सलाम…

त्याच्या मनाला शरीराचं जडत्व नव्हतं. त्याला दिसत नव्हते समोरचे निर्जीव शिळाखंड….त्याच्या शरीराच्या हजारपट विशालकाय आणि जड… त्या तरल विदेही मनाला दिसत होतं एक अतुल्य शिलाकाव्य. संपूर्ण जगातलं प्रेम अन उत्तुंग आनंद त्या मनात दाटला होता… त्याच्या उमेदीला शरीराचे किंवा समोरच्या शिळेचे बंध मान्यच नव्हते! त्या मनातली अतिमानवी ताकद असह्यपणे शरीरातून ओसंडत होती. त्याचे थरथरणारे हात शिळेवरुन फिरत होते. त्यांच्यातून स्रवणरा आनंद त्या शिळेचा आत्मा बनत होता…..

तेच हात जेव्हा छिन्नी-हातोडी घेऊन शिळेवर उठले तेव्हा ते स्थिर होते, अचूक अन शक्तिशाली. तिथे सुरु झाला प्रतिभेचा सगळ्यात खडतर प्रवास. मनातलं तरल, स्पर्शातीत काव्य शिळेत उतरवायचा भगीरथ प्रयत्न… तरलतेला धक्का लागू न देण्याची धडपड आणि शरीराच्या मर्यादा…

आजही ती शिल्पं पाहताना जणवतो त्यांचा प्रवास. तो शिल्पकार तर हजारो वर्षांपूर्वीच नामशेष झाला. पण ती शिळा मागे उरली. त्याचा उन्माद, त्याचा विषाद….त्याच्या प्रवासाची ecstasy त्या शिळेवर आजही रेखलेली आहे…

तेव्हा जर त्याच्याकडे काळापुढची तंत्रकुशलता असती, (technology असं आता ज्याला मराठीत म्हणतात ना, तेच ते!!) तर त्याने शिळेतून विश्वनिर्मिती केली असती. पण त्याने जशी मिळाली तशी आदिम शस्त्रं वापरून जी निर्मिती केली तिलाच आपण शिरसावंद्य आश्चर्य मानतो!! अपौरुषेय, अतुल्य कलाकृती मानतो!! आता हाताशी असलेल्या technology ने त्याच्या शिल्पकाव्याच्या (Xerox) photocopies सरसकट सगळ्या दगडांवर, कागदांवर काढून दाखवतो अभिमानाने! शिल्पकाराचं तरल मन अजूनही घुटमळतं त्या शिळेभोवती. आक्रोश करतं मानवी कानांना ऎकूच न येणारा…. “अरे, हे तर अयशस्वी शिल्प होतं रे!! कुणीतरी यापेक्षा सुंदर काहीतरी घडवा रे! कुणीतरी या दगडाचं खरं सौंदर्य बाहेर काढा रे….”

पण माणसं बहिरी आहेत….त्यांना हा आक्रोश ऎकूच येणार नाही…. ती तर या बिचाऱ्य़ाच्या अयशस्वी प्रयोगाचा कीस पाडत राहतात….कौतुक करत राहतात…तेच अपयश पुन: भोगत राहतात….त्याच्या दु:खावर जणु डागण्या देत राहतात….

आज त्या शिल्पकाराच्या जमिनीने साद घातली आहे….त्याच्या स्वप्नातली तंत्रकुशलता इथल्या शिळांवर उतरवा….त्यच्यासारखं अपौरुषेय स्वप्न या जमिनीच्या अंगावर प्रसवा…. तिच्या हृदयातला उकळता, रसरसता दगड तिने समोर ओतलाय… त्यातून घडवा तुमच्या तरल कल्पनेचे चमत्कार….त्या अज्ञात शिल्पकाराला तुमच्या प्रतिभेचा सलाम घडू द्या…

तळटीप:  हा सगळा मनोव्यापार फार जुना आहे…. महाबलीपुरम् मधल्या गल्ल्याबोळांतून पसरलेल्या शिल्पांकडे पहात रस्त्यावरच मुक्काम ठोकून एका शिल्पकन्येच्या आधाराने लिहिलेलं एक चिठोर सापडलं माझ्या अजागळ संसारात! त्यावर बेतून ही गोष्ट लिहिली आहे… तेव्हा कथेला सत्याचा आधार कसा असतो हे मला ठाऊक आहे!

प्रश्नोत्तर….

आभाळभर तेज थेंबभर ज्योतीतून उजळतं. आणि अंधाराच्या काळ्या कळजाला त्या थेंबाएवढं भोक पडतं. ज्योतीचं किती लोभसवाणं धाडस! तिचं भाल्याच्या टोकासारखं सदैव रोखलेलं तेज…. य:कश्चित किड्यांनाही भूल पडावी असं तिचं दर्शन! तिच्यावर झेपावणाऱ्या किड्यांना दिसते फक्त तिची धारदार चमक…. एक क्षणावर उधळून देतात त्यांचं अस्तित्वंच….आणि तिचंही!

तिच्या तेजाची दाद देतात जिवाला ओवाळून टाकत…. ही कसली जीवघेणी रसिकता?! दोघंचाही जीव घेऊन मिथ्यकथा होणारी! सगळी बरोबर-चूकची गणितं उधळून लावणारी….

पुन्हा दाटणाऱ्या अंधारात दोष कुणाचा? तेजाला ग्रासणाऱ्या किड्याचा कि मुळात असलं धाडस करणाऱ्या ज्योतीचा?

ती ज्या क्षणी पेटली, त्याच क्षणी निश्चित झालं तिचं विझणंही. मरणाच्या तोंडात उतरून तिने जगण्याचा उत्सव मांडला होता! काय कारण असेल अशा विजिगिषेमागे?! चारी दिशांनी धावत येणाऱ्या अंधारात एकटंच तेवत रहायचं वाण का उचलावं तिने?!

किड्यालाही जर एवढं आकर्षण होतं, तर स्वत:चा आणि तिचाही विद्ध्वंस करून काय साधलं त्याने?! त्या एका तेजोमय क्षणासाठी अनंतकाळाचा अंधार त्याने का कबूल केला असावा?

कोण देईल या प्रश्नांची उत्तरं?

ज्या विधात्याच्या जगात एकही घटना नाहक घडत नाही त्याला तरी त्याची ही अगम्य कलाकृती उमगली आहे का?! कि तोही शोधतो आहे उत्तरं त्याच्याच शंकांची, आपल्यासगळ्यांमधून जगत जगत!!

सुखाची झोप…

एका छोट्याशा फुलाचं उमलणंसुद्धा केवढा मोठा व्यापार असतो! त्या झाडाला मुळापासून कोवळ्या टोकापर्यंत ताकद लावावी लागते.केवढातरी जीवनरस ओतावा लागतो. किती काळ वाट पहावी लागते…. तेव्हाकुठे तो रंग गंधाचा उत्सव काही तासांचं आयुष्य धारण करतो….

विश्वाच्या कारभाराचा विचार करता किती क्षणभंगुर असतं रे फुलाचं आयुष्य! तरीही त्याचं सौंदर्य, त्याची कोमलता, सुगंध आणि निरागस डोलणं कणानेही उणावत नाही. अंत आहे म्हणून कोणी सुरुवातच करायचं टाळत नाही…. मरण आहे म्हणून कोणी जगायचं टाळत नाही….

त्या झाडाला तरी काय खात्री असते, उद्याच्या सूर्यदर्शनाची? मूळ पोखरलं एखाद्या मुंगीने तर उभ्याउभ्या वठून जातं ते! जागच्याजागी मुळापासून पानांच्या टोकापर्यंत चढत जाणारं स्वत:चंच मरण जगत असतं ते….

मरेपर्यंत ते आपला जीवनधर्म सोडत नाही…..इतकी अश्राप श्रद्धा असावी आयुष्यावर, कि मरण म्हणजे फक्त सुखाची झोप वाटावी!

व्यसनानि सन्ति बहूनि…

व्यसन या शब्दाविषयी मुळात फार अज्ञान आहे, असं नाही का वाटत तुम्हाला? सामान्यत: लोकांना दारु, तंबाखू, धूम्रपान आणि फारफार तर अमली पदार्थ हीच व्यसनं असतात असं वाटतं. पण या सगळ्या उघड व्यसनांचा इलाज शक्य आहे…. यापेक्षाही भयानक व्यसनी लोक आपल्या भोवती राहात आहेत, ज्यांचा आपल्याला पत्ताही लागत नाही….

हे पैशाचे, सत्तेचे, प्रतिष्ठेचे व्यसनी लोक आपल्या व्यसनांना अतिशय सुरेख शब्दांत मांडतात…. त्यांच्या यशाचं सगळी दुनिया कौतुक करते…. उघड उघड पहाता हे लोक जणु सगळ्या जगाचे सूत्रधार असावेत असाच समज असतो!

आपल्या आयआयएम पदवीला सगळ्यात मोठा अलंकार मानणा़या, अगडबंब पगाराची धुंदी चढलेल्या, पण निर्व्यसनी माणसापेक्षा दारुच्या नशेत देवाचं नाव गात बसलेला कुणी वेडा बैरागी कित्येक पटीने बरा! पण लौकिकार्थाने एक जण यशाच्या शिखरीचा राजा आणि हा मात्र दारुडा!!

याचा अर्थ दारु चांगली आहे! असा सोयिस्करपणे काढू नये. पण यश आणि योग्यता मोजण्याच्या आपल्या मोजपट्टीत काहीतरी चूक जरुर आहे. अतिशय हलकट आणि बेजबाबदार व्यक्तींच्या हाती सत्ता, शक्ती देतो आपण. प्रत्येक चुकीची दिसणारी गोष्ट सरकारवर, देशावर, समाजावर आणि कुणीच नाही सापडलं तर परिस्थितीवर ढकलून आपण समोरच्या चहाच्या कपात मोठ्या समाधानाने बुडून जातो. हेही एक व्यसनच!

देशाची सत्ता चालवणाऱ्यापासून हाउसिंग सोसायटीची सत्ता चालवणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना सत्तेचं व्यसन आहे….

साजुक तुपातल्या मऊसूत उकडीच्या मोदकासारख्या मध्यमवर्गाला उच्चवर्गात उडी मारण्याच्या तथाकथित “महत्त्वाकांक्षेचं” व्यसन आहे….

पालकांना मुलांच्या करियरचं व्यसन आहे…. तिथे मुलाच्या आयुष्याची वाट का लागेना, पण कंप्युटर इंजिनियर तर झालंच पाहिजे किमान! वरचे आवेश बदलतात….पण आत असतं फक्त आंधळं व्यसन….

जी प्रत्येक गोष्ट आपण निव्वळ सवयीने, न समजून घेता करतो, ती म्हणजे व्यसन…. जेव्हा माणूस विचार करून, एखादी गोष्ट मनावर घेतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने व्यसनमुक्त होतो….डोळस होतो….तेव्हा तो “माणूस” होतो. माणसाच्या जन्माला येणं, आणि खरंच माणूस होऊन जगणं यात देवाने मुद्दाम फरक ठेवलाय. त्याने स्वातंत्र्य दिलंय माणसाला… व्यसनमुक्त माणूस किंवा व्यसनाधीन जनावर होण्याचं. आपल्याला काय व्हायला आवडेल?

जनावर होणं खूप सोपं आहे….आजकाल तर अधिकाधिक सोपं करुन देत आहेत आजुबाजूचे लोक! सगळी दुनियाच जर नाचत गात जनावर व्हायला जात असेल तर आपणही जाऊया की! डोळे मिटा, मिटता येत नसतील तर करियर, धर्म, कुटुंबाची जबाबदारी, सत्ता, पैसा अशी कुठलीतरी नशा शोधून काढा…अन नाचत सुटा…जिथे जाल तिथले व्हा!

पण हे माणूस होणं म्हणजे कर्मकठिण काम आहे. दर क्षणी स्वत:शी युद्ध मांडावं लागेल…मनातल्या जनावराला रोज रोज शिस्त लावावी लागेल…. सगळी व्यसनं हात धुवून पाठीशी लागतील, तरीही डोळे उघडे ठेवावे लागतील…. कधी तुमच्या संवेदनशीलतेवर हल्ले होतील जनावरांच्या झुंडींचे…कधी पायाखालची जमीन खेचली जाईल…. शरिरावरच्या जखमा भरून काढाल…पण मनाचीही जपणूक करावी लागेल… रोज नवे प्रश्न पडणार, माणूस व्हायचं असेल तर….. रोज रोज विचारांच्या गर्तेत प्रवास करणार….त्याचा कोणी प्रवासखर्चही नाही देणार! इतकी सगळी उठाठेव करायचीच असेल, तर माणूस व्हायचं बघा!

खरंतर तेही एक व्यसनच आहे… पण एक मोठा फायदा असलेलं हे एकमेव व्यसन आहे… माणूस व्हायची धडपड जो करतो त्याला एक दिवस, “देव कसा असेल” असा प्रश्न पडतो…ज्याला असा प्रश्न पडतो त्याच्या नशिबात अजून थोडी धडपड येते…. सगळी पार पडापड झाली कि मग एके दिवशी मोठ्ठा प्रकाश पडतो! अरेच्चा! देव तर इथेच आहे, माझ्या आतून ही सगळी धडपड करवणारा!