एकत्र पीत बसायचो, कामही एकत्र करायचो. एका पोळीवर मध्यात भाजी वाढून घेऊन उभ्यानेच खाऊन अख्खा दिवस काम चालायचं, पण कधीच कुणी तक्रार करत नसे.

याशिवाय सरिताने आधीच कल्पना दिल्याप्रमाणे, इतरही अव्हानं होती. रेडियो स्टेशनच्या स्थानिक भागीदार संस्थेचे लोक मातीच्या बांधकामाबद्दल खूप साशंक आहेत. अनेक पिढ्या दगड-मातीच्या घरांत राहिलेल्या गढवाली लोकांना आता शहरातल्यासारखी “पक्की” सिमेंटची इमारत हवी आहे. त्यांना शाब्दिक वाद घालून हे कसं समजावणार कि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेलं दगड-मातीचं बांधकाम अधिक चांगलं आहे?!

सुरुवातीला त्यांच्या विरोधाची तीक्ष्ण धार सहन करून उभं रहायचं होतं.

डिझाईनवर चर्चा करण्यासाठी बैठक ठरवली तर ते कधीच भाग घेत नसत, मात्र स्वयंपाकघरात, रात्रीच्या जेवणवेळेला वाद होत. आवाज चढत जात. माघार न घेता पण कोणावरही कुरघोडी न करता उत्तर देत राहणं अवघड होतं. कोण चूक, कोण बरोबर हे फाट्यावर मारून, आपण सगळ्यांनी मिळून, न भांडता “मन्दाकिनी की आवाज” बुलंद करायचा आहे, यावर अधिक जोर देत होते.

त्यांनी कितीही बोचरे प्रश्न उगारले तरी चिडता येत नाही त्यांच्यावर, कारण मुळात हे सतत बोचत असतं कि त्यांच्या चांगल्या इमारतीच्या कल्पना आमच्या शहरी लोकांनी बिघडवल्या….. चूक त्यांची नाही आहे.

मात्र बांधकामाच्या साईटवर मी स्वयंपाकघरातलं मवाळ रूप घरी विसरून पाऊल ठेवायचे. इथे चर्चांना, लोकांना समजावण्याला अजिबात जागा न देता, दिलेल्या सूचना अचूक पाळल्या जाणं महत्त्वाचं आहे. माझ्या बांधकामाच्या टीमसमोर मी स्थानिक लोकांच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देत नसे, कुठल्याही प्रकारची अरेरावी, उर्मटपणा खपवून घेत नसे.

हळूहळू ही सगळी शिस्त त्यांच्या पचनी पडत गेली. मला हाताने बांधकामावर काम करताना रोज रोज पाहून देखिल त्यांचा विरोध सौम्य होत गेला. हळूहळू त्यांच्याही नकळत गरजेच्या वेळी त्यांचे हात माझ्या मदतीला येऊ लागले…. स्वयंपाकघरात वादांची जागा चर्चा अन गप्पा घेऊ लागल्या! एका दिवशी, बांबूची झुलती बेटं फार सुंदर दिसतात यावर आमचं एकमत झालं अन चुलीवर एकदा केलेला फोडणीची पोळी नावाचा अजब पदार्थ, दुसऱ्या दिवशी परत करण्याची फर्माइश झाली!

एकीकडे या भेटीत ठरवलेलं काम पुरं होत होतं. डीडीच्या मनात जन्माला आलेली रेडियो स्टेशनची इमारत आता जमिनीवर डोकं काढतेय. पायाच्या खोदकामात निघालेले दगड, आसपास मिळणाऱ्या मातीच्या, न भाजता, उन्हात सुकवलेल्या विटा वापरून भिंती उभ्या राहतील. अन गावाबाहेर डोंगरात मिळणारा स्लेट दगड वापरून केलेलं छत डिसेंबर २०१४ पर्यंत होईल.

पाया अन जोत्याचं काम संपवून पी. पी. सी. च्या त्रिकूटाबरोबर उंडारायला बाहेर पडले. देहरादूनमधे दिवसाउजेडी दिव्यांच्या झगझगीत प्रकाशात उजळवलेल्या मॉल्स पाहून गुदमरत होते…. मात्र खूप दिवसांनी ताटाकडे लक्ष देऊन, पोटभर खातपीत होते!

दोन दिवस माझ्यासोबत ऋषिकेशला राहून बाकीचे आपापल्या कामाला निघून गेले, अन त्यानंतर मी खरी सैलावले! निवांत गाव पहात फ़िरले…. घाटावर गंगास्नान केलं, संध्याकाळी गंगामाईची आरती अन पात्रात झरत जाणारे द्रोणातले दिवे पहात बसले… रात्री कॅफे निर्वाणात इझरायली वादकांची उडती थिरकती मैफल जमत असे… हे खास ऋषिकेशमधलं सांस्कृतिक वैविध्य! असतीलही वाईट माणसं, पण मला मात्र सगळी चांगलीच भेटली. अपरात्री चांदण्यातून लक्ष्मण झूल्यावरून एकटीच चालत हॉटेलवर परत जायचे तेव्हा माझा एकांत छेदून कोणीसुद्धा वळून पहात नसे. मग पुन्हा हॉटेलच्या गच्चीवर रात्र पहात उभी रहायचे…. मागे हिमालय प्रचंड उभाआडवा पसरलेला अन पुढ्यात गंगामाई चांदणं लेऊन संथसंथ मऊ वहात असलेली…

काहीतरी आहे त्या पहाडात अन नदीत…. सरळसाधे डोंगर-नदी नाहीच येत त्यांना राहता! काहीतरी गारूड करून टाकतात माणसाच्या अस्तित्त्वावर… मग आपणही सरळसाधे माणूस रहात नाही….

जर खूप खूप पूर्वी, ते आतून थरथरून उठणं, नदी होऊन वाहणं, पहाड होऊन गगनाला भिडणं माणसाने गंगाकिनारी अनुभवलं असेल, अन त्याला हिंदू असणं म्हणलं असेल, तर ते त्या रात्रीगत तलम निळंहिरवं देखिल आहे…. पहाटेच्या रक्तिम भगव्याइतकंच!

आता ऋषिकेशहून घरी परतण्यासाठी दिल्ली गाठली आहे, गजबजलेली, येताजाता वरून खाली बेशरमपणे पाहणारी दिल्ली.

पुरानी दिल्ली स्टेशन, कमसम येथून आता निरोप घेते… पुन्हा पुढच्या प्रवासासाठी!

दिवास्वप्न….

(हा दिवास्वप्नाचा पहिला भाग आहे. सगळं एकाच वेळी लिहिणं मला आणि वाचणं तुम्हाला शक्य नाही म्हणून….)

दु:स्वप्नासारखा सुरु झालेला प्रवास होता तो….सहा तास बेंग्लोर बस स्थानकावर संपूर्ण उनाडक्या करण्यात घालवले होते…रात्री आठ वाजता हरिहरपुराची बस आली तर खरी, पण तिने बेंग्लोर सोडायला दहा वाजवले… रस्त्यात दुसऱ्या बसला ठोकून झालं, चाकाचं पंक्चर (ला मराठी शब्द?!) काढून झालं, डायवरसायबांचं खाऊन (पिऊन?!) झालं… मग कुठे खडखडत प्रस्थान ठेवलं!

अतिमानवी पाठीच्या हिशेबाने बनवलेल्या “आराम” सीटवर रात्रभर अवघडून बसायची मनाची तयारी केली होतीच मी. पण रात्रीच्या लांब पल्ल्याच्या बसमधे एकटीच प्रवास करणारी तेवीस वर्षांची मुलगी असणं आजकालच्या काळात इतकी डोळे फाडफाडून बघायची गोष्ट असते हे जरा मला नवीन होतं!

माझ्या फ़ोनने वीसबावीस तासांच्या सेवेनंतर मान टकली होती… म्हणजे आता मी सर्वार्थाने एकटी असणार होते…. कानात गाण्याची बुचं (ipod) घालून शाल गुंडाळून मी मनोभावे झोपदेवीची आराधना सुरु केली. पण ती येते कसली?! सामान आणि शेजारच्या डोळेफाडू सहप्रवाशांच्या कृपेने झोपेची गाडी फारशी ताल धरत नव्हती. बसचे धक्के आणि आचके होतेच सोबतीला….आणि तो रात्रीच्या “यष्टीतला” खास रंगीत उजेड!

या सगळ्यातून पोहोचेन ते ठिकाण अजून काय काय समोर घेउन येणार आहे ही विवंचना पण माझी (आधीच अवघडलेली) पाठ सोडत नव्ह्ती…. बसने हळूहळू सूर आणि रस्ता पकडला… गार वाऱ्याच्या झुळुका शांतवायला झेपावत आल्या…. बसच्या धक्क्यांच्याच तालावर डोळा लागला माझा थोडासा….

बसच्या धुरकटलेल्या काचेबाहेर रात्रीचं गहिरं आकाश पसरलं होतं…. कुणीतरी तिथे गालात हसत माझ्या वैतागात झोपलेल्या चेहऱ्याकडे पहात होतं….

कचकचून ब्रेक मारत डायवरमहाशयांनी माझ्य झोपेला ब्रेक मारला…. दचकून उठत मी खिडकीबाहेर नजर टाकली…बसच्या हेडलाईट्च्या (ला मराठी शब्द?) झोतात रस्ता उजळत होता खरा… पण पहाटेच्या धुक्याच्या पडद्यातून फार दूरचं दिसतच नव्हतं…. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गच्च दाटून आलेलं बांबूचं बन वरून झुंबरासारखं दोलायमान झालेलं…. त्यातल्या प्रत्येक फटीतून दिसणाऱ्या आकाशाचा इंचन्‌इंच रत्नचांदण्यांनी मढला होता….माझ्या दु:स्वप्नासारख्या प्रवासाचं इतक सुंदर स्वप्न झालं होतं?! मी खरंच जागी झाले होते का असा प्रश्न पडला मला…!!

पुढ्चे दोन दिवस त्याच सुंदर दिवास्वप्नात घालवले मी… सुंदरतेच्या परिसीमा पुन: बदलायला लावेल असा निसर्ग, आणि त्यावर मात करतील असे सुंदर मनाचे लोक माझी वाट पहात होते….

त्या आकाशामागून गालात हसणाऱ्या कुणाकडे तरी पाहून आता मलाही हसू आलं! पुन्हा हुरुप आला त्याची जादुभरली कथाकादंबरी पुढे न्यायचा…!

हरिहरपुर यायला सकाळचे सहा वाजले…अन स्वप्ननगरीत उतरल्यासारखी मी रिकाम्या बस स्थानकावर उतरले…मला तिथे टाकून बस पुढे गेली… आता रिक्षा शोधायचं दिव्य करायला मी निघतच होते कि एक घनदाट काळा अजस्र मनुष्य पुढे झाला…

जिथल्या भाषेचा मला गंधही नाही, अशा अनोळखी गावात अपरिचित चेहऱ्यावरचं हास्य किती आश्वसक वाटतं! तो रिक्षावाला मला न्यायला बस स्थानकावर गेला तासभर उभा होता….. बस उशीरा आल्याबद्दल मीच त्याची तोडक्यामोडक्या भाषेत माफी मागत हलक्या मनाने त्याच्या रिक्षेत बसले… एरव्ही सगळीकडे स्वत:चं सामान उचलायची सवय होती मला. पण माझ्या सगळ्या प्रयत्नांना दूर सारून त्याने माझं सामान स्वत:च उचलून ठेवलं. रिक्षावाल्यांनी एवढं चांगलं वागवायची सवय नसते आपल्याकडे!

मी हौसेने आणि नवीन आलेल्या उत्साहाने त्याला नाव विचारलं… रावणा!!

हसऱ्या चेहऱ्याने हा रावण माझं कुठं हरण करून घेऊन जात होता कुणास ठाऊक. पण रिक्षेबाहेर पाहताना अशी काही दृष्य उलगडत होती कि मनातल्या शंकाकुशंका धुळीसारख्या धुवून जात होत्या…. फुटबॉलच्या मैदानासारखी विस्तीर्ण भाताची शेतं सकाळच्या कोवळ्या उजेडात स्तब्धपणे उजळत होती…. सह्याद्रीतल्या पायरीदार छोट्या शेतांची सवय असलेली मी त्या भाताच्या मैदानांना पाहून अचंबित झाले होते.

त्या पावसाळी मार्दवी हवेत पोसलेली बांबूची बेटं सगळ्या दृष्यांना आधी लपवून ठेवतात… दर पुढच्या वळणावर नवा नजारा पेश करत हसतात माणसाच्या ऱ्हस्वदृष्टीला! पुन: त्या दृश्याभोवती आपल्या वळसेदार पानांची चौकट विणत राहतात…

अशाच एका वळणानंतर या सगळ्या मायाजगाची मालकीण…. तुंगभद्रा नदी प्रकट झाली. वळणं घेत…धीरगंभीर प्रवाहाने वहात बांबूच्या बेटांतून ती जात होती…हे सगळं स्वप्नवत जग तिचंच होतं. तिच्याभोवती एकवटलेलं, तिच्याच जीवनरसावर पोसलेलं कर्नाटकातलं हे छोटंसं हरिहरपूर तिच्याच वळसेवेलांट्यांत ढगांची दुलई लपेटून अजून झोपलं होतं….

रिक्षा थांबली तेव्हा प्रबोधिनी गुरुकुल समोर होतं….सगळ्या विचित्र प्रवासाच्या शेवटच्या टोकाला.. तिथेच… स्थिर असलेलं. किती स्वप्नं पाहिली होती मी…किती मनोरे रचले होते…नियोजन केलं होतं…पैसे जुळवले होते…चमत्कारिक प्रवास केले होते…. पण त्या क्षणी रिक्षातून खाली पाऊल ठेवताना पहिल्यांदा मला जिवंतपणा समजला होता… सगळ्या जगण्याची धडपड का करतो माणूस ते समजलं होतं…..डोळे मिटून, झोपेत चालल्यासारखं रोजचं आयुष्य “वास्तव” म्हणून मुकाट जगता जगता मी त्या स्वप्नवत गावात अचानक डोळे उघडले होते….

तो एक जिवंतपणाचा सोनेरी क्षण….उरलेल्या निद्रिस्त वर्षानुवर्षांच्यापेक्षा मौल्यवान होता…. पावसाने ओथंबलेल्या आकाशाच्या आडून माझ्या स्तिमित अवस्थेला पाहून पुन: कोणीतरी गालात हसत होतं….

तळ्टीप: हरिहरपूरच्या आधिक फोटोंसाठी: http://picasaweb.google.com/anujnaa/PrabodhiniGurukula?feat=directlink

(क्रमश:)

दिवास्वप्न भाग II